Friday, June 6, 2025

RCB Victory Parade : RCBच्या विजयोत्सवात ११ मृत्युमुखी, चूक कुणाची?

RCB Victory Parade : RCBच्या विजयोत्सवात ११ मृत्युमुखी, चूक कुणाची?

मुख्यमंत्री सिद्धरमय्या काय बरळले ?


बंगळुरू : बंगळुरूमधलं आनंदाचं वातावरण काही क्षणातच शोकांतिकेत बदललं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पहिल्या आयपीएल विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जमलेल्या हजारो चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. चिन्नास्वामी स्टेडियमबाहरे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान या घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहेत.जखमींना बोरिंग हॉस्पिटल आणि वैदेही हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.


 

चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली?


मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबवर मोठा विजय मिळवल्यानंतर कर्नाटक क्रिकेट असोशिएशनतर्फे बंगळुरू संघाच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे बडे नेते उपस्थित राहणार होते. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सर्वच खेळाडू यात सहभागी होणार होते. यामध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हादेखील येणार होता. या सर्वांचाच या कार्यक्रमात सत्कार होणार होता. ही बाब समजल्यानंतर स्टेडियमच्या बाहरे बंगळुरू संघाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर गर्दी अनियंत्रित झाली आणि यात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला.



या अनियंत्रित गर्दीने ११ जणाचे बळी घेतले आहेत. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात काही मुलांचाही समावेश आहे. आरसीबी प्रथमच आयपीएल चॅम्पियन ठरली आणि त्याचा विजयोत्सव चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्याचं ठरलं. या जल्लोषासाठी जमलेली गर्दी अनियंत्रित झाली. अडीच लाख लोक जमतील असा पोलिसांचा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात ही संख्या तिप्पट झाली. लोकांनी पोलिसांचं आवाहन आणि सार्वजनिक सूचना धुडकावून स्टेडियमकडे धाव घेतली. लोक झुंडीने स्टेडियमकडे धावत होते. अनेकजण स्टेडियमच्या गेटचे दरवाजे ढकलत होते. फक्त पास किंवा तिकीटधारकांनाच परवानगी होती, मात्र अनेक जण केवळ उत्सवाचा भाग होण्यासाठी जमले होते. दुपारनंतर गर्दी वाढत गेली. विजयी रॅली आणि स्टेडियममधील सत्कार समारंभाची घोषणा झाल्याने चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला, मात्र पोलिसांचा अंदाज चुकला आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आलं. तर काही पोलिसांचं म्हणणं आहे की तिकीट नसणाऱ्यांवर आधीच लाठीमार केला असता तर ही आपत्ती टळली असती. असं असलं तरी चाहत्यांची वाढलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अपुरी पोलीस यंत्रणा, अपुरी व्यवस्था, चुकीचा अंदाजही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणावर धक्काबुकी होत होती. जनावरांसारखी झुंबड झाली होती. ज्यांना अंदाज आला ते कसेबसे आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होते.



या सर्व घटनेला कारणीभूत ठरली ती आरसीबीच्या विजयाची रॅली. पोलिसांनी विजयी रॅली काढू नका असा सल्ला दिला होता. त्यातच रॅली रद्द झाल्याची घोषणा झाली, मात्र हा संदेश चाहत्यांपर्यंत पोहोचला नाही आणि अवघ्या १५ मिनिटांतच चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा जीव गेला. चिन्नास्वामी स्टेडियमला मेट्रोन जाणं सहज शक्य आहे. त्यामुळे अनेक चाहते मेट्रोने चिन्नास्वामी स्टेडियमकडे गेले. मेट्रोच्या डब्यांमध्येही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते. शेवटी तीन मेट्रो स्थानकं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुढील गोंधळ टाळण्यात आला. या दु:खद घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी शोक व्यक्त केला आणि टीकाही केलीय. ही अत्यंत दु:खद घटना आहे. ११ निरपराध लोकांचा जीव गेला आणि २७ जण गंभीर जखमी झाले. प्रशासनाने गर्दीचा अंदाज लावण्यात चूक केली. विजयी रॅलीचा निर्णय चुकीचा ठरला. आम्ही यापासून धडा घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलू, असं मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी म्हटलंय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही हृदयद्रावक घटना आहे असं म्हणत दु:ख व्यक्त केलं.



कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय म्हणाले?


“चिन्नास्वामी स्टेडियम या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक येतील याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती. साधारण ३ लाख लोक विधान सौधा भागात जमा झाले होते. मैदानाची क्षमता ३५ हजार इतकीच आहे. आम्हाला वाटलं होतं की साधारण या संख्येहून काही जास्त लोक येतील. ज्या ११ जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे त्यापैकी बरेच तरुण-तरुणी आहेत.” असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment