Wednesday, June 4, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

Water Taxi Mumbai: वॉटर टॅक्सीच्या सरकारी हालचालींना वेग, नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश

Water Taxi Mumbai: वॉटर टॅक्सीच्या सरकारी हालचालींना वेग, नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश

रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळपर्यंत वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव


मुंबई: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.  लवकरच  नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. यापूर्वी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोईस्कर आणि सुखकर प्रवासासाठी एम टू एम बोट सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आता गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.


मंत्रालयात आज (2 जून ) वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत, अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.



पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव


या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भागांशी मुंबईचे कनेक्टिव्हिटी सुधारेल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या जलटॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. या सेवांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. मुंबईतील जलवाहतुकीच्या या नव्या योजनेमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल.



एम टू एम बोट मुंबईत दाखल


गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि वेळखाऊ प्रवास हा त्रास नेहमीच सहन करावा लागतो. मात्र, आता या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. याकरिता एम टू एम बोटची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एम टू एम बोटद्वारे नितेश राणे यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. यासंबंधी लवकरच चाकरमान्यांना परवडतील असे दर यासाठी निश्चित केले जाणार असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment