
ऋतुराज : ऋतुजा केळकर
‘ज्ञानान्वितेषु युक्तेषु
शास्त्रज्ञेषु कृतात्मसु।
न तेषु सज्जते स्नेहः
पद्मपत्रेष्विवोदकम्॥‘
हल्ली जरा वेगळं वाचायची सवय लागलीय म्हणून म्हणा किंवा अध्यात्मिक ओढ म्हणून म्हणा पण, अचानक शेवडे सरांच्या लेखात शौनक ऋषींची ‘शौनकगीता’ याबद्दल वाचनात आले आणि त्यातीलच हा श्लोक नजरेखालून गेला आणि लक्षात आले, ‘जसे कमळाच्या पानांवर पाणी टिकून राहत नाही, तसे ज्ञानवंत, परमात्म्याशी एकरूप झालेले संत, धर्मशास्त्राचे जाणकार आणि मनाने शुद्ध असलेल्या लोकांनाही आसक्तीची बाधा होत नाही.’
मग ही आसक्ती विरहित स्थिती म्हणजेच तरी काय हा प्रश्न सहजच मनात येतोच, तर शुद्ध अध्यात्माचा सर्वोच्च सोपान म्हणजे आसक्ती विरहीत स्थिती होय. अर्थात जगताच्या मोहात न अडकता जे परमात्म्याच्या चरणी लीन झालेले आहेत आणि त्यांची वृत्ती पवित्र कमळाच्या पानासारखी असते, त्यांच्यावर सांसारिक आसक्तीचे जल हे टिकत नाही. पण जर ‘हे जग क्षणभंगुर आहे तसेच जे काही आहे, ते परमेश्वरच आहे आणि मनुष्य त्याच्या इच्छांनी आणि वासनांनी बांधला गेला की त्याचे खरे स्वरूप हरवते’ हे जर खरे आहे तर मग याचा अर्थ असा नाही की त्या आत्म्याला मुक्ती नाही. प्रत्येकाला आत्मज्ञानाची वाट खुली असते.
अर्थात आत्मज्ञानाची वाट म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधणे. जो मोहाचा त्याग करून हे सत्य शोधतो, तो स्वत:ला आणि जगाला नव्या नजरेतून पाहतो. त्याचेच जीवन हे निखळ तर होतेच शिवाय मन ही शांत होते आणि अखेरीस तो फक्त बाह्य सुखांचा गुलाम राहात नाही आणि खऱ्या आनंदाचा साक्षात्कार घेतो. अर्थात याच्या पुढचा टप्पा म्हणजे मुक्ती आणि मनशांती की जी मिळवणे दुरापास्तच, पण जो स्वतःला ओळखतो, तो कोणत्याही बाह्य परिस्थितीने विचलित होत नाही. त्याचा प्रवास सुख आणि दु:ख यांच्या पलीकडे जातो आणि तो शाश्वत सत्याशी एकरूप होतो. मग त्याचे जीवन याच तत्वज्ञानाचे प्रकटीकरण होते.
अर्थात हे प्रकटीकरण इतके सोपे नाहीच. सर्वच प्राणीमात्रांच्या जीवनात असंख्य मोह आणि आकर्षण येतात, पण जो त्यापासून मुक्त होतो, तोच खऱ्या ज्ञानाचा अधिकारी ठरतो. मग अशा जीवनक्रम करणाऱ्या मानवाचे जीवन ही भक्तिरस आणि आत्मज्ञान हेच अंतिम सत्य आहे.
आता वरील श्लोकाबद्दलच बोलायचे झाले तर सर्वच संतांच्या वचनांमध्ये एक गूढ आहे की जे, त्यांनी स्वतःच्या अनुभवातून सांगितले की, मोहमयी जगताची आसक्ती ही जसे कमळाच्या पानावर टिकू शकत नाही, तसेच ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले आहे, त्यांना या जगाची आसक्ती कधीही स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे आपणही त्यांच्या विचारांची कास धरून आपले जीवन शुद्धतेकडे नेले पाहिजे.
