
मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अानुषंगाने मार्ग रेषा आखणी, वाहतूक बेट, वाहतूक दिवे उभारणीची कामे प्रगतिपथावर असून ती येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली. मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या समन्वयाने विक्रोळी पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामांची कालमर्यादा ३१ मे २०२५ अशी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी निश्चित केली होती.
या अानुषंगाने विहित कालावधीत पुलाची सर्व मुख्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व – पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण १८ तुळया टाकण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत एका बाजूकडील ध्वनिरोधक, रंगकाम आणि पश्चिमेकडील बाजूवर मार्ग रेषा आखणीआदी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.