पाकची धमकी, भारताकडून वाटाण्याच्या अक्षता
भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलं तरी पाण्यावरून सुरू झालेलं युद्ध अधिक तीव्र झालंय. भारताने १९६०च्या सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली आणि पाकिस्तानात खळबळ उडाली. दुसरीकडे पाकिस्तानने चीनच्या मदतीने ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावर बंदी घालण्याची भीती दाखवलीय. मात्र पाकिस्तानचे हे कारनामे खोटे असल्याचे भारताचे म्हणणे आहे. युद्धविरामानंतरही भारत - पाकिस्तान यांच्यात नेमकं काय सुरू आहे.
जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये १९६० मध्ये सिंधू पाणी करार झाला. या करारानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळतं, तर सतलज, बियास आणि रावी नद्यांचा पाण्याचा वापर भारत करतो, मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला. याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या शेतीवर आणि पाणीपुरवठ्यावर होणार आहे.
भारत - पाकिस्तानमधील जलविवाद टाळण्यासाठी सिंधू पाणीवाटप करार करण्यात आला. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी भारताने सिंधू करार स्थगित केला. त्यातच आता सिंधू आणि झेलम नद्यांमधील पाण्याची पातळी कमालीची घसरलीय. याचा परिणाम पाकिस्तानमधल्या शेतीवर होणार आहे. सुमारे १ कोटी ६० लाख हेक्टर शेतजमीन धोक्यात आलीय. कराची आणि लाहोरसारख्या मोठ्या शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. सिंधू नदीवर अवलंबून असलेल्या जलविद्युत प्रकल्पांमुळे पाकिस्तानच्या २५ टक्के वीजनिर्मितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो.
भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावरून नवीन मुद्दा उपस्थित केलाय. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे समन्वयक राणा इहसान अफझल यांनी ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखण्याचा इशारा दिलाय. भारताने सिंधू नदीचं पाणी रोखलं, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखू शकतो, असा पाकिस्तानचा व्होरा आहे. खरं तर पाकिस्तानचा ब्रह्मपुत्रा नदीशी काही संबंध नाही. कारण ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमधील यारलुंग त्संगपो नदी म्हणून ओळखलं जातं. हीच ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते आणि आसाममधून बांगलादेशात जाते. डिसेंबर २०२४ मध्ये चीनने यारलुंग त्संगपो नदीवर जगातील सर्वात मोठं जलविद्युत धरण बांधण्याची घोषणा केली. या धरणामुळे भारतात विशेषतः पावसाळ्यात पुराचा धोका वाढू शकतो. चीन मोठ धरण बांधणार असला तरी ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी पूर्णपणे रोखण्याची चीनची योजना नाही. तरीही पाकिस्तानच्या ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखण्याच्या धमकीमुळे भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. चीनचं धरण भारतासाठी चिंतेचा विषय असला तरी पाणी पूर्णपणे रोखणं तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे. तसं केल्यास पर्यावरण आणि भौगोलिक परिणामांचा धोका निर्माण होऊ शकतो.
श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी ( ६ जून) जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरला रेल्वेने जोडण्याकरिता बांधण्यात आलेला जगातील सर्वात उंच ...
पाकिस्तानचा खोटा प्रचार
पाकिस्तानच्या या धमकीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हा पाकिस्तानचा खोटा प्रचार आहे. ब्रह्मपुत्रा नदीचं ६५ ते ७० टक्के पाणी हे पाऊस आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्यांमुळे तयार होतं. चीनमधून फक्त ३०ते ३५ टक्के पाणी येतं. तसंच चीनने पाणी रोखलं तरी आसाममधील पूर कमी होण्याचीच शक्यता आहे. याचा फायदा स्थानिकांना होईल, असं हिमंता बिस्वा यांनी एक्स पोस्टवर लिहिलंय आणि पाकिस्तानचा मुद्दा खोडून काढलाय. भारत-चीन सीमेवर तुतिंग या ठिकाणी ब्रह्मपुत्रेचा प्रवाह २,००० ते ३,००० घनमीटर प्रतिसेकंद आहे, तर गुवाहाटीत तो १५,००० ते २०,००० घनमीटर प्रतिसेकंदापर्यंत वाढतो. त्यामुळे चीनने पाणी रोखलं तरी भारतावर फारसा परिणाम होणार नाही, असा दावाही हिमंता बिस्वा यांनी केलाय. चीनच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाकिस्तान भारतावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखण्याचा हा त्यातलाच एक प्रकार आहे.
ब्रह्मपुत्रा ही भारताची नदी
पाकिस्तानचा हा खोटा प्रचार आहे. आम्ही घाबरणार नाही. ब्रह्मपुत्रा ही भारताची नदी आहे आणि आम्ही तिचं रक्षण करू, असा विश्वासही बिस्वा यांनी दिलाय. सिंधू पाणी करार स्थगितीमुळे भारत - पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलाय. हा तणाव पाकिस्तान कसा सहन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या करार स्थगितीमुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यात भारताला सध्या तरी यश आलंय.