कसं आहे ना की, आत्मज्ञानाच्या दिव्य प्रकाशात मन निर्मळ होते आणि मोहाचे काळे ढग दूर होत जातात. ज्यांनी सत्याचा साक्षात्कार घेतला, त्यांना सांसारिक आसक्तीचा लवलेशही लागत नाही. ते नित्यमुक्त असून त्यांचे चित्त स्थिर, विचार शुद्ध आणि जीवन निर्मळच असते. जगातील मोह, माया आणि आकर्षण हे फक्त धुक्याचे आभास आहेत. जीवनाची पायवाट धूसर होत गेली की, स्मरणांची सावली मागे रेंगाळत राहते आणि क्षणभंगुरतेच्या धुक्यात हरवलेले आपलेच अस्तित्व आणि ओळखीचे चेहरे विरले की अगदी शब्द देखील अनामिक होतात आणि मग वासनांच्या सावल्यांत कोरडे पडलेले स्पर्श हे क्षितिजाच्या काठावर उभे राहून उरते ती फक्त नजरेत विरलेली चाहूल. मोहाच्या अभ्रांत चित्रात हरवलेली वाट पोहचते मोहाच्याच धूसर कवडशांत रूपांतरीत होऊन आणि हरवल्या आपल्या अस्तित्वाच्या सावलींत विरलेली वाट परत पोहोचते विस्मरणाच्या ओलसर धुक्यात लुप्त, पायवाट बनून आत्मज्ञानरूपी सूर्याच्या तेजाच्या दिशेने, त्यांना या धुक्याचा प्रभाव होत नाही. जसे कमळाच्या पानावर पाणी पडले तरी ते त्यावर टिकत नाही, तसेच आत्मज्ञानी पुरुष सांसारिक बंधनांपासून अलिप्त राहतात. त्यांच्या मनातील विचार शुद्ध, निर्मळ आणि निर्लेप असतात.
कसं आहे ना की, मोह आणि माया हे माणसाला कधीही शांत बसू देत नाहीत. एका इच्छेमधून दुसऱ्या इच्छेचा जन्म हा होतच राहतो आणि मग जीवनभर याच प्रवासात माणूस अडकतो. त्याला वाटते की, कोणत्या तरी वस्तूने त्याचे सुख पूर्ण होईल, पण तो जसे पुढे जातो, तसे नवनवीन इच्छांच्या साखळ्या त्याला अडकत असतात. पण जो आत्मज्ञानी आहे, तो या भ्रमाच्या जाळ्याला भेदतो. त्याला आनंद बाहेरून शोधावा लागत नाही. जीवनात कितीही वैभव असो, कितीही सुखसंपत्ती असो, तरी त्यांचा प्रभाव शुद्ध आत्म्याला पडत नाही. तो त्यांच्याशी एकरूप होत नाही, कारण त्याला त्यांचे खरे स्वरूप समजले आहे. या जगातील मोह आणि सुख यांचे अस्तित्व अस्थायी आहे आणि त्यांना टिकवण्याचा प्रयत्न करूनही उपयोग नाही. आत्मज्ञानी माणूस या सत्याला ओळखतो आणि तो सदा मुक्त राहतो.
म्हणूनच जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत, त्यांचे जीवन या जगाच्या क्षणभंगुर सुखांपेक्षा अनंततेच्या आनंदात विलीन झाले आहे. त्यांना मान–अपमानाचा परिणाम होत नाही, ना त्यांना धनाची हाव असते. आत्मज्ञानाची वाट ही मोहाच्या विरुद्ध जाते. या वाटेवरून चालणाऱ्या माणसाला हे जग फसवू शकत नाही. तो संसाराच्या मोहात अडकत नाही, कारण त्याच्या डोळ्यांसमोर दिव्य ज्ञानाचा प्रकाश आहे. त्याच्या आत्म्याच्या गाभ्यात निखळ सत्याचे तेज आहे. असे जीवन हेच जीवनाचे सर्वोच्च सार आहे, अखेरीस माझ्याच शब्दात सांगायचे झाले तर,