
जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम.
तुमचं रोजचं अन्न आरोग्यदायी असलं तरी प्रमाणाचं भान ठेवणं गरजेचं आहे. आपण सगळेच भाज्या आणि डाळी यांना "सुपरफूड" मानतो आणि त्या खरंच पोषणमूल्यांनी भरलेल्या असतात. पण हेल्थ कोच निपा आशाराम यांच्यानुसार, याच आरोग्यदायी अन्नाचं अति सेवन केल्यामुळे पोट फुगणं, अपचन आणि पचनसंस्थेचे त्रास सुरू होतात. त्यांनी नमूद केलं की, ५० ग्रॅम डाळ आणि १५०-३०० ग्रॅम भाज्यांपर्यंत मर्यादित सेवन हे योग्य आहे. यापेक्षा अधिक घेतल्यास फायबर आणि कॅलरीजचं प्रमाण वाढतं.
अति डाळी का टाळाव्यात?
काही डाळी (जसे मूग, मसूर) जास्त प्रमाणात घेतल्यास त्यातील ओलिगोसॅकाराइड्स मुळे पचन बिघडतं. जास्त तूप, तेल किंवा मलाई वापरून शिजवलेल्या डाळी कॅलोरीज वाढवतात. यामुळे वजन वाढू शकते. मधुमेह असणाऱ्यांसाठी जास्त डाळीतील कार्बोहायड्रेट्स हानिकारक ठरू शकतात.
भाज्यांचं अति सेवन का धोकादायक ठरतं?
फायबर जास्त झालं की पचनावर ताण येतो. फुगवटा, गॅस, अपचन यासारखे त्रास संभवतात. जास्त तेल, मसालेदार ग्रेव्ही वापरल्यास भाजी आरोग्यदायी राहात नाही. फक्त भाज्यांवर भर दिल्यास प्रथिनं व सत्त्वयुक्त फॅट्स चा अभाव होतो. यामुळे पोषणतूट होऊ शकते.
काय लक्षात ठेवावं?
डाळ १-२ लहान वाट्या, आणि भाज्या ३०० ग्रॅमपर्यंत ठेवा. डाळ शिजवताना कमी तेल, पचनास मदत करणारे मसाले वापरा, जसे हिंग, आलं, जिरे. आपल्या थाळीत धान्य, डाळी, भाज्या, फॅट्स आणि प्रथिने यांचा संतुलित समावेश असावा. पचनासाठी फायबर हळूहळू वाढवा आणि पुरेसं पाणी प्या. मधुमेह, किडनी, थायरॉईडसारख्या समस्या असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन आहार ठरवा.