
मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीला ९ जून २०२५ रोजी सुरुवात होणार असून ही सहल ५ रात्री आणि ६ दिवसांची आहे. या सहलीचे आरक्षण करण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले असून पर्यटकांना पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे.
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर ही सवलत देण्यात येणार आहे. या सहलीला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरुवात होणार असून पर्यटकांना दादर, ठाणे स्थानकावरूनही सहलीत सहभागी होता येणार आहे. सहलीत सहभागी पर्यटकांना किल्ले रायगड, लाल महाल आणि कसबा गणपती, शिवसृष्टी, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा आदी किल्ले, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर या ठिकाणांना भेट देता येणार आहे.
हा सर्व प्रवास अत्याधुनिक भारत गौरव एसी टुरिस्ट ट्रेनमधून होणार आहे. या रेल्वेगाडीला शयनयान, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे जोडण्यात आले असून या गाडीची क्षमता ७४८ पर्यटकांना सामावून घेण्याइतकी आहे.