Friday, June 6, 2025

ब्रह्मर्षी अंगिरस

ब्रह्मर्षी अंगिरस

भारतीय ऋषी: अनुराधा कुलकर्णी


आपल्या कौटुंबिक जीवनात जसे आपल्या आजोबांचे मानाचे, जिव्हाळ्याचे स्थान असते, तसेच आपल्या वैचारिक, बौद्धिक जीवनात ऋषींना स्थान आहे. ऋषी म्हणजेच ज्ञानाचा, पावित्र्याचा, साक्षात्कारी अनुभवांचा साठा होय, अशीच आपल्या मनात त्यांची प्रतिमा असते आणि ती खरीही आहे. एकेक ऋषी म्हणजे एकेक ज्ञानपीठ होय. या ऋषींकडे त्यांचे हजारो निवासी शिष्य असत. त्यांच्याकडून कठोर अध्ययन साधना करवून घेत ऋषींनी आपली ज्ञानगंगा प्रवाहित ठेवली. वेदमंत्रासारख्या दिव्य वाङ्मयाची शास्त्रशुद्ध संथा हे ऋषी आपल्या शिष्यांना देत असत. या शिष्यांचे अध्ययन पूर्ण झाले की, ते स्वतःच्या शिष्यांकरवी ही ज्ञानपालखी पुढे नेत असत. अशा या शिष्यपरंपरेने ऋषिप्रणित सर्व साहित्य आजही संजीवन राहिले आहे. या महान ऋषींचे फक्त आध्यात्मिक विषयावरच ग्रंथ आहेत असे नसून ज्ञानविज्ञानाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे प्रबुद्ध वाङ्मय आहे. वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र, औषधशास्त्र, स्थापत्य, खगोलशास्त्र, ज्योतिष, साहित्य, कला सर्वातच त्यांचे बहुमोल लेखन आहे आणि ते आजही उपलब्ध आहे.


आज आपण एका अत्यंत तेजस्वी ऋषीवरांची माहिती घेऊ या. त्यांचे नाव अंगिरस. हे ब्रह्माचे मानसपुत्र होत. यांची निर्मिती साक्षात अग्निदेवातून झाली, असे मानतात. अंगिरसांनी प्रदीर्घ काळ परब्रह्माचे ध्यान करीत तपश्चर्या केली. त्यामुळे त्यांना ब्रह्मतेज प्राप्त झाले होते. दक्ष प्रजापतीच्या कन्या स्मृतीव स्वधा यांच्याशी अंगिरसांचा विवाह झाला होता. यांना दहा पुत्र आणि सात कन्या होत्या. देवगुरु बृहस्पती अंगिरस ऋषींचेच पुत्र होत.


पृथ्वीवरील अग्नीचा शोध अंगिराऋषींनी लावला असे अत्रीमहर्षी म्हणतात,


जत्वां अग्ने अंगिरसः गुहा हितं अनु अविन्दन् शिश्रियाणं वने वने ।
सः जायसे मध्यमानः सहः महत् त्वां आहुः सहसः पुत्रं अंगिरः ।।ऋ.मं.५सू.१०.६


हे अग्ने अरणीरूप गुहेमध्ये गुप्त असलेल्या व वृक्षावृक्षामध्ये राहणाऱ्या तुला अंगिराऋषींनी शोधून प्राप्त करून घेतले. दोन अरण्या एकमेकींवर सामर्थ्यपूर्वक घासून तू निर्माण होऊ शकतोस, याच कारणाने अंगिरा ऋषींनी तुला “बलपुत्र’’ संबोधिले आहे.


अग्निपुत्र असलेले अत्यंत तेजस्वी ऋषी म्हणजे अंगिरस महर्षी हे होत. अग्नीतून निर्माण झाल्याने त्यांना अंगिरस नाव मिळाले. ऋग्वेदात अंगिरसाच्या ऋषिकुळाचा गौरव केला असून सर्व आंगिरस ब्रह्मस्तोत्रे गाणारे व ब्रह्मदेवाचे पुरोहित आहेत, असे मंत्रद्रष्ट्या वसिष्ठांनी म्हटले आहे (७.४२) तसेच ऋग्वेदाच्याच दहाव्या मंडलातील बासष्टाव्या सूक्तात वेदमंत्रद्रष्टे मनुपुत्र नाभानेदिष्ठ यांनी अंगिरसांचे स्तवन केले आहे,


ये ऋतेन सूर्य आरोहयन् दिवि अप्रथयन् पृथिवीं मातरं वि ।
सुप्रजास्त्वं अंगिरसः वः अस्तु प्रति गृभ्णीत मानवं सुमेधसः ।।ऋ. मं.१०सू.६२.३


हे बुद्धिमान अंगिरस कुलोपन्न ऋषींनो, तुम्ही तुमच्या सत्यस्वरूप यज्ञीय सामर्थ्याने सर्वप्रेरक सूर्याची द्यू लोकात स्थापना केली आहे, सूर्यासारखेच तुम्ही जगात तळपत आहात. सर्व निर्मात्या भूमातेला तुम्ही तुमच्या सत्कार्यरूप यज्ञकर्मांनी समृद्ध व कीर्तिमान केले आहे. तुमच्या दिव्य संस्काराने तुम्हाला उत्तमच संतती प्राप्त होईल. मनुपुत्र नाभानेदिष्ठाचा तुम्ही कृपा करून स्वीकार करा. अंगिरस हे स्वायंभुव मन्वतरातील सप्तर्षींपैकी एक. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. यांची ब्रह्माच्या डोक्यापासून उत्पत्ती झाली. हे ब्रह्म्याचे ज्येष्ठ पुत्र. यांना प्रजापतीही म्हणतात. भाद्रपद शुक्ल पंचमी ही अंगिरा (अंगिरस) जयंती. हिलाच ऋषीपंचमीही म्हणतात. अंगिरस चारही वेदांचे तज्ज्ञ होते. उपनिषदे, व्याकरण, पुराणे यातही त्यांचे कार्य होते. ते शंकराच्या वरदानाने उत्पन्न झाले.


(पूर्वार्ध)
(Email - [email protected] <mailto:[email protected]>)

Comments
Add Comment