
म्हाडाच्या राज्यातील विविध मंडळाच्या अखत्यारीत एक ते सात जुलै दरम्यान वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. जिथे बांधकाम किंवा कोणताही विकास करता येत नाही अशा भूखंडांवर प्रामुख्याने मियावाकी पद्धतीने घनदाट शहरी जंगले निर्माण करण्यासाठी वृक्षारोपण केले जाणार आहे. कमी जागेत अधिक झाडे लावून जैवविविधता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
म्हाडाचा जो विभाग वृक्षारोपण करेल, तोच विभाग संबंधित झाडाची दीर्घकाळ काळजी घेणार आहे. लागवड केल्या जाणाऱ्या सर्व झाडांना जिओ टॅग केले जाईल. म्हाडाच्या ज्या प्रकल्पांमध्ये झाडे तोडावी लागतील तिथे झाडांची पुनर्लागवड बंधनकारक करण्याबाबत एक परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे. प्रारंभी सदर बाब फक्त मुंबईसाठी लागू असेल आणि नंतर इतर विभागीय मंडळांमध्येही हे लागू करण्यात येईल; असे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल म्हणाले.
पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या म्हाडाच्या विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातही प्रत्येकी २५ हजार झाडे लावण्याचे आवाहन संजीव जयस्वाल यांनी केले आहे.