Friday, June 6, 2025

काय भुललासी वरलीया अंगा !

काय भुललासी वरलीया अंगा !

मनाचा गाभारा: अर्चना सरोदे


ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा !!
काय भुललासी वरलीया अंगा !!


संत चोखोबा मेळा महाराज यांच्या अभंगातील या ओळी... किती गाभार्थ आहे या ओळींमध्ये. ते म्हणतात “ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा.” म्हणजे ऊस जरी दिसायला चांगला दिसत नसला, वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस गोड असतो... म्हणून आपण त्याच्या वरच्या आवरणाला भुलू नये... जर आपण तसे न करता उसाच्या वरच्या आवरणाला भुललो म्हणजेच त्याचा आकार वाकडा आहे, कठीण आहे असं म्हणून जर त्याला खाऊन बघितले नाही तर त्याच्या आतल्या रसाची गोडी आपण कधीच चाखू शकणार नाही... ऊस आपण सगळेच खातो, त्याचा रस ही सगळे पितात; परंतु संत चोखोबांनी उसामधील गुण बघितले ते त्यांनी अभंगांमध्ये सहजपणे मांडले... किती सोप्या शब्दांत त्यांनी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन उलगडून सांगितला आहे.


रंग, रूप, आकार ही सगळी बाह्य आवरणे आहेत. आपण नेमकं या आवरणांना भुलतो. अंतर्गुणांच मूल्यांकन करतच नाही.


बाजारात आपण एखादी वस्तू खरेदी करताना ती नीट पडताळून पाहातो, त्याचं मूल्यांकन करतो आणि मगच आपण ती खरेदी करतो. त्याचप्रमाणे जीवन जगताना आपल्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींची किंवा व्यक्तींची पडताळणी करणे किंवा मूल्यांकन करणे गरजेचे आहे. काही गोष्टी कितीही सुंदर दिसत असल्या, तरी गरजेचे नाही की त्या तशाच असल्या पाहिजेत त्यांचे मूल्यांकन केल्यास समजतं की आपण समजलो त्यापेक्षा कितीतरी पटीने त्या गोष्टीचे मूल्यांकन कमी आहे; परंतु काही गोष्टी आपल्याला नकोशा वाटल्या, आवडत नसल्या तरी त्याचे मूल्यांकन केल्यास समजतं की आपण समजलो त्यापेक्षा कितीतरी पटीने त्या गोष्टींचे मूल्यांकन अधिक आहे. आपल्या डोळ्यांना दिसलेल्या प्रत्येक गोष्टीचे बाह्य स्वरूप जितके सुंदर आहे तितकेच तिचे अंत:स्वरूप देखील सुंदर असेल असे नाही ते कुरुप ही असू शकते. तसेच आपल्या डोळ्यांना दिसलेल्या प्रत्येक गोष्टीचे बाह्य स्वरूप जितके कुरुप तितकेच तिचे अंत:स्वरूप कुरुपच असेल असे नाही ते सुंदर ही असू शकते. हीच गोष्ट आपल्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तींसाठी लागू होते. आपल्या आयुष्यात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कितीतरी व्यक्ती येतात, जातात पण आपण त्यांना पडताळून पाहात नाही किंवा त्यांच्यातील गुणांचे मूल्यांकन करत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे “जे चकाकते ते सारे सोने नसते” ही म्हण आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगाची आहे. आपल्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्ती मग त्या ओळखीच्या असोत अथवा अनोळखी असोत आपण त्यांचे स्वरूप अथवा चरित्र त्यांच्या वरवरच्या दिसण्यावर ठरवू नये. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला अनेक लोक भेटतात. सुरुवातीला ते लोक खूप प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण व्यवहार आपल्याबरोबर ठेवतात; परंतु जेव्हा आपण त्यांना ओळखायला लागतो तेव्हा आपल्याला त्यांच्यातले गुण, त्यांचा स्वभाव दिसू लागतो आणि तेव्हा कळतं की ते जे दिसत होतं ते फसवं होतं. त्यांचे खरं अंत: स्वरूप त्यांच्या बाह्य स्वरूपा आड बनावट मुखवट्यामागे लपलेलं होतं. त्याचप्रमाणे, आपल्याला बाजारात अनेक आकर्षक वस्तू आढळतात. आपल्याला त्या खरेदी करून घरी आणण्याची इच्छा होते; परंतु जेव्हा आपण त्यांचा वापर सुरू करतो तेव्हा आपल्याला लवकरच लक्षात येते की त्या वस्तू वरून चांगल्या दिसत असल्या तरी त्या कमी दर्जाच्या आहेत आणि म्हणूनच आपण कोणावरही सहज विश्वास ठेवू नये. एखाद्या व्यक्तीशी जवळचे नाते निर्माण करण्यापूर्वी आपण त्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे. तेव्हाच आपण त्या व्यक्तीला पडताळून पाहू शकतो. त्या व्यक्तीच्या गुणांचे मूल्यांकन करू शकतो. त्याचप्रमाणे आपण फक्त चांगली दिसते म्हणून एखादी वस्तू खरेदी करू नये. आपण तिचे मूल्यांकन केले पाहिजे, तिची गुणवत्ता आणि उपयुक्तता तपासली पाहिजे आणि त्यानंतरच आपण ती खरेदी केली पाहिजे. नोकरी आणि व्यवसायाच्या संधींसाठी आणि जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रासाठी हे सूत्र वापरले पाहिजे. दूरवरून अनेक गोष्टी चांगल्या आणि आकर्षक वाटत असल्या तरी त्यांचे वास्तव पूर्णपणे वेगळे असते. त्याचप्रमाणे ज्या गोष्टी निकृष्ट दर्जाच्या वाटतात वास्तविक पाहता त्या गोष्टी उच्च दर्जाच्या असतात.


नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, जे वाईट दिसते ते प्रत्यक्षात चांगले असू शकते आणि जे शाप वाटते ते प्रत्यक्षात वरदान असू शकते. चुकीच्या गोष्टींवर अथवा व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याची काळजी घेत असताना, हे लक्षात घेतले पाहिजे की योग्य गोष्टी किंवा व्यक्तींवर विश्वास न ठेवणे ही देखील एक सर्वात मोठी चूक असू शकते आणि म्हणूनच जीवनात प्रत्येक गोष्टीचे मूल्यांकन करणे, त्या गोष्टीची गुणवत्ता तपासणे हे अतिशय गरजेचे आहे...

Comments
Add Comment