
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटीचे जाळे विस्तारले असून प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यावर एसटी महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. कमी हंगामात प्रवासी संख्येत वाढ व्हावी या उद्देशाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केल्यास तिकिटात १५ टक्के सवलत मिळणार आहे. याचा फायदा ई-शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे. या योजनेची जुलैपासून अंमलबजावणी होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नावीन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त बोलत होते. या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय डॉ. माधव कुसेकर, एसटीचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक एकची परिवहन संस्था निर्माण करणे हेच ध्येय असेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.
गेली ७७ वर्षे ऊन, वारा पाऊस याची तमा न बाळगता चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गाव खेड्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्याने प्रवासी सेवा देण्याचे काम एसटीने अविरतपणे केलेल आहे. भविष्यात एसटी आपला शतकोत्तर महोत्सव निश्चित पूर्ण करेल! कारण महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य जनतेचा आशीर्वाद आणि कमी हंगामात, जुलैपासून योजनेची अंमलबजावणी पाठबळ एसटीला मिळालेले आहे. ७५ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या खूप कमी संस्था देशात अस्तित्वात आहेत. अर्थात, एसटी महामंडळ त्यापैकी एक आहे. आज ७७ वर्षांनंतर देखील महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एसटीचे महत्त्व यात किंचितही कमी झालेलं नाही. त्यामुळे "लोकाश्रय" लाभलेली आपली एसटी भविष्यात अशीच मार्गक्रमण करत राहील, असा मला विश्वास वाटतो.
भविष्यात दळणवळण क्षेत्रात होणारे संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ अशी "स्मार्ट एसटी" उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.