
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील साधुग्रामची जागा कायमस्वरूपी अधिग्रहीत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यात सकारात्मक होते. आता ५० टक्के रोख आणि ५० टक्के टीडीआर अशा स्वरूपाचा फॉर्मुला होण्याची शक्यता आहे. संबंधित आरक्षित जागा 'नो डेव्हलपमेंट झोन'मध्ये मोडत असल्यामुळे याठिकाणचे रेडी रेकनरचे दर कमी आहेत. त्यामुळे आता टीडीआर देण्याबाबतही काही सुधारणा करता येईल का, या दृष्टीने राज्य शासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमध्ये कुंभमेळा तयारीच्या आढावा बैठक घेत सिंहस्थासाठी येणारे आखाडे आणि साधु महंतांचा विचार करता साधूग्रामसाठी किमान एक हजार एकर जागा संपादित करणे आवश्यक आहे. असे असले तरी सद्यस्थितीत साधुग्रामसाठी आरक्षित जागा केवळ २८३ एकर इतकीच संपादीत करणे बाकी आहे. यापूर्वी ९३ एकर जागा संपादीत झालेली आहे. जागा कायमस्वरूपी अधिग्रहीत करावयाची झाल्यास मनपा प्रशासनाला किमान चार ते साडेचार हजार कोटी रूपयांची गरज आहे. महापालिकेची तेवढी आर्थिक स्थिती नसल्याने मनपाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला सादर केला आहे. यामध्ये ४५ टक्के रोख रक्कम, ४५ टक्के टिडीआर व १० टक्के आरसीसी बॉण्ड असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र फडणवीस यांनी कायमस्वरूपी जागा संपादीत करण्याचे आश्वासन दिल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत.
दोन हजार कोटी आणणार कोठून?
सिंहस्थ साधुग्रामच्या भूसंपादनाकरिता सुमारे चार ते पाच हजार कोटींची आवश्यकता आहे. ५० टक्के रोखीने व ५० टक्के टीडीआर स्वरूपातही मोबदला दिल्यास महापालिकेला किमान दोन हजार कोटी रुपये जागामालक शेतकऱ्यांना अदा करावे लागतील. या निधीसाठीदेखील महापालिकेला शासनावर अवलंबून राहावे लागेल.