Sunday, June 8, 2025

​Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर​ चार महिन्यांत ११ बळी!

​Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर​ चार महिन्यांत ११ बळी!
मुंबई- पुणे या सहा पदरी महामार्गावरील आजघडीला दररोज लाखो वाहने धावतात. यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्ग म्हणून ओळखला जाणा​ऱ्या या महामार्गामुळं कमी वेळात इच्छित स्थळी पोहचता येतंय. हे जरी खरं असलं तरी​ दिवसेंदिवस या महामार्गावर वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांच्या घ​टना चिंता वाढवत आहे​त. मागील काही वर्षांची आकडेवारी पाहता दरवर्षी सरासरी ६५ ते १०० पर्यंत निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत. जागोजागी अनियंत्रित उतार, टोकदार वळणे आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळं मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.​ सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळं चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवत वाहनं चालवायला हवीत.

​०२ जून २०२५ च्या पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर महाराष्ट्र शासनाच्या शिवशाही बसला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही शिवशाही बस बोईसर येथून कोल्हापूरकडे जात होती. या अपघातात बसमधील चालक, वाहक यांच्यासह एकूण १३ प्रवासी किरकोळ जखमी झालेत. त्या आधी २४ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत तीव्र उतारावर अनेक वाहने एकमेकांना धडकली. ज्यात तीन कार तीन बसेस आणि एका ट्रकचा समावेश होता. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले. यामुळं महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. अशा दर दोन चार दिवसांनी मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांच्या बातम्या आपण पाहतोय. महामार्ग पाेलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार वर्षाकाठी सरासरी दीडशे ते दोनशेच्या घरात अपघात होतात. यातील मृतांची संख्या सरासरी ६५ ते 100 असते. तर गंभीर जखमी होणार्‍यांची संख्याही तेवढीच असते. २०२५ मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ११ निष्पाप प्रवाशांचे बळी गेलेले आहेत.

कोणत्या वर्षांत किती अपघाती मृत्यू झाले?


२०२१ - ८८ 88
२०२२ - ९२
२०२३ - ६५
२०२४ - ९०
२०२५ ​म​ध्ये ३० एप्रिलपर्यंत​ ११ जणांचे बळी गेलेले आहेत.

काय आहेत अपघातांची कारणं ?



  • निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणं

  • सीट बेल्ट न लावता ड्रायव्हिंग करणं

  • फलकावर लावलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत

  • वाहनांची वेळेत देखभाल, दुरुस्ती केलेली नसते

  • क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते

  • एक्सप्रेसवेवर अनधिकृतरित्या पार्किंग केली जाते

  • ओव्हरटेकिंग प्रयत्न करताना अपघात होतात

  • पावसाळ्यात धुके असतानाही गाड्या रस्त्यावर उतरवणे.


सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळं महामार्गावर वाहनाचा वेग मर्यादेत हवा. अन्यथा वेगात असलेलं वाहन अचानक ब्रेक दाबावं लागल्यावर घसरून अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळण गरजेचं आहे.
Comments
Add Comment