Friday, June 6, 2025

काजव्यांच्या चकाकण्याचा करिष्मा बघण्यासाठी अभयारण्यात गर्दी

काजव्यांच्या चकाकण्याचा करिष्मा बघण्यासाठी अभयारण्यात गर्दी

अकोले : काजव्यांची मायानगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदर्‍याच्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजव्यांना बहर आला असून हजारो पर्यटक काजव्यांच्या चकाकण्याचा करिष्मा बघण्यासाठी अभयारण्यात गर्दी करू लागली आहेत .


अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणारे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य म्हणजे काजव्यांचे माहेरघर समजले जाते.याच माहेरघरात मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोट्यावधींच्या स्वरूपात अनेक झाडे काजव्यांनी लगडलेली दिसुन येतात.काजव्यांचा हा प्रजनन काळा असुन नर मादीला आकर्षित करण्यासाठी चमकत असतो.काजव्यांचा हा चकण्याचा करिष्मा बघण्यासाठी हजारो पर्यटक भंडारदर्‍याला आवर्जून भेट देत असतात.


ग्रीष्म ऋतू संपतो न संपतोय तोच वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रूपात धरतीवर अवतरलीय की काय? असा विचार मनात चमकून जातो. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलंय.इथे रात्रच चांदण्यांची झालीय असा आभास ,काजव्यांची मायावी दुनिया निर्माण करते. काजव्यांच्या अस्तित्वाने रात्रीच्या प्रकाशाचा अदभूत खेळ तासनतास पाहत बसलो तरी मन काही त्रुप्त होत नाही.असा हा काजव्यांचा अमाप महीमा असुन काजव्यांचा हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड अभयारण्यात पाहायला मिळते आहे.ह्यावर्षी भंडारदर्‍याला लवकरच काजव्यांची चाहूल लागली.मात्र अवकाळी पावसाने या काजव्यांवरच गदा आणली.काही काळ पावसामध्ये काजवे कुठे गायब झाले हे समजायला मार्ग नव्हता.भंडारदर्‍याला खास काजवे बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या पदरी निराशा पडली होती .


मात्र दोन दिवसापूर्वी भंडारदर्‍याचे वातावरण कोरडे झाले आणि पुन्हा एकदा काजव्यांची चकाकी भंडारदर्‍याच्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात हिरडा, सादडा,बेहडा,आंबा,जांभुळ या झाडावर बघावयास मिळू लागला.कोट्यावधीच्या स्वरूपाने काजवे या झाडांवर चमकताना दिसून येत आहेत.भंडारदर्‍याला काजवे बघण्यासाठी होणारी पर्यटकांची गर्दी बघता वन विभाग मात्र सतर्क झाले असून काजवे बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्याकडून काजव्यांना कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेत काजवे बघण्यासाठी अभयारण्यात सोडत आहेत.प्रत्येक वाहनाची काळजीने तपासणी टोल नाक्यावर होताना दिसून येत आहे.अभयारण्यामध्ये गाड्यांच्या प्रकाशाचा काजव्यांवर परिणाम होणार नाही याचीही दक्षता घेण्याचा प्रयत्न वन्यजीव विभागाने केलेला दिसतोय.ठिकठिकाणी वाहनतळ उभारण्यात आले असून या ठिकाणावरूनच काजवे बघण्यासाठी पर्यटकांना पायी प्रवास करावा लागतोय.


थोडक्यातच यावर्षी अभयारण्य अलर्ट मोडवर आलेले दिसून येते.भंडारदर्‍याला असंख्य पर्यटक काजवा बघण्यासाठी येण्याच्या निमित्ताने गर्दी करत असतानाच पोलीस प्रशासन मात्र या काजव्यांच्या महोत्सवाकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येते.फक्त आम्ही आहोत हीच भूमिका राजुरच्या पोलीस प्रशासनाची दिसून येत आहे.भंडारदर्‍यासारख्या पर्यटन स्थळावर पोलिसांची गरज असताना एकही पोलीस भंडारदर्‍याला का फिरकत नाही हा मोठा प्रश्न पर्यटकांसह सामान्य नागरिकांनाही पडला आहेएखादी अघटीत घटना जर या कालावधीत भंडारदरा पर्यटन स्थळावर जर घडली तर याला जबाबदार कोण . पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे भंडारदरा पर्यटन स्थळावर पोलिसांकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते का असाही प्रश्न आता काजवा प्रेमींना पडला आहे.

Comments
Add Comment