आयपीएल विजयाची ‘विराट’ स्वप्नपूर्ती

  99

मातब्बल १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल चषकावर आपले नाव कोरण्याचा मान रॉयल चॅलेजर्स बंगळूरु संघाला मिळाला आहे. यापूर्वी तब्बल तीन वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात जाऊनही विजेतेपद न मिळाल्याची खंत आरसीबीच्या प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये होती. विराट कोहलीसारखा जागतिक दर्जाचा नावाजलेला खेळाडू संघात असतानाही आरसीबीला १७ वर्षे आयपीएल चषक हुलकावणी देत होता, याची कुठेतरी नाराजी आयपीएल प्रेमींच्या मनामध्येही होतीच. अखेर तो दिवस उजाडलाच, ज्या दिवसाची आरसीबीच्या संघाने, संघमालकाने, संघाच्या चाहत्यांनी प्रतीक्षा केली होती. ३ जून रोजी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये आरसीबीने पंजाबचा ६ धावांनी पराभव करत आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. मंगळवारी रात्री कर्नाटकमध्ये अक्षरश: दिवाळी साजरी झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या जेतेपदाला गवसणी घातली आणि देशभरात आरसीबीच्या चाहत्यांनी जल्लोष केला. अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे आरसीबीच्या चाहत्यांनीच खचाखच भरले होते आणि मध्यरात्री जेतेपदाची ट्रॉफी उंचावताना संघाला पाहण्यासाठी ते शेवटपर्यंत स्टेडियमवरच थांबले होते. अहमदाबाद जणू बंगळूरु फ्रँचायझीचे होम ग्राऊंड आहे असेच भासत होते.


तिथे कर्नाटकमध्येही जल्लोष झाला. चाहते रस्त्यावर उतरून आनंद साजरा करत होते. आयपीएलच्या अंतिम सामन्यात कधीही विजेतेपद न मिळवलेले दोन संघ खेळत होते. त्यामुळे यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. आरसीबीने विजयासाठी दिलेले १९१ धावांचे आव्हान पंजाब किंग्जला पेलवले नाही आणि पंजाब किंग्जने १८४ धावांपर्यंत मजल मारली. हा विजय विराट कोहलीसाठी खूप आवश्यक होता. विराट कोहली आणि आरसीबीचे असलेले नाते आयपीएल सुरू झाल्यापासून गेली १८ वर्षे ‘फेव्हिकोल’च्या मजबूत जोडसारखे घट्ट होते आणि आजही आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात विजय जसजसा निश्चित होत गेला, तसतसे विराट कोहलीच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. विजय होताच विराट कोहली लहान मुलासारखा ओक्साबोक्सी रडला, अर्थांत तब्बल १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या यशाबाबतचे ते आनंदाश्रू होते. आरसीबीच्या विजयामुळे विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर झाले. आरसीबीच्या विजेतेपदाचा शिलेदार आणि नेता म्हणून रजत पाटीदार याची देखील कामगिरी महत्त्वाची ठरली. रजत पाटीदार याने विराट कोहलीसाठी आयपीएलचे विजेतेपद मिळवणार असे म्हटले होते. ते त्याने सांघिक कामगिरीच्या जोरावर करून दाखवले. रजत पाटीदारने यंदा पहिल्या हंगामात आरसीबीचे नेतृत्व केले. रजत पाटीदार काही सामन्यांमध्ये खेळला नव्हता. मात्र क्वालिफायर आणि फायनलमध्ये रजत पाटीदारने संघाचे नेतृत्व केले. रजत पाटीदारने अंतिम सामन्यात वेळोवेळी गोलंदाजीमध्ये बदल करत पंजाबच्या फलंदाजांना खेळपट्टीवर जम बसवू दिला नाही. रजत पाटीदारने स्पिन गोलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी याचा योग्य पद्धतीने वापर केला. रजत पाटीदार याने आयपीएल फायनल पूर्वी पत्रकार परिषदेत आम्ही प्रयत्न करू आणि विराट कोहलीसाठी जिंकू, असे म्हटले होते. भारतीय क्रिकेट संघ आणि आरसीबीसाठी विराट कोहलीने अनेक वर्षे खूप योगदान दिले आहे, त्याच्यासाठी आयपीएल विजेतेपद मिळवायचेच, असे रजत पाटीदार म्हणाला होता. त्याने त्याचा शब्द पूर्ण केला.


यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो, हे नेहमीच म्हटले जाते. पण आयपीएल आरसीबीने जिंकल्यावर त्याची पुन्हा प्रचिती आली. विराट कोहलीची पत्नी व प्रसिद्ध हिंदी सिने अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील गेली अनेक वर्षे विराटच्या व आरसीबीच्या समर्थनार्थ सामन्यासाठी क्रीडांगणावर हजर असायची. या विजयासह बंगळूरुचे आणि या संघाचा गेली १८ वर्षे भाग असणाऱ्या विराट कोहलीचे स्वप्न साकार झाले. मंगळवारी आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव करून आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकली आणि इतिहास रचला. विराट कोहलीचा संघ आरसीबीने ट्रॉफी पटकावताच अनुष्काच्या आनंदाला पारावार उरला नाही. सामना जिंकताच विराट कोहली हमसून हमसून रडू लागला. त्यानंतर त्याने धावत जाऊन पत्नी अनुष्काला कडकडून मिठी मारली. २०१७ मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याने अनेकदा एकमेकांच्या कारकिर्दीला पाठिंबा दिला आणि त्यांचे कौतुक केले. आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकताच विराट कोहली या विजयाच्या क्षणी भावुक झाला आणि या विजयाचे श्रेय त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला देत म्हणाला की, ती २०१४ पासून इथे येतेय आणि आरसीबीला सपोर्ट करतेय, म्हणून तिलाही १८ वर्षे झाली आहेत. ती सतत तिथे असायची. न चुकता सामने पाहायला येणे, आम्हाला हरताना पाहणे, तुमचा लाईफ पार्टनर तुमच्या खेळासाठी काय करतोय, त्याग करण्यासाठी, वचनबद्धतेसाठी आणि प्रत्येक कठीण काळात तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी काय करतो? हे असे काहीतरी आहे, जे तुम्ही शब्दांत वर्णन करू शकत नसल्याचे सांगत या विजयाचे श्रेय त्याने अनुष्काला दिले. अंतिम सामन्यात हार-जीत ही होतच असते. कोणाचा तरी विजय म्हटल्यावर कोणाचा तरी पराभव हा ठरलेलाच असतो. पंजाब किंग्जचा पराभव झाला असला तरी त्यांची वाटचालदेखील संघर्षाचीच राहिलेली आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून त्यांना देखील एकदाही आयपीएल चषक जिंकता आलेला नाही. त्यांनी देखील विजयासाठी अथक प्रयत्न केले. अवघ्या सहा धावांनी त्यांचे प्रयत्न कमी पडल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जनेदेखील स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.


क्वालिफाय सामन्यात अंबानीच्या मुंबई इंडियन्सला पराभूत करत त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. आयपीएल स्पर्धा संपली असली तरी भारताला या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक चांगल्या खेळाडूंचा शोध लागला आहे. रोहित शर्मा, कोहली, रवींद्र जडेजाच्या निवृत्तीनंतर पोकळी कोण भरून काढणार, याचे उत्तरदेखील या स्पर्धेतच भारताच्या निवड समितीला निश्चितच सापडले असणार.

Comments
Add Comment

विजयाच्या जल्लोषावर बंगळूरूमध्ये शोककळा

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (आरसीबी)च्या विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच बंगळूरुमध्ये एक अत्यंत

लाडकी बहीण योजनेतील गैरफायदा चिंताजनक

राज्य सरकार जनतेच्या भल्यासाठी अनेक योजना आणते. तळागाळातील लोकांना त्यांचा फायदा व्हावा हा त्यामागील हेतू असतो.

बालगुन्हेगारी: मानसिक स्थिती आणि विकृती...

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल लहान मुले आणि तरुण पिढीमध्ये गुन्हेगारीची वाढती प्रवृत्ती, अवैध

बांगलादेशात हसीना यांची चोहोबाजूंनी कोंडी

आपला शेजारी बांगलादेशच्या निर्मितीत भारताचा महत्त्वाची भूमिका राहिली असून भारताने पाकच्या हडेलहप्पीविरोधात

पंतप्रधानांचा इशारा अन् पाकिस्तानचा थरकाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकमाता अहिल्यादेवी होळकर महिला स्त्रीसशक्तीकरण महासंमेलनात भोपाळ येथे

परकीय गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास!

देशामध्ये महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीसाठी, शांततेसाठी, उपजीविकेसाठी विश्वसनीय व आशादायक ठिकाण असल्याचे चित्र