
विजय मांडे
कर्जत : स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी रस्ता मिळालेलं तुंगी गाव आज पुन्हा जुन्या दुर्दैवाला सामोरं जातंय. २६ मे रोजी पडलेल्या अवकाळी पावसाने डोंगरातून गेलेला डांबरी रस्ता अक्षरशः वाहून गेला आणि कर्जत तालुक्यातील अति दुर्गम भागात असलेल्या या गावातील लोक पुन्हा पायवाटेवर अवलंबून झाले आहेत. एकेकाळी डोंगर फोडून मिळवलेली वीज आणि रस्ता या दोन्ही सुविधा खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांनी २०१८ नंतर मिळाल्या. गावात गाडी पोहचते, हीच काही वर्षांपूर्वीपर्यंत कल्पनाही असह्य होती. पण आज पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी या रस्त्याचे डांबर वाहून गेले आणि त्यानंतर दुरुस्त केलेला हा रस्ता यंदा तर मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने वाहून गेल्याने तुंगी ग्रामस्थांना पुन्हा पायपीट करण्याची वेळ आली आहे. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
डोंगरातील सुळक्यावर वसलेल्या आणि वर्षानुवर्षे डोंगर चढून जाणे हीच वाट असलेल्या तुंगी गावात २०१८ मध्ये वीज पोहचली. त्यानंतर तुंगी गावात १५०० मीटर लांबीचा डोंगरातून जाणारा रस्ता वन विभागाची परवानगी घेऊन डोंगरातील दगड फोडून रस्ता बनवला गेला. त्यामुळे या गावाला स्वातंत्र्यानंतर सत्तर आणि पंचांहत्तर वर्षांनंतर या सुविधा या गावाला मिळाल्याने गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

सावंतवाडी : एकीकडे धरणावर फिरायला गेलेला १९ वर्षांचा युवक सेल्फी घेताना पाण्यात बुडाला. तर दुसरीकडे मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच वडिलांना ...
सन २०२३ पर्यंत तुंगी गावाला रस्ता नव्हता. केवळ पायवाट होती. एखादा ग्रामस्थ आजारी पडला तर त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेण्यासाठी डोलीतून पायावाटेने डोंगरावरून खाली आणण्यात येते. या गावाला रस्ता मिळावा यासाठी खासदार बारणे यांनी वन विभागाची परवानगी मिळवून तुंगी गावापर्यंत डोंगर फोडून कच्चा रस्ता करण्यात आला. या रस्त्यावरून खासदार बारणे यांनी सर्वप्रथम आपली गाडी गावामध्ये नेवून आपले पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नाने मार्च - एप्रिल २०२४ मध्ये डोंगरपाडा ते तुंगी पर्यंत डांबरीकरण केले.
पण २०२४ मधील पावसाळ्यात या रस्त्याचे डांबर वाहून गेले. तेव्हा पावसाळ्यानंतर नोव्हेंबर मध्ये पुन्हा हा रस्ता दुरुस्त करण्यात आला. मात्र यंदा २६ मे रोजी अवकाळी पावसात पुन्हा या रस्त्याचे डांबर वाहून गेल्याने तुंगी ग्रामस्थांना वाहन घेऊन जायला अडचण होऊ लागली आहे. येथील ग्रामस्थांची 'येरे माझ्या मागल्या' अशी परिस्थिती आता होऊन बसली आहे. हा रस्ता करताना तयार केलेली गटारे चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे. आता असलेल्या गटाराची क्षमता डोंगरावरून वाहून येणारे पाणी आणि त्याबरोबर येणारी माती व दगड वाहून नेण्याची नाही. तुंगी भागातील रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे असल्याने तो त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी तुंगी ग्रामस्थांकडून होत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात रस्ता मिळणं हे जितकं ऐतिहासिक होतं, तितकंच आज पुन्हा तोच रस्ता गमावणं हृदयविदारक आहे. ‘तुंगी’ला रस्ता मिळाला पण तोच रस्ता पावसात वाहून गेला! गावकऱ्यांचं हे वाक्य आज सगळं सांगून जातंय.