
मनस्विनी : पूर्णिमा शिंदे
अगं किती हसतेस मोठ्याने! मुलगी आहेस ना तू! शोभते का तुला? अगं किती उड्या मारते. फिदीफिदी हसून भटकू नकोस रात्री. सातच्या आत घरात आलीच पाहिजेस. मुलगी आहेस ना. झा...लं मुलगी झाली. अरेरे मुलगा हवा होता... काय उपयोग? मुली परक्याचं धन! कशाला शिकवा? जा बाई दिल्या घरी सुखी राहा. काय आणि किती? तीही माणूसच आहे. तुमच्यासारखी जिवंत माणूस. केवळ तिच्याकडे उपभोग्यदासी, दायी, सांभाळणारी आई, प्रसवणारी माता आणि राबराबणारी गरीब गाय इतकंच पाहिलं जातं. गृहीत धरलं जातं. समाज म्हणजे चार चालिरीती बंधन आणि चौकट देणारा समाज. चार मुंडक्यांनी एकत्र येऊन अन्याय सहन करायला लावणारा. दूषण देणं, नाव ठेवणं इतकच नाही एक वेळचं जेवण कुणी देता का? आपल्याला आधारही देत नाही. चुलमूल या चाकोरीबाहेर जाऊन ज्यांनी आवाज उठवला त्या आज यशस्वीनी ठरल्या. उंबरठ्या बाहेरचं जग, भिंती भेदून आकाश पेलणारी “ती”. स्त्रीशक्ती वंदनीय आहे, महनीय आहे. सोसते सहिष्णु सोसणारी असह्य झाले की तलवार काढणारी दुर्गा असते. घराघरांतून जिवंतपणे जळणाऱ्या या आयुष्यभर जगतात. इतरांसाठी मायेची ऊब बनून. प्रत्येकीच्या मनात तेवत असतो एक आकाश दिवा.
शोध जिचा तिनेच घ्यायला हवा. आत्मोद्धाराचा दिवा तेवता ठेवण्यासाठी आत्मविश्वासाने जीवनाचा प्रवास करा. वाटेत लांडगे, कोल्हे कितीही येवोत आडवे, चारी मुंड्या चीत करा. आपण राजमाता जिजाऊंच्या लेकी सावित्रीच्या लेकी आहोत. ताट मानेने जगायला शिका. सासर-माहेरच्या नात्यात सहन करत स्वतःला हरवून बसता. स्वत:चं अस्तित्व सिद्ध करा. स्वतःची नवी ओळख बनवा. स्वयंसिद्धा बना. जग कुठे चालले आहे? आपण जगाच्या पाठी का राहायचं? तावून सुलाखून निघालात ना. मग हिऱ्याला पैलू पाडावे तसे चमका! प्रत्येकीमध्ये काहीना काही सुप्त गुण, कलाकुसर, कौशल्य असतात. त्यांचा आत्मशोध घ्या. स्वतः या दुनियेमध्ये हरवू नका.
आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर कितीही तुमचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील. मोडून काढा, उधळून टाका डाव त्या कुरघोडींचा. पेटून उठा जमदग्नी, नवदुर्गा, महालक्ष्