Thursday, June 26, 2025

Shashi Tharoor : 'भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही', राहुल गांधींच्या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया

Shashi Tharoor : 'भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही', राहुल गांधींच्या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया

राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत


वॉशिंग्टन : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या 'सरेंडर' विधानावर राजकीय वर्तुळात सतत चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांच्या विधानावरून भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही राहुल गांधी यांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे.



भारताला मध्यस्थीची आवश्यकता नाही


ऑपरेशन सिंदूरबाबत जगभरातील देशांना माहिती देण्यासाठी शशी थरूर यांची टीम सध्या अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान शशी थरूर यांनी राहुल गांधींच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली. काँग्रेस खासदार शशी थरूर यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारताना, ”हा असा प्रश्न आहे ज्यावर तुमचा पक्ष सतत प्रश्न विचारत आहे. कालच, तुमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी ट्रम्पसमोर शरण गेले आहेत?” असे विचारेल. या प्रश्नाच्या उत्तरात शशी थरूर म्हणाले की, आम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा आदर करतो. असे म्हणू शकतो की, आम्ही कोणालाही मध्यस्थी करण्यास सांगितले नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाची भाषा करत राहील, तोपर्यंत आम्हालाही पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल. भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही. जर त्यांना दहशतवादासाठीच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करायच्या असतील, तरच त्यांच्याशी चर्चेचा विचार केला जाऊ शकतो. पाकिस्तानला भारताशी सामान्य संबंध हवे आहेत हे त्यांनी दाखवून दिले, तर संवाद करण्यास हरकत नाही. परंतु, यासाठी भारताला कोणत्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही. आम्हाला थांबायला सांगण्याची गरज नव्हती, असे शशी थरूर यांनी नमूद केले.



दरम्यान, मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परराष्ट्र धोरण आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी तिथून फोन केला आणि म्हणाले की, मोदीजी काय करत आहात? नरेंदर, सरेंडर, त्यानंतर जी हुजूर म्हणत नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याचे पालन केले. तुम्हाला एक काळ माहिती असेल जेव्हा फोन नाही तर सातवे आरमार आले होते. मात्र तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, मला जे करायचे आहे ते मी करेन. हाच फरक आहे. यांचे व्यक्तिमत्त्वच असे आहे. यांना स्वातंत्र्याच्या काळापासून सरेंडरवाले पत्र लिहिण्याची सवय आहे. थोडासा दबाव आला की, हे लोक लगेच सरेंडर करतात. काँग्रेस पार्टी सरेंडर करत नाही. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल. ही मंडळी सरेंडर करणारी नाही तर महाशक्तीसोबत लढणारी होती.

Comments
Add Comment