
आपला शेजारी बांगलादेशच्या निर्मितीत भारताचा महत्त्वाची भूमिका राहिली असून भारताने पाकच्या हडेलहप्पीविरोधात त्या देशाला सर्वतोपरी मदत केली आहे. बांगलादेश मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना भारतीय सैनिकानी सर्व प्रकारची मदत केली. पण आज बांगलादेश पुन्हा पाकच्या कच्छपी लागला असून भारतात आश्रय घेतलेल्या पूर्वाश्रमीच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना देशातून बाहेर काढण्याच्या मागे लागला आहे. ज्या डिसेंबरच्या १९७१साली भारताने पाकचा पुरता पराभव केला आणि त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली त्या बांगलादेशच्या पंतप्रधानांना आज बांगलादेशातून निर्वासित व्हावे लागले आहे. बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबूर रहेमान यांचा पुतळा बांगलादेशीयांनी फोडून उद्ध्वस्त केला आहे आणि जे रशियाच्या बाबतीत घडले तेच बांगलादेशच्या बाबतीत घडत आहे. हसीना वाजेद यांनी देश कशा प्रकारे चालवला याच्यात जाण्यात काही स्वारस्य नाही, पण त्यांनी विद्यार्थ्यांचे दादागिरीचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जावे लागले असे दिसते.
पण आजच्या स्थितीकडे वळले असता असे लक्षात येईल की, आजच्या कोटा सुधारणा आंदोलनात हसीना यांच्याविरोधात बांगला विद्यार्थ्यांचा सारा राग उफाळून आला. त्यामुळे हसीना यांना परागंदा व्हावे लागले. आज त्याच हसीना यांच्यावर युनूस सरकारने आरोपपत्र ठेवले आहे आणि ते म्हणजे हिंसा भडकवण्याची आणि लोकांना चिथावणी देण्याचे आरोप त्यात आहेत. हसीना यांच्यावर आरोप किती खरे आहेत किंवा किती खोटे हे न्यायालय निकाल देईलच, पण पाक अथवा बांगलादेश यांच्याकडे न्यायालय किती प्रामाणिकपणे काम करतात हे साऱ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे न्यायालयांच्या म्हणण्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही.
बांगलादेशचा खरा राग स्वतंत्रता सेनानींना कोट्याचा लाभ देण्यावरून होता. कारण बांगलादेश मुक्ती लढ्यात ज्या योद्ध्यांनी सक्रिय भाग घेऊन रक्त सांडले त्यांना लाभ देण्यावरून हा वाद पेटला. पण बांगलादेशच्या काही शक्तीना आणि डाव्या शक्तींना हा लढाच मान्य नाही. त्यामुळे त्यांनी हा कोटा देण्यास विरोध केला आणि विद्यार्थी पेटून उठले. चीनमध्ये थिआनमेंन चौकात जे आंदोलन घडले तसेच बांगलादेशमध्ये घडले. पण फरक इतकाच की चीन सरकार हे कितीतरी कठोर होते पण बांगलादेश सरकार तितके कठोर नव्हते. तरीही हानी झालीच आणि पंतप्रधानांना पदच्युत व्हावे लागले. बांगलादेश आता पाकच्या आहारी गेला आहे आणि या आंदोलनाचा सहारा घेऊन तेथील पाकवादी शक्तींनी बांगलादेशचा ताबा घेतला आणि शेख हसीना यांना पदच्युत होऊन देश सोडावा लागला.
आता बांगालदेशमध्ये कठपुतळे आणि बाहुले म्हणून युनूस यांचे सरकार आहे. हे तेच युनूस आहेत ज्यांना २००६ सालचा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी ग्रामीण बँक स्थापन करून मायक्रोक्रेडिट कर्जाची संकल्पना चांगली रुजवली. पण प्रशासन करण्यात ते अगदी कुचकामी आहेत आणि त्याना बांगलादेशचे प्रमुख बनवले हीच चूक होती. पण त्याचा फटका बांगलादेशला बसत आहे पण ते मान्य करणार नाहीत. बांगलादेशचे कठपुतळे सरकार असल्याने महंमद युनूस यांना बांगलादेशमध्ये कुणी विचारत नाही. पण तेच पाकच्या कच्छपी लागून त्याच्या देशाचे नुकसान करत आहेत.
आता युनूस सरकारने शेख हसीना यांच्याविरोधात मानवतेविरोधात गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हा गंभीर आरोप आहे आणि त्यामुळे शेख हसीना चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. त्यांच्यावर असा आरोप ठेवणे ही चेष्टा आहे, कारण ते ठेवले आहेत कुणी तर बांगलादेशातील युनूस सरकारने. ज्यांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे त्या बांगला सरकारने आरोप ठेवणे हा दैवदुर्विलास आहे. कारण युनूस सरकार पाकच्या नादी लागून हसीना यांना देशोधडीला लावून आता त्यांचा जीव घेण्याच्या प्रयत्नात आहे. बांगलादेशात सध्या हिंदूवर अत्याचार सुरू आहेत. कित्येकांनी भारताचा आश्रय घेतला आहे आणि तेथील हिंदूंना वाचवा अशी हाक अनेक राजकीय पक्षांनी दिली आहे. त्या बांगलादेशने शेख हसीना यांच्यावर आरोप ठेवणे म्हणजे विनोदच आहे. पण त्यांचे अंतर्गत काहीही असो.
पण भारताविरोधात बांगलादेशचे विद्यामान सरकार गरळ ओकत असते आणि त्यामुळे त्याच्याविरोधात भारताने कृती केली आहे. आता बांगलादेशच्या कृतीचे प्रादेशिक परिणाम होणार आहेत, शेख हसीना वाजेद या एकेकाळी लोकशाहीच्या खंद्या पुरस्कर्त्या समजल्या जात होत्या. त्या आज ऑटोक्रॅट म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यांनी विद्यार्थी आंदोलन दडपून टाकल्याचा आरोप केला जात आहे. २००९ पासून त्याच बांगलादेशातील सत्तेत होत्या. त्यांचे पतन पाक कसा आपल्या शेजारी देशाला बरबाद करतो याचे जितेजागते उदाहरण आहे.
बांगलादेशची जनता आता पाकच्या कच्छपी लागली आहे आणि त्यामुळे शेख हसीना या पाकच्या जनतेसाठी खलनायिका ठरल्या आहेत. पण पाक सरकार कसे बांगलादेशीवर अत्याचार करत होते हे ती विसरून गेली आहे. कुणाचीही बाजू घेण्याची गरज नाही पण बांगला जनतेला आपला कोण आणि शत्रू कोण हेही कळेनासे झाले आहे. त्यामुळे ती अत्यंत घातक अशा पाकच्या नादी लागली आहे. हसीना यांचे व्हायचे ते होईल पण बांगलादेशच्या जनतेचे नुकसान मात्र चांगलेच होणार आहे हे निश्चित आहे. कारण पाकच्या नादी लागला तो संपला असे ठरलेले आहे.
आज पाक कर्जबाजारी आहे, बांगलादेशवर हीच वेळ पाक आणणार यात शंका नाही. आज शेख हसीना यांना जावे लागेल पण पाकला साथ दिल्याबद्दल बांगलादेशच्या जनतेला रक्ताचे अश्रू येतील यात काही शंका नाही. अनेक आठवड्याच्या वाढत्या असंतोषानंतर शेख हसीना यांची अखेर हकालपट्टीत झाली. त्यांनी चांगले काही करण्याचा प्रयत्न केला पण देशाला तो नको होता. त्यामुळे त्यांची अनसेरिमोनियस एक्झिट झाली. आता तर त्यांच्यावर खटला भरला जाईल. बांगलादेशचे सरकार असल्याने निकाल काय लागेल ते दिसतेच आहे.