
मुंबई : मुंबईहून लातूरकडे जाणाऱ्या एलटीटी-नांदेड एक्स्प्रेसमधील एक घटना बुधवारी पहाटे कांजुरमार्ग स्टेशनच्या जवळ घडली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. लोकमान्य टिळक टर्मिनसहून लातूरकडे जाणाऱ्या एलटीटी-नांदेड स्पेशल एक्स्प्रेसमध्ये घडलेली घटना थरकाप उडवणारी आहे. आपल्या पत्नीला चोरट्यापासून वाचवताना ५० वर्षीय आयुर्वेदिक डॉक्टर योगेश देशमुख यांचा डाव्या हाताचा काही भाग रेल्वेखाली येऊन तुटला.
देशमुख दाम्पत्य आणि त्यांची नऊ वर्षांची मुलगी आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी प्रवास करत होते. लोकमान्य टिळक टर्मिनसहून पहाटे ३.३५ वाजता ट्रेन सुटल्यावर काही मिनिटांतच भांडुप आणि कांजुरमार्ग दरम्यान एका दरोडेखोराने डॉ. दीपाली देशमुख यांच्या खांद्यावरची हँडबॅग खेचण्याचा प्रयत्न केला. झोपेत असलेल्या दीपालीने प्रतिकार करताच चोरटा तिला डब्याच्या दरवाजाकडे खेचू लागला. तेवढ्यात वरच्या बर्थवर झोपलेले डॉ. योगेश देशमुख जागे झाले आणि पत्नीला वाचवण्यासाठी धावले.
प्रवासी गाढ झोपेत असतानाच डब्यात सुरू झालेला हा संघर्ष काही क्षणात प्राणघातक वळणावर पोहोचला. ट्रेनचा वेग थोडा मंदावल्याने चोरटा हातात बॅग घेऊन उडी मारून पसार झाला. पण त्या गोंधळात देशमुख दाम्पत्यही डब्याबाहेर रुळावर पडले. दीपालीला किरकोळ दुखापत झाली. पण डॉ. योगेश यांच्या डाव्या हाताचा काही भाग थेट रेल्वेखाली आला. रक्ताच्या थारोळ्यात ते विव्हळत होते.

मुंबई : ६५ कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याचा तपास करताना आज ईडीने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबई आणि कोचीतील संपत्तीवर छापे टाकले. ...
अंधारातून आणि गोंधळातून दीपालीने धीर राखून त्यांना ओढत रुळावरून बाजूला आणलं. त्यानंतर तिने १०० नंबरवर फोन केला, पण जागा कोणती हे माहीत नसल्याने पोलीस मदत मिळणं कठीण होतं. त्याच वेळी एक दूधवाटप करणारा टेम्पो जवळून जात होता. चालक अनिल जगदाळे यांनी दाम्पत्याला मदतीसाठी टेम्पो थांबवला आणि अवघ्या १५ मिनिटांत रुग्णालयात पोहोचवलं. डॉ. योगेश यांना गंभीर अवस्थेत ICCUमध्ये दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या साऱ्या प्रकारात सर्वात काळजाला हात घालणारी गोष्ट म्हणजे देशमुखांची नऊ वर्षांची मुलगी. तिच्या समोरच तिच्या आई-वडिलांवर हा हल्ला झाला, आणि ती गाडीत एकटीच राहिली. सुदैवाने कल्याण स्थानकात रेल्वे अधिकाऱ्यांनी तिची काळजी घेतली आणि तिला सुखरूप उतरवले.
या संपूर्ण घटनेमुळे मुंबईच्या रेल्वे सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. फक्त काही रुपयांसाठी एका चोरट्यामुळे एका डॉक्टरचा हात कापला गेला. देशाची सेवा करणाऱ्या डॉक्टरच्या पवित्र हातावर अशी कुऱ्हाड चालावी, ही या व्यवस्थेची शरमेची बाब आहे. यामुळे एलटीटी स्टेशनवरून चढणाऱ्या प्रवाशांचा सुरक्षा व्यवस्थेवर अविश्वास वाढतो आहे.
आता जीआरपी आणि मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. पण त्या चोरट्याला शिक्षा मिळेल का? आणि त्यापेक्षा महत्त्वाचं, रेल्वे प्रवास केवळ गंतव्य स्थान गाठण्यासाठीच नसेल, तर तो जीव गमावण्याचा खेळ होईल का? असा प्रश्न पडला आहे.