
ममता आठल्ये : मुंबई ग्राहक पंचायत
दरवर्षी ५ जून रोजी एक संकल्पना घेऊन जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. यावर्षीची थीम आहे. ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत’. जरी प्लास्टिक, प्रदूषणास जबाबदार असणारा प्रमुख घटक असला तरी प्लास्टिकच्या बरोबरीने औषधे सुद्धा प्रदूषणास घातक ठरत आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेले आजार त्याचबरोबर माफक किमती, सहज उपलब्धता यामुळे आज चॉकलेट गोळ्यांसारखा औषधांचा वापर होतो आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आपल्याकडे कालावधी संपलेली आणि न वापरलेली औषधे घरगुती कचऱ्यात फेकून तर कधी फ्लश करून त्यांची विल्हेवाट लावली केली जाते. अशा बेजबाबदार कृतीमुळे सक्रिय रासायनिक घटकपदार्थ भूजल आणि अन्न साखळीमध्ये प्रवेश करतात. माती, पाणी आणि अन्न यांच्या प्रदूषणाबरोबरच ही औषधे प्राण्यांच्या पोटात जाऊन त्यांच्या जीवाला धोका उद्भवतो. काही वर्षांपूर्वी मानवी मृतदेहातील मांस भक्षण करणारी गिधाडे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडली होती. मीमांसा करताना असे लक्षात आले की, ‘डाक्लोफेनाक सोडियम’ या दर्द निवारक रासायनिक घटकाचे मृत देहातील अंश पोटात गेल्याने गिधाडे मरण पावत आहेत.
जागतिक स्तरावरील दुसरी भीषण समस्या म्हणजे प्रतिजैविकांना उत्पन्न होत असलेला प्रतिरोध. प्रामुख्याने उदाहरण द्यायचे झाले तर प्रचलित औषधांना निष्प्रभ करणारे क्षयरोगाचे जीवाणू. काही वेळा कालावधी संपलेल्या औषधांचा गैरवापर अथवा पुनर्विक्री होते. त्यामुळे ती प्राणघातक ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर केरळ राज्याने फेब्रुवारी महिन्यात राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांच्या हस्ते आपल्या देशातील पहिला ‘n PROUD’ म्हणजेच ‘New Program on Removal of Unused Drugs’ प्रकल्प कोझिकोडे शहरात कार्यान्वित करण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पांतर्गत न वापरलेली व मुदतबाह्य औषधे गोळा करून त्यांची सुरक्षित आणि योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. यासाठी निळ्या रंगाचे कंटेनर कायमस्वरूपी शहरातील विविध ठिकाणी संकलनासाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच या कामी सेवाभावी व पर्यावरणासाठी पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांना देखील सहभागी करून घेतले जाणार आहे. अगदी थेट घराघरातून सुद्धा ठरावीक दिवशी असे संकलन केले जाणार आहे.
औषधे ही जैववैद्यकीय कचरा प्रवर्गात मोडत असल्याने त्यांच्या विल्हेवाटीसाठी जैववैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम १९९६ लागू होतो. या नियमांनुसार
१. पिवळ्या रंगाच्या बॉक्सेस किंवा क्लोरीनमुक्त प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये न वापरलेल्या व मुदतबाह्य औषधांचे विल्हेवाटीसाठी संकलन केले जाते.
२. उत्पादक किंवा विक्रेत्याला ही संकलित केलेली औषधे विल्हेवाटीसाठी परत दिली जातात.
३. प्रथम औषधांचे वेष्टन कापून ती पावडर स्वरूपात इन्सिनरेटरमध्ये जाळून टाकली जातात. कचऱ्यावर प्रक्रिया आणि त्याचे व्यवस्थापन करणाऱ्या युनिटला केंद्र व राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाची परवानगी असणे बंधनकारक आहे.
४. जमिनीत पुरून औषधांची विल्हेवाट लावणे ही सुद्धा एक सर्वसामान्य पद्धत आहे.
रुग्णालये, सरकारी व खासगी दवाखाने, प्रयोगशाळा, मेडिकल दुकाने, संशोधन करणाऱ्या संस्था यांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची हाताळणी वरील पद्धतीने केली जाते. आजार बरा होणे, औषधांचा कालावधी पूर्ण होणे, उपचार पद्धतीमध्ये बदल, स्ट्रीप साईज, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकत घेता येणारी OTC औषधे अशा विविध कारणांमुळे आपल्या घरामध्ये न वापरलेली औषधे ही जमा होतच असतात. आपण घरामध्ये औषधांची साठवणूक करताना झाकण असलेला एक वेगळा बॉक्स सुरक्षित ठिकाणी ठेवावा. दर सहा महिन्यांनी बॉक्समधील औषधांची तपासणी करून त्यातील मुदतबाह्य औषधे तसेच पुनर्वापर करण्याची शक्यता नसलेली प्रिस्क्रिप्शनवरील औषधे वेगळी काढावी. आपल्या घराजवळील केमिस्ट किंवा एखादी संस्था अशी औषधे घेतात का याची माहिती काढावी. अन्यथा ती कापून, लेबल काढून एका पिशवीत घालून कचऱ्यात टाकावी.
आज औषधे ही आरोग्य सेवेवर होणाऱ्या खर्चाचा एक प्रमुख हिस्सा आहेत. आपल्याकडे वापरली न गेलेली व अंतिम तारीख न उलटलेली औषधे वापरण्यासाठी योग्य धोरणाचा अभाव आहे. प्रिस्क्रिप्शनवर मिळणारी पण न वापरलेली औषधे पुनर्वापरासाठी औषध कंपन्यांना परत पाठविण्यासाठी राष्ट्रीय धोरणात्मक मार्गाची गरज आहे. अमेरिकेत अशी प्रणाली
कार्यरत आहे.
भारत औषध उत्पादनात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. औषध उद्योगाची उलाढाल १.३ ट्रिलियन एवढी प्रचंड आहे. पण वर्षाला २७० कोटी रुपयांची औषधे मुदतबाह्य झाल्यामुळे फेकून दिली जातात. प्रचंड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात एकीकडे गोरगरिबांना औषधे विकत घेणे परवडत नाही तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची औषधे पाण्यात जात आहेत.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना ही राष्ट्रीय नियामक प्राधिकरण आहे. तिच्याद्वारे कालबाह्य व न वापरलेली औषधे यांचा गैरवापर व प्रतिजैविके प्रतिरोध होऊ नये म्हणून त्यांची शास्त्रशुद्धरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शक धोरणे आखणीचे काम चालू आहे. लवकरच त्याची पूर्तता होऊन राष्ट्रीय धोरण अमलात येणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या काही स्वयंसेवी संस्थांनी या कामात पुढाकार घेतला आहे. यातील एक उल्लेखनीय संस्था म्हणजे R निसर्ग फौंडेशन जी ठाणे शहरात कार्यरत आहे. ग्रीन फार्मसी या उपक्रमाद्वारे त्यांनी ठाणे शहरात विविध ठिकाणी (गृहनिर्माण संस्था, मेडिकल दुकाने, मॉल्स) औषध संकलनासाठी बॉक्स ठेवले आहेत. जमा झालेल्या औषधांचे वेष्टन काढून त्यांची पावडर करून ती जाळून टाकण्यासाठी पाठविली जाते. वर्तमानपत्रात हल्लीच आलेल्या बातमीनुसार मुंबई महानगरपालिकेने घातक कचऱ्याचे संकलन करून विल्हेवाट लावण्याची सेवा १ मेपासून सुरू केली आहे. मुंबईत दररोज सात हजार ते आठ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यामध्ये सुमारे ७० ते ८० टन वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित कचऱ्याचा म्हणजेच सॅनेटरी पॅड्स, डायपर्स, कालबाह्य औषधे, शरीर पुसण्यासाठी वापरलेले दूषित कापूस, बँडेजेस, शृंगार केंद्रांमध्ये निर्माण कचरा (वॅक्सिन्ग स्ट्रिप्स, पीपीई) आदींचा समावेश होतो. हा अत्यंत घातक कचरा असला तरी अनेक वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि सामान्य घरगुती कचऱ्यातच तो टाकला जातो. त्यामुळे कचरा संकलित करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करणे अवघड होते. मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, शृंगार केंद्रे, महिला वसतिगृहे, शैक्षणिक संस्था अशा विविध आस्थापनांमधून नोंदणी तत्त्वावर असा कचरा निःशुल्क गोळा केला जाणार आहे. त्यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
हा कचरा प्लाझ्मा इन्सिनरेशन युनिट्समध्ये जाळण्यात येणार आहे. मुंबईकरांना घातक कचऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो याबद्दल जनजागृतीची नितांत गरज आहे. महानगरपालिकेला त्यांच्या कचरागाड्यांवर काम करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अन्यथा वेगळा करून दिलेला कचरा गाडीवरील कामगारच पुन्हा एकत्र करतात असा नागरिकांचा अनुभव आहे. घातक कचरा गोळा करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या पिशवीचा वापर करायचा आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. आज औषध साक्षरता ही काळाची गरज आहे. नागरिकांना न वापरलेली व मुदतबाह्य औषधांची साठवणूक व विल्हेवाट याबद्दल शिक्षण व मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे.