
भाग ३ : मुंबई डॉट कॉम
मागील लेखात म्हटल्याप्रमाणे खासदार नारायण राणे यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेतल्यानंतर बेस्टमधील बरेच प्रश्न आता हळूहळू सुटू लागले आहेत, त्यात विशेष म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांचा विषय तसेच बेस्टला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्व उत्पन्नाचा मार्ग याचा समावेश होता. साल २०१७ सालापासून बेस्टचे तिकीटभाडे हे पाच ते सहा रुपये होते. बेस्टची भाडेवाढ होत नसल्याकारणाने बेस्ट आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली होती. याचा परिणाम म्हणून बेस्टच्या बसगाड्यांची दुरुस्ती होत नव्हती, तसेच दैनंदिन खर्चासाठी बेस्टकडे पैसे शिल्लक राहत नव्हते म्हणून नागरिकांना बेस्टकडून पुरेशी सुविधा उपलब्ध होत नव्हती, त्यामुळे थोडीफार का होईना बेस्टभाडे वाढ होणे आवश्यक बनले होते. त्याचाच परिणाम म्हणून २७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या नेतृत्वात सह्याद्री अतिथिगृह येथे बेस्ट उपक्रमाबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवासन व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेस्ट भाडेवाढीसंबंधित विषय आला होता. बेस्ट भाडेवाढ होणे आवश्यकच होते तर ती काळाची गरज बनली होती. यात बेस्टने हा विषय पुढे आणल्याने बेस्टचे तिकीट भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली व काही दिवसांत ती लागूही करण्यात आली.
आता बेस्ट बस भाडेवाडीमुळे बेस्टच्या तिजोरीत अंदाजे वार्षिक ६०० कोटी रुपये जमा होतील. यामुळे बेस्टला थोडीफार आर्थिक मदत होईल. समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस विलास पवार यांनी पुढाकार घेऊन खासदार नारायण राणे यांना बेस्टची सध्याची डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती कथन केली व बेस्ट वाचवण्यासाठी साकडे घातले. बेस्ट हा सन्माननीय नारायण राणे यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने व बेस्ट वाचावी व मुंबईकरांना पूर्वीसारखाच स्वस्त व सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन व आश्वासित केल्याप्रमाणे दहा दिवसांत आढावा बैठक घडवून आणली व बेस्टला आर्थिकदृष्ट्या प्रबळ करण्यासाठी सार्थक प्रयत्न केले व करत आहेत. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळून देणार अशीही ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश हे बेस्ट तिकीट भाडेवाढीला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली यातून दिसून येते. परंतु शिवसेना उबाठा पक्षाचे नेते या भाडेवाढीला विरोध दर्शवित आहेत. त्यांच्या सत्ताकाळात खासगीकरण बेस्टमध्ये आणून बेस्ट उपक्रमाची दुर्दशा केली गेली. बेस्ट खासगी बस वाहतूक करणारे ठेकेदार कंपन्या आणून बेस्ट उपक्रम अधिक तोट्यात आणला गेला तसेच यापूर्वी तीन ठेकेदार कंपन्या तोट्यात गेल्यामुळे बेस्ट उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करून पळून गेल्या आहेत याचे खापरही उबाठा सरकारवर जाते.
या खासगी बसवरील चालक यांना कोणत्याही प्रकारचे वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. हे बसचालक पैसे कमवण्यासाठी डबल ड्युटी करतात. त्यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होऊन अपघाताचे प्रमाण वाढते. गेल्या काही महिन्यांत खासगी बस चालकाने निष्पाप नागरिक पादचारांचे बळी घेतले आहेत. कुर्ला येथील घटना आजही ऐकली तरी अंगावर शहारे येतात. अजूनही बळी घेण्याची मालिका सुरूच आहे. बेस्टमधून खासगी कंत्राटी पद्धत कायमची बंद करावी अशी समर्थ बेस्ट कामगार संघटना सातत्याने मागणी करत आहे. तसेच विद्युत पुरवठा विभागातही कंत्राटी पद्धत आणून वीज ग्राहकांना चांगली सुविधा मिळत नसून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दर महिन्याला मोठ्या प्रमाणात कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. काल १ जूनपासून कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन भरती होत नाही. गेली अनेक वर्षे आर्थिक कारणामुळे कामगार भरती प्रक्रिया होत नाही. याचा परिणाम होऊन इतर कामगार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कामाचा ताण पडतो. यामुळे सेवक वर्गावर शारीरिक, मानसिक ताण येतो. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, ब्रेनस्टोक, पॅरालिसिस यांसारख्या दुर्धर आजाराला कर्मचारी बळी पडत आहेत.
बेस्टची सध्याची अवस्था ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी झाली आहे. याला सर्वस्वी गेली तीस वर्षे ज्याची सत्ता बेस्टमध्ये व महानगरपालिकेत होती ते जबाबदार आहेत. बेस्टमध्ये संपूर्ण मराठी कर्मचारी होता मात्र गेली तीस वर्षे आर्थिक सत्ता उपभोगलेल्यांनी त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसाहती हा एक वेगळा विषय ठरू शकतो, त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे साहजिकच हजारो बेस्ट कामगार हे मुंबईत स्वतःचे घर नसल्याने मुंबई बाहेर फेकले गेले. मुंबईतील बस आगारात काम करण्यासाठी त्यांना दूरवरून रेल्वे प्रवास करावा लागतो. तिथून येऊन काम करणे म्हणजे हे खूपच कष्टदायक आहे. त्यात बेस्टमध्ये मिळणारे वेतन, बेस्टमध्ये न होणारी वेतनवाढ तसेच इतर सुविधांचा अभाव असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे व मराठीचा कैवारी घेणाऱ्या पक्षाने बेस्ट कर्मचाऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले हीच जर मराठी माणसे मुंबईत टिकली असती तर मुंबईतला मराठी टक्का नक्कीच वाचला असता मात्र फक्त बेस्टकडे एक टक्केवारीचे साधन म्हणून पाहिल्यामुळेच आज बेस्टची अशी दुर्दशा झाली आहे.
- अल्पेश म्हात्रे