
३० जूनपर्यंत मिळाली पुन्हा मुदतवाढ
पालघर:वारंवार मुदतवाढ देऊनही शिधापत्रिकांमध्ये नावे असणाऱ्या जिल्ह्यातील ५ लाख ५१ हजार ४१८ नागरिकांनी 'ई- केवायसी' केलेली नाही. रेशन कार्ड धारकांची ई-केवायसी करण्यासाठी शासनाने आणखी एकदा ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे. पालघर जिल्ह्यातील ४ लाख ३२ हजार ४९ शिधापत्रिकाधारकांना अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून धान्याचे वाटप केल्या जाते. जिल्ह्यात प्राधान्य योजनेचे ३ लाख ३४ हजार ९० शिधापत्रिकाधारक असून अंत्योदय योजनेचे ९७ हजार ९५९ शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. दरम्यान, अन्नधान्य वितरित करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या सर्वच नागरिकांना राशन दुकानातील पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वी २८ फेब्रुवारी ची 'डेडलाईन' देण्यात आली होती. या कालावधीत हजारो नागरिकांनी ई-केवायसी केली नसल्याने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देऊन या मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. दरम्यान पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील एक लाखाहून अधिक शिधापत्रिकांमध्ये नावे असणाऱ्या साडेपाच लाख शिधापत्रिकाधारकांनी ३० एप्रिल च्या मुदतीपर्यंत ई-केवायसी केलेली नाही.
एप्रिल महिन्यानंतर ई केवायसी करण्याकडे पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. मे अखेरपर्यंत साडेपाच लाखाहून अधिक नागरिकांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे शासनाने ३० जून पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ दिली असून त्यानंतरही ई - केवायसी न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद केल्या जाणार आहे.