लहानशा गोष्टी , मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
क्षण देवो भव” Time is money, Time and tide wait for none
आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण लाख मोलाचा आहे म्हणून तो जपून वापरायला हवा. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण वेळेचा हिशोब ठेवायला हवा. प्रत्येक क्षण सोनक्षण मानला तरच प्रगती साधता येते. हे आपल्याला साधुसंत, थोर शास्त्रज्ञ, समाजसुधारक यांच्या चरित्र आणि चारित्र्यातून जाणवते, समजून येते. डॉ. आंबेडकरांनी प्रत्येक
क्षण सोन्याचा मानून वेचला, खर्चला आणि आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा, संधीचा पुरेपूर उपयोग करून आपल्या जीवनाचे सोने केले.
जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण वेळेचा हिशोब ठेवायला हवा. नुकतेच ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन झाले. सर्व वर्तमानपत्रांतून त्यांच्याविषयी माहिती येते, ती वाचली तर त्यांनीही वेळेचा कसा सदुपयोग केला हे आपल्याला समजून येते. प्रत्येकाला रोज २४ तासच बहाल केले जातात, पण बहुसंख्य लोक वेळेच्या बाबतीत उदासीन असल्याने गप्पा -टप्पा, आळस, विश्रांती, फोनमधील रील्स बघणे - करणे यातच जास्त वेळ वाया दवडतात. परवाच मी दवाखान्यात गेले होते. तिथे आई व तिची छोटी मुलगी दोघीही रील्स पाहत मश्गुल होत्या की त्यांचे नाव घेतले हेही त्यांच्या लक्षात आले नाही. घड्याळ टिक-टिक करत बजावत असतं. “आला क्षण, गेला क्षण”, पाखरं किलबिलत सांगत असतात, ‘उठा कामाला लागा”, सूर्याची किरणं सुचवतात, “आळस झटका, कामाला लागा’, निसर्ग गुणगुणत असतो,” कालचक्राच्या गतीबरोबर तुलाही तुझी स्थिती सोडून गती पकडायला हवी. गती पकड तरच प्रगती साधेल” समर्थ रामदासांनी अचूक शब्दांत आपल्याला सांगून ठेवलं आहे,
ऐक सदैवपणाचे लक्षण ।
रिकामा जाऊ नेदी एक क्षण।
इतकं सारं असूनही आपण मात्र मूल्यवान वेळेकडे दुर्लक्ष करतो. अभ्यास का केला नाही? पाठांतर का झाले नाही? चांगली, चांगली पुस्तके का वाचली नाहीत? छंद का जोपासत नाही? व्यायाम का करत नाही? प्रार्थना का म्हटली नाही? वर्तमानपत्र का वाचले नाही? आजारी मित्राला का भेटायला गेला नाही? या साऱ्या प्रश्नांचं उत्तर एकमेव असतं “मला वेळ मिळत नाही किंवा मला वेळ झाला नाही त्यामुळे जमलं नाही, जमत नाही. हेच उत्तर असतं.
आपण विचार करायला हवा समर्थांना देश पर्यटनाला, ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहायला, लोकमान्य टिळकांना गीता रहस्य लिहायला, देशकार्य करायला, शेरपा तेनसिंगला एव्हरेस्ट जिंकायला, शास्त्रज्ञांना शोध लावायला, महात्मा फुल्यांना स्त्री शिक्षणाचे सत्कार्य करायला, वेळ कुठून, कसा आणि किती मिळाला, कुणी दिला? तुम्हाला उत्तर हे सापडेल की त्यांनी आपला वेळ विचारपूर्वक वेचला, खर्च केला. वेळेचे गणित ज्याला जमले त्याला जीवनाचे गणित यशस्वीपणे सोडविता आले हे लक्षात ठेवा.” आवड असली की सवड मिळते”, “इच्छा तिथे मार्ग” ही दोन प्रमुख सूत्रे आपण वेळेचा विचार करताना ध्यानात घ्यायला हवीत.
वेळ ही मानवाच्या आयुष्यातील सर्वांत मौल्यवान संपत्ती आहे. पैसा, संपत्ती, ऐश्वर्य हे सगळं पुन्हा मिळवता येऊ शकतं, पण गेलेली वेळ परत मिळवता येत नाही. म्हणूनच वेळेचे महत्त्व समजून घेणे आणि तिचा योग्य वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
वेळेचे महत्त्व :
१) जीवनाच्या यशासाठी वेळेचे नियोजन आवश्यक आहे.
यशस्वी लोक व वेळेचे योग्य नियोजन हे एक समीकरण आहे. कोणताही मोठा नेता, वैज्ञानिक, उद्योजक किंवा कलावंत याने आपल्या वेळेचे व्यवस्थापन चोखपणे केलेले असते.
२) शिस्त आणि वेळेचे पालन.
शिस्त म्हणजे स्वतःवर नियंत्रण. वेळेचे
पालन करणाऱ्या व्यक्तीबद्दल समाजात आदर निर्माण होतो.
३) संधी गमावू नका.
वेळेवर निर्णय घेणे, कृती करणे हे खूप आवश्यक असते. “वेळ गेली की संधी गेली ” हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
वेळेचा सदुपयोग कसा करावा?
१) दैनंदिन वेळापत्रक तयार करा
दिवसाची सुरुवात कामांचे नियोजन करून करा. कोणते काम केव्हा करायचे हे ठरवा.
२) प्राधान्यक्रम ठरवा
सर्व कामे एकाच वेळी करता येत नाहीत. कोणते काम महत्त्वाचे आहे हे ठरवा आणि त्याप्रमाणे कृती करा.
३) विलंब टाळा
“उद्या करू” ही वृत्ती टाळा. प्रत्येक काम वेळेत पूर्ण करण्याची सवय लावा.
४) अवकाशात ज्ञानाचा विकास करा
रिकाम्या वेळेत टीव्ही बघण्याऐवजी चांगले पुस्तक वाचा, नवीन कौशल्य शिका.
थोडक्यात सांगायचं तर...
वेळेचं मूल्य पैशापेक्षा कितीतरी जास्त आहे. वेळेला वाया घालवणं म्हणजे आयुष्याच्या क्षणांना वाया घालवणं. प्रत्येक क्षण उपयुक्त आहे. म्हणून, वेळेचा योग्य वापर करा, यश तुमच्याच पावलांखाली येईल.
“वेळ ही देवाने दिलेली एक अशी देणगी आहे जी तुम्ही कशी वापरता यावर तुमचं भविष्य ठरतं.”
मी शाळेत विद्यार्थ्यांना सतत सांगते, “जो वेळेची किंमत ठेवत नाही, त्याची वेळही किंमत ठेवत नाही.” माणसे मोठी होतात ती उगीच नाही.