
भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उघड केले सत्य
बीड: बीड जिल्ह्यांतून उसतोड महिला मंजुरांचं एक भयान वास्तव समोर आलं आहे. इथल्या ८४३ महिला ऊसतोड कामगारांनी शेतात जाण्यापूर्वी गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली आहे. ऊसतोड महिलांच्या अशाप्रकारे गर्भपिशव्या काढल्या संबंधित धक्कादायक बाब भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उघड केली आहे.
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यामधील ही बातमी माणुसकीला काळीमा फासणारी आहे. बीडमध्ये दरवर्षी १ लाख ७५ हजार मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात. यापैकी ७८ हजार मजूर या महिला आहेत. तर त्यामधील ८४३ महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही माहिती किती खरी आहे, याबाबत चित्रा वाघ यांनी या घटनेची पडताळणी केली, तेव्हा अनेक गोष्टी नव्याने उघड झाल्या.
मलाही एक स्त्री म्हणून हे खूप जिव्हारी लागलं. पण जेव्हा मी सत्य तपासलं, तेव्हा लक्षात आलं की ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या.
यांपैकी बऱ्याच शस्त्रक्रिया या वैद्यकीय कारणांमुळे, वेगवेगळ्या वर्षांत झालेल्या आहेत. 2019 पासून तर महिलेला वैद्यकीय गरज असली तर बिड शल्य चिकित्सकाच्या अधिकृत परवानगीशिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत. या शस्त्रक्रियांचा कालावधी हा ऊसतोड हंगामाच्या लगतच्या नाहीत. असं त्यांनी सांगितलं आहे.
उठसूठ कोणीही गर्भपिशवी काढू शकत नाहीच- चित्रा वाघ
ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी २०१९ पासून काही नियम आणि खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शासनाने काही नियम बनवले आहेत. आता उठसूठ कोणीही गर्भपिशवी काढू शकत नाहीच. जर कोणत्या महिलेला गंभीर त्रास असेल फक्त तेव्हाच बीड जिल्हा शल्य चिकित्सकांची पुर्वपरवानगी घेऊनच तपासणी करून मग गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते अस चित्रा वाघ यांनी सांगितले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, " ८४३ महिला उसतोड मजूरांपैकी २६७ महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही २०१९ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये महिलेला तशी वैद्यकीय गरज असल्यास तपासणीनंतर शल्य चिकित्सकाच्या पूर्वपरवानगीनेच झालेल्या आहेत. उर्वरित ५७६ महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही २०१९ पुर्वीच झालेल्या आहेत." त्यामुळे महिला आणि आरोग्य यांसारख्या संवेदनशील विषयांवर बातम्या देताना एकूण शहानिशा करूनच माहिती प्रसारित करण्याची विनंती प्रसारमध्यमांना चित्रा वाघ यांनी केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. जिथे ऊसतोडणी कामगारांची संख्या मोठी आहे.महाराष्ट्रात ऊसतोडणीच्या कामातला महिलांचा सहभाग पुरुषांच्या बरोबरीचा दिसून येतो. या महिलांना कष्टाची ३५ ते ४० किलोची मोळी उचलावी लागते. बाळंत झाल्यावरही काम करावं लागतं. ऊसाच्या फडातं कुठलीही सोय नसते. डोक्यावर मुकादमांकडून घेतली उचल असतं. उचलीच्या फेडण्याचा दबाव. या कामात त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्यांना कंबर, ओटीपोट दुखणे, अंगावरून जाणे, मासिक पाळीचे आणि इतर बरेच आजार होतात. यामुळं महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. ८४३ गर्भाशय काढून टाकण्याच्या प्रकरणांमध्ये ४७७ महिलांनी मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव, संसर्ग आणि पोटदुखी अशी लक्षणे नोंदवली गेलेली आहेत.
वर्ष २०१९च्या सुरुवातीला महिला ऊसतोड कामगारांमध्ये गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनात आले होते. त्यानंतर हा मुद्दा वेगवेगळ्या पातळीवर उचलून धरला आणि त्यावर चर्चाही घडवून आणल्या.
मात्र, चित्रा वाघ यांच्या स्पष्टीकरणानंतर बऱ्याच प्रश्नांना पूर्णविराम मिळाला असून, या प्रकरणाची खरी बाजूदेखील उघड झालेली आहे.