
माझे कोकण : संतोष वायंगणकर
महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा सर्वच स्वायत्त संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील. प्रभाग रचना आदी निवडणुकांचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत निवडणुका होतील असा अंदाज वर्तविला जात आहे. महाराष्ट्रातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदेगट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवारगट) आरपीआय आठवले गट या महायुतीतील घटक पक्षांनी आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षांत बदलत गेलेले राजकारण पाहता कोणत्या पक्षाशी कोणाशी युती होईल, आघाडीत जातील हे कोणालाच सांगता येणारे नाही. असं बेभरवशाचं आणि अस्थिरतेचं राजकारण झालं आहे. यातच पक्षीय काम कार्यकर्त्यांना ३६५ दिवस गुंतवून ठेवण्याच्या भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे भाजपा नेहमीच अलर्ट मोडवर राहाते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही निवडणुकांसाठी सतर्क आहे. कोकणाच्या राजकारणाचा विचार करता पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात भाजपा-शिवसेनेचे नेटवर्क चांगले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका वेगळ्या पद्धतीने लढवल्या जातात. त्या निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे सर्वच काही वेगळे असत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकष आणि लोकांच्या अपेक्षा, उमेदवार याच निवडणुकीच गणितही वेगळे राहात. मधल्या बऱ्याच कालावधीनंतर मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्वच स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत. मधल्या कालावधीत या स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय कारभार होता. प्रशासनातील अधिकारी काय ठरवतील तेच फायनल असा कारभार राहिला. याचा फटका निश्चितच सर्वसामान्य जनतेला बसला. यामुळे स्वराज्य संस्थांमध्ये काम करायला इच्छुक आणि उत्सुक असणाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांत संपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. एकिकडे महायुती आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी तयारीत आहे. कोकणात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फारसा प्रभाव नाही. मोजके कार्यकर्ते, ठरावीक तेच पुढारी कोकणात आहेत. या मोजक्या पुढाऱ्यांकडेही मोजकेच कार्यकर्ते आहेत. पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रवादीकडे कोणता कार्यक्रम नाही किंवा तसे कोणाचे प्रयत्नही नाही. यामुळे महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचा पक्षीय आलेख नेहमीच चढता राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून या आगामी निवडणुकीला सामोरे जातील हे स्पष्ट केले. त्याचवेळी महायुतीतही स्थानिक स्तरावर मैत्रीपूर्ण लढतीची शक्यताही त्यांनी नाकारली नाही. त्यामुळे आगामी स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये कोकणातही महायुतीतील सर्वच पक्षांमध्ये सर्वच स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुकांची भाऊगर्दी आहे. एका जागेसाठी अनेक इच्छुक अशी स्थिती आहे. यामुळे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी निश्चितच मोठी रस्सीखेच असेल.
भाजपाकडून कोकणात पक्षीय वाढीसाठी जोरदार प्रयत्न होत आहेत. तसे ते शिवसेना शिंदे गटाकडूनही होत आहेत. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांतील कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षात ओढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची कोकणातील स्थिती फारच नाजूक आहे. फक्त अस्तित्व आणि नावापुरतेच हे पक्ष उरले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाही कोकणात अस्तित्वासाठी धडपडत आहे. सेनेच्या नेते, पुढाऱ्यांच्या पत्रकार परिषद, पत्रक यातूनच शिवसेना उबाठाच अस्तित्व आहे. शिवसैनिकांना ऊर्जा देईल असं कोकणातील उबाठात नेतृत्व नाही. विकासातील नकारात्मकता यामुळे कोकणातील जनता शिवसेनेचे नेते फक्त विरोधासाठी विरोधाची भूमिका घेतात. हे सेना नेते, पुढाऱ्यांच्या राजकीय स्टेटमेंटवरून स्पष्ट होते. यामुळे कोकणातील महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्ष सध्या कोमात आहेत. महाविकास आघाडीतील नेतृत्व करणाऱ्यांसोबत कार्यकर्ते उरले नाहीत हे स्पष्टपणे दिसून येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारी कोणतीही मानसिकता कोकणातील महाविकास आघाडीतील नेत्यांची दिसत नाही.
पक्ष बळकट करण्यासाठी नेतृत्वाकडुन काही विधायक आणि सकारात्मक काम जनतेसमोर ठेवावं लागतं. कोकणातील जनतेच्या मनात कोकणचा विकास कोण करू शकतो याच्या संबंधीची एक विश्वासाची भावना आहे. यामुळे विकासाचा विचार आणि विश्वास महाविकास आघाडीकडून कधीच देण्यात आला नाही. कोकणच्या विकासाला मिळालेली गती, राबवण्यात आलेले प्रकल्प, प्रत्येक भागातील समतोल विकासाचा होत असलेला प्रयत्न याचा एक सकारात्मक परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दिसून येतील. महायुतीतील सर्वच पक्ष आपल्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे प्रयत्न करतील. त्यात निश्चितच चढा-ओढही असेल. मात्र, महायुती स्वराज्य संस्थामधील सत्तास्थान आपल्याकडे आहेत. तशीच ती आपल्याकडेच राहायला पाहिजेत यासाठी प्रयत्न या निवडणुकीत होतील. महाविकास आघाडीतील घटकपक्ष विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्यातून आजही सावरलेले दिसत नाहीत. यामुळेच भाजपा-शिवसेना शिंदेगट, राष्ट्रवादी अजित पवार गट जोमात आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी कोमात अशीच काहीशी आजच्या घडीची स्थिती आहे. जोमात असलेली महायुती आणि कोमात असलेली महाविकास आघाडी आगामी निवडणुकीला कोकणात कसे सामोरे जातात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.