
बंगळूरू: बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते.आरसीबी संघासह संघाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटचे मॅनेजर डिएनए कंपनी तसंच कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगळुरू येथील कब्बन पार्क पोलिसांनी तिन्ही संस्थांविरोधात निष्काळजीपणाबद्दल गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा भारतीय दंड संहितामधील कलम 10, कलम 118 आणि कलम 120 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.आज(दि ५) सकाळी, बंगळुरू अर्बनचे उपायुक्त आणि जिल्हाधिकारी जी. जगदीशा यांनी सांगितले की, चेंगराचेंगरीच्या घटनेच्या अन्वेषणाचा भाग म्हणून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, सार्वजनिक हमी आणि विनियमन संचालनालय, तसेच बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
सिद्धरामय्या सरकारने जी. जगदीशा यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, ते आरसीबीच्या आयपीएल विजयी परेड दरम्यान घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची मॅजिस्ट्रेट स्तरावरील चौकशीचे नेतृत्व करत आहेत.ते म्हणाले की, कार्यक्रमाच्या नियोजन, आयोजन आणि सुरक्षा व्यवस्थेत सहभागी असलेल्या विविध संस्थांची भूमिका समजून घेण्यासाठी आणि सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी या नोटिसा बजावल्या जात आहेत.दरम्यान, राज्य सरकार चेंगराचेंगरीच्या घटनेचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्याचा विचार करत आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने चेंगराचेंगरीच्या घटनेची स्वयं-संज्ञानाने दखल घेतली आणि राज्य सरकारला नोटीस जारी करत मंगळवार (दि.१०) पर्यंत या घटनेबाबत सविस्तर स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले. यावेळी न्यायालयाने सार्वजनिक कार्यक्रमांमधील सुरक्षितता आणि गर्दी नियंत्रण उपाययोजनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.
सुनावणीदरम्यान, कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले की कार्यक्रमाच्या ठिकाणी शहर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त यांसह 1,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले, “साजरा करण्याच्या हेतूपासून शोकांतिका घडली आहे. आम्ही या घटनेची स्वयं-संज्ञानाने दखल घेत आहोत, जेणेकरून या घटनेची कारणे समजू शकतील, ती टाळता आली असती का आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, हे निश्चित करता येईल.”
आयपीएलच्या १८ व्या सिझनमध्ये आरसीबीनं करंडक जिंकला. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच या संघाला विजय मिळवता आल्यानं त्यांच्यासाठी ही ऐतिहासिक खेळी ठरली. त्यामुळे कर्नाटक सरकारनं आरसीबीच्या स्वागतासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यासाठी स्टेडियमबाहेर लाखोंच्या संख्येनं आरसीबीचे समर्थक गोळा झाले होते. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली आणि त्यात ११ जणांनी प्राण गमावले. यावरुन या कार्यक्रमाच्या आयोजकांवर तसंच कर्नाटक सरकारवर टीकेची झोड उठली होती.