आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी)च्या विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच बंगळूरुमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. विजयी मिरवणुकीवर विरजण पडले. बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या आरसीबीच्या विजय मिरवणुकीपूर्वी अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना जीव गमवावा लागला. तब्बल १८ वर्षांनंतर आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो लोक स्टेडियममध्ये जमले असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गर्दी अचानक स्टेडियमच्या बाहेर आणि आत अनियंत्रित झाली, ज्यामुळे गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीच्या घटनेमागे आयोजकांचा निष्काळजीपणा आणि गर्दी नियंत्रणातील अनेक त्रुटी दिसून आल्या आहेत. आयपीएल २०२५च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच जेतेपद पटकावले.
‘ई साल कप नाम नाम्दू’ हे कन्नड भाषेतील घोषवाक्य या विजयानंतर देशभर पोहोचले. यंदाचा कप बंगळूरु जिंकणार असा त्याचा मराठी अर्थ आहे. क्रिकेटमधल्या एका महत्त्वपूर्ण विजयानंतर कन्नडसारख्या प्रादेशिक भाषेतील शब्द, वाक्य हे एका रात्रीत प्रसिद्ध होते, याचा अर्थ आयपीएलमधील विजयाचा आनंद प्रादेशिक अस्मिता वाढविण्यासाठी मदत करतो, हे या प्रकरणावरून अधोरेखित झाले.
आयपीएल २०२५ जिंकल्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी) संघ बुधवारी बंगळूरुला पोहोचला तेव्हा विमानतळाबाहेर हजारो चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी जेव्हा संघ विधानसभेत रवाना झाला तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले चाहते टाळ्या वाजवत आणि संघाच्या बाजूने घोषणा देत होते. खुल्या बसमधील परेड रद्द केल्यावरही चाहत्यांनी खेळाडूंच्या बस मार्गावर दुतर्फा गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाची विजयी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. ३५ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमबाहेर चाहत्यांनी लाखोंच्या संख्येन गर्दी केली होती. पण इथेच चेंगराचेंगरीची घटना घडली. यावेळी कर्नाटक पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. मात्र, या लाठीचार्जमुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी ती आणखी बिघडली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला, लोक सैरावैरा धावू लागले आणि यात चेंगराचेंगरी झाली. क्षणात आनंदाचे वातावरण गंभीर दुःखात बदलले. उत्सवाचा क्षण हा अकल्पनीय दुर्घटनेत रूपांतरित झाला. बंगळूरुच्या घटनेतील सर्व पीडित कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. पीडित कुटुंबीयांना दु:खातून सावरण्याचे बळ मिळो, अशा भावना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावरून व्यक्त केल्या. क्रिकेटवीर युवराज सिंगसह आरसीबीचा स्टार विराट कोहलीसह अनिल कुंबळे आणि अन्य दिग्गज क्रिकेटर्संनी या घटनेनंतर एक्स पोस्टतून दु:ख व्यक्त केले आहे.
अभिनेता शाहरूख खान याची के. के. आर, अभिनेत्री प्रीती झिंटाची पंजाब या बॉलिवुडच्या कलाकारांच्या टीम आयपीएलमध्ये खेळतात. तसेच नीता अंबानी, काव्या मारण या महिला उद्योजिकांच्या टीमने स्पर्धेत नशीब अजमावले होते. त्यामुळे ‘खेळ आणि मनोरंजन यांचा संगम’ आपल्याला आयपीएलमध्ये पाहायला मिळतो. आयपीएल सारख्या क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनातून क्रिकेट कंट्रोल बोर्डाला सर्वांत श्रीमंत मंडळ बनवण्यात मोठी मदत झाली आहे. प्रसारणाचे हक्क, प्रायोजकत्व अशा वेगवेगळ्या मार्गांनी यंदाच्या आयपीएलमध्ये सुमारे १४ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. आयपीएलची ‘ब्रँड व्हॅल्यू’ सुमारे १२ अब्ज डॉलरचा अंदाज असल्याने या स्पर्धेचा दबदबा लक्षात येतो. गेले अडीच महिने चाललेल्या आयपीएल सामन्यांची चर्चा रेल्वे प्रवासात ऐकायला मिळाली. दूरचित्रवाणीबरोबरच मोबाइल फोनवर या सामन्यांचा आनंद घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. यंदा सुमारे ७५ कोटी प्रेक्षक आणि पाच हजार कोटी मिनिटांचा ‘वॉच टाइम’ या आकड्यांतून स्पर्धेच्या लोकप्रियतेची किर्ती होती, याचे वर्णन करता येईल.
यापूर्वी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईत भारतीय संघाच्या स्वागतासाठी गर्दी उसळली होती. मुंबई पोलीस अधिकाऱ्यांसह अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्या वेळी काही दुर्घटना घडली नाही, हे सुदैव. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही यापूर्वी मुंबई शहरात मिरवणूक झाली होती. मुंबई विमानतळ ते वानखेडे स्टेडियम या परिसरात ज्या शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक निघाली होती, त्याचे कौतुक झाले होते. लोकप्रिय चित्रपट तारे-तारकांना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीमुळे घडलेल्या दुर्घटनाही ताज्या आहेत. अतिरेकी क्रिकेटप्रेमात बेशिस्तीची भर आणि अपुऱ्या पडणाऱ्या यंत्रणा यामुळे बंगळूरुवासीयांच्या आनंदाच्या क्षणांना दुर्घटनेचे गालबोट लागले.
देशात वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांबाबत सरकारी यंत्रणा आणि सुज्ञ नागरिकांनीही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, हे नक्की. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत किती बळी गेले याची तुलना बंगळूरु येथील चेंगराचेंगरीशी करून, कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस पक्षांने हात झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी, विजयोत्सवासाठी किती गर्दी होणार याचा अंदाज प्रशासनातील अधिकाऱ्यांना व्हायला हवा होता. तेथील पोलीस प्रशासनाने ऑन लाईन पास देण्याची व्यवस्था केली होती; परंतु किती जणांना पासेस वितरीत करण्यात आले, त्याठिकाणी किती जागा आहे, याचा विचार पोलीस प्रशासनाने केलेला दिसला नाही; परंतु तसे घडले नाही. त्यामुळे बॅरेकेट तोडून काही जण आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. बंगळूरु येथे घडलेल्या दुर्घटनेतून धडा घेऊन जमणाऱ्या बेफाम गर्दीला आवर कसा घालावा, यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याची आता वेळ आली आहे.