
कामगार नेत्यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसची तपासणी अथवा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची लेखी मागणी कामगार नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी निवेदनातून महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या तब्बल ७ बसेसच्या जळीतकांडाच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर धावणाऱ्या बसेसमध्ये आग लागणे ही चिंताजनक बाब आहे. यामुळे परिवहन उपक्रमाचे वाहक-चालक तसेच प्रवाशांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. या घटनांमुळे प्रवासी परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करणे टाळतील.
मुळात परिवहनच्या बसेसमध्ये हजारो नवी मुंबईकरांची दररोज प्रवासी वाहतूक होत असल्याने त्या बसेस सुस्थितीत असणे आवश्यक आहे अथवा बसेस जळीत घटनांमुळे महापालिका प्रशासनाची प्रदेश पातळीवर प्रतिमा मलीन होऊन बसेसला मृत्यूचा सापळा म्हणून प्रवाशांकडून संबोधले जाईल. बस जळीतकांडाच्या घटना गंभीर बाब असून प्रशासनाने याची दखल घेणे आवश्यक असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका परिवहन उपक्रमाकडून नादुरुस्त बसेस चालविल्या जात असून त्यामुळे अपघातही झाले आहेत. अनेक बसेस गळक्या असल्याचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नादुरुस्त बसेसमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? अपघातग्रस्त चालक व वाहक कर्मचाऱ्यांच्या परिवाराचे पालनपोषण कोण करणार? त्यामुळे सर्वप्रथम नादुरुस्त बसेस रस्त्यावर आणण्याचे प्रकार बंद करणे आवश्यक आहे.
परिवहन उपक्रमाच्या कार्यरत असलेल्या सर्वच बसेसची तपासणी अथवा स्ट्रक्चरल ऑडिट होणेआवश्यक आहे. महापालिका सधन असून पालिका प्रशासनाला आवश्यकता असल्यास नवीन बसेसची खरेदी प्र्रशासन करु शकते. आपण तातडीने परिवहन उपक्रमाच्या सर्वच बसेसचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे व बस तपासण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत.
बस जळीत कांडाच्या घटना पुन्हा होणार नाहीत याबाबत आपण परिवहन उपक्रमला आदेश द्यावेत. बस जळीत घटना घडून काही दुर्घटना घडल्यास परिवहन व्यवस्थापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.