Thursday, June 5, 2025

बालगुन्हेगारी: मानसिक स्थिती आणि विकृती...

बालगुन्हेगारी: मानसिक स्थिती आणि विकृती...

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे


आजकाल लहान मुले आणि तरुण पिढीमध्ये गुन्हेगारीची वाढती प्रवृत्ती, अवैध शस्त्रांची सहज उपलब्धता आणि अमली पदार्थांचे वाढते व्यसन ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. या प्रश्नांची सखोल माहिती घेणे, त्यांची कारणे समजून घेणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. लहान मुलांची मानसिकता, त्यातील विकृती आणि भावनिक अस्थिरता हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तरी या लेखातून आपण यामागील कारणे, उपाययोजना यावर प्रकाश झोत टाकणार आहोत.


भावनिक अस्थिरता आणि मानसिक विकृती : हा एक लक्षात घेण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. काहीवेळा भावनिक अस्थिरता, मानसिक आजार किंवा व्यक्तिमत्त्व विकृती (Personality Disorders) यांमुळे व्यक्ती हिंसक होऊ शकते आणि शस्त्रांचा वापर करू शकते. समूह मानसिकता (Group Mentality) टोळी किंवा गटाचा भाग असताना, गटाच्या दबावाखाली किंवा गटाची निष्ठा सिद्ध करण्यासाठी तरुण हिंसक कृत्ये करण्यास तयार होतात.


सहानुभूतीचा अभाव (Lack of Empathy) : इतरांच्या भावना आणि वेदनांची जाणीव नसणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे, कोणाचीही दया न येणे, कसलीच तमा न वाटणे हे हिंसक वर्तनाचे एक महत्त्वाचे कारण आहे. हिंसक चित्रपट, व्हीडिओ गेम्स आणि सोशल मीडियावरील हिंसक दृश्यांचा तरुणांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. यातून त्यांना हिंसेबद्दल आकर्षण वाटू शकते किंवा हिंसक वर्तन सामान्य वाटू शकते, मारामारी, खून, शारीरिक नुकसान, रक्तपात, डेड बॉडी याबद्दलची त्यांची नजर मरून जाते.


बालपणीचे वाईट अनुभव गाठीशी असल्यास मुलं बाहेरील चुकीच्या व्यक्ती, प्रवृत्तीकडे लवकर आकर्षित होतात. कौटुंबिक हिंसाचार, दुर्लक्ष किंवा इतर वाईट अनुभवांमुळे मुलांच्या मनात राग, द्वेष आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते, जी पुढे जाऊन हिंसक वर्तनात बदलू शकते. आपल्या घरात, कुटुंबात, आयुष्यात काहीच चांगलं सुरू नाहीये, आजूबाजूच्या परिसरात पण सातत्याने भांडणे, शिवीगाळ, हाणामारी, आजारपण पाहून या मुलांचा आयुष्यातील सकारात्मक भावनांवरील विश्वास निघून जातो. यावर आपण काय उपाययोजना करणे आवश्यक आहे याचा वेध घेतला असता, बाल गुन्हेगारी, शस्त्रांचा वापर आणि अमली पदार्थांचे व्यसन या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यापक आणि बहुस्तरीय उपाययोजना करणे आवश्यक आहे.


कौटुंबिक स्तरावर पालकांनी मुलांशी संवाद साधणे, मोकळा संवाद साधणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक आदर्श घालून देणे महत्त्वाचे आहे. पालकांनी स्वतः मुलांसमोर चांगले आदर्श ठेवणे, वेळेवर गांभीर्याने कोणत्याही घटनेकडे लक्ष देणे, मुलांच्या सवयी, मित्र-संगत आणि त्यांच्या वागणुकीतील बदलांवर पालकांनी बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलांना लहानपणापासूनच नैतिक मूल्ये, योग्य-अयोग्य यातील फरक आणि इतरांप्रती सहानुभूती शिकवावी.


शैक्षणिक स्तरावर जागरूकता कार्यक्रम राबवणे, शाळा आणि कॉलेजांमध्ये शस्त्रांचे आणि अमली पदार्थांचे दुष्परिणाम, कायदेशीर बाबी आणि मानसिक आरोग्याविषयी नियमितपणे जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे, सल्ला आणि मार्गदर्शन केंद्रे यांची मदत घेणे खूप महत्त्वाचे आहे. शाळा-कॉलेजांमध्ये समुपदेशन (Counseling) आणि मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करून विद्यार्थ्यांना मानसिक आधार द्यावा. शैक्षणिक संस्थांमध्ये सकारात्मक आणि सुरक्षित वातावरणाची निर्मिती करावी, जिथे विद्यार्थी स्वतःला व्यक्त करू शकतील.


सामाजिक स्तरावर सुद्धा या मुलांसाठी अनेक प्रयत्न केले जावू शकतात. सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग यामध्ये मदत करू शकतो. या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या माध्यमातून जनजागृती आणि व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे.


सार्वजनिक ठिकाणी, शाळा, कॉलेज परिसर आणि तरुणांच्या इतर गर्दीच्या ठिकाणी पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी कडक नजर ठेवणे, अशा मुलांविरुद्ध आलेल्या तक्रारीची ताबडतोब दखल घेऊन कारवाई करणे, त्यांच्या पालकांना देखील समज देणे यावर भर द्यावा. समाजात यशस्वी आणि सकारात्मक जीवन जगणाऱ्या व्यक्तींना तरुणांसमोर आदर्श म्हणून प्रस्तुत करावे. शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधी युवकांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासकीय पातळीवार, उद्योजक यांच्यामार्फत देण्यात यावी.


कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर कायद्याची कठोर अंमलबजावणी अवैध शस्त्रे आणि अमली पदार्थांशी संबंधित कायद्यांची कठोर अंमलबजावणी करावी. गुन्हेगारांना वेळेवर आणि योग्य शिक्षा व्हावी. अवैध शस्त्रे आणि अमली पदार्थांचे स्रोत उद्ध्वस्त करणे, पोलीस आणि इतर तपास यंत्रणांनी अवैध शस्त्रे आणि अमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी आणि विक्री करणारे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. व्यसनाधीन व्यक्तींना योग्य उपचार आणि पुनर्वसनाची सोय उपलब्ध करून द्यावी.


बाल न्याय मंडळाची प्रभावी भूमिका बाल गुन्हेगारांच्या बाबतीत बाल न्याय मंडळाने (Juvenile Justice Board) संवेदनशीलतेने आणि कायद्यानुसार योग्य कारवाई करावी, जेणेकरून त्यांना सुधारण्याची संधी मिळेल. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या शस्त्रांच्या किंवा अमली पदार्थांच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सायबर पोलिसांना अधिक सक्षम करावे. या समस्यांवर मात करण्यासाठी पालक, शिक्षक, समाज, शासन आणि स्वतः तरुण पिढी या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य हस्तक्षेप आणि मदतीमुळे अनेक तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवता येऊ शकते आणि त्यांना एक उज्ज्वल भविष्य मिळू शकते.


[email protected]

Comments
Add Comment