
मुंबई : शहरातील शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी शोध मोहीम राबविण्यात येते. त्यानुसार सरत्या शैक्षणिक वर्षांत (२०२४-२५) मुंबई शहरातून तब्बल ४ हजार ५५५ शाळाबाह्य मुलांची नोंद झाली आहे. त्या सर्व मुलांना पुन्हा शाळेत आणण्यात शिक्षकांना यश आले आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षकांनी ४ हजार १७८ मुले तर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ३७७ मुले गेल्यावर्षी शाळेत दाखल करण्यात आली.
बालकांचा सक्तीचा मोफत शिक्षण कायद्यांतर्गत बालकांना मोफत सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक असतानाही दरवर्षी राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले निदर्शनास येतात.
मुंबईतही हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबईच्या विविध ठिकाणी राहणारी स्थलांतरितांची मुले तसेच झोपडपट्टी, रस्ते, सिग्नल परिसरात राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जातात.