
अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने पंजाब किंग्सवर जबरदस्त विजय मिळवत आपल्या पहिल्या वहिल्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९० धावा केल्या होत्या. पंजाबसमोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान होते. मात्र पंजाबला केवळ १८४ इतक्याच धावा करता आल्या. आरसीबीच्या विजयानंतर विराटच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. या खिताबासाठी त्याला तब्बल १७ वर्षे वाट पाहावी लागली होती. पहिल्या पर्वापासून विराट कोहली आरसीबी संघासोबत आहे. त्याने अनेक हंगाम या संघाचे नेतृत्वही केले. मात्र अद्याप त्याला ट्रॉफी जिंकता आली नव्हती. तब्बल १७ वर्षांनी विराटला ही संधी मिळाली.
दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरूवात सावध झाली. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी संथ सुरूवात केली. २४ धावांवर असताना प्रियांश बाद झाला. त्याने २४ धावा केल्या. त्यानंतर थोड्या वेळाने प्रभसिमन सिंहही बाद झाला. त्यानेही केवळ २६ धावा केल्या. जोश इंग्लिस यावेळी फटकेबाजी करेल असे वाटत होते मात्र तोही ३९ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार श्रेयस अय्यर फक्त १ धावा करून बाद झाला.
फायनल सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या आरसीबीची सुरूवात विराट कोहली आणि फिल साल्ट यांनी केली. साल्टने काही चांगले शॉट जरूर लगावले. मात्र दुसऱ्याच षटकांत जेमिसनने सॉल्टला बाद केले. साल्टने १६ धावा केल्या. यानंतर मयंक अग्रवाल आणि कोहलीने डाव सांभाळला. मयांक आणि विराटने ६ षटकांत म्हणजेच पहिल्या पॉवरप्लेनंतर आरसीबीची धावसंख्या ५०च्या पार पोहोचवली. मात्र ७व्याच षटकांत मयांक बाद झाला. मयांकने केवळ २४ धावा केल्या. चहलने आपले खाते दुसऱ्याच बॉलवर उघडले. मात्र यानंतर कोहली आणि रजत यांच्यात चांगली भागीदारी झाली आणि दोघांनी १० षटकांत ८९ धावा केल्या. मात्र ११व्या षटकांतच जेमिसनने कर्णधार रजत पाटीदारला बाद केले.
रजत पाटीदार बाद झाल्यानंतर विराट कोहलीही १५व्या षटकांत बाद झाला. त्याने सर्वाधिक ३५ बॉलमध्ये ४३ धावांची खेळी केली. विराटच्या विकेटनंतर एकामागोमाग एक विकेट पडत गेले. शेवटच्या षटकांत अर्शदीपने कमाल केली. त्याने त्या ओव्हरमध्ये तीन विकेट मिळवल्या. यामुळे बंगळुरूची धावसंख्या १९०वर रोखता आली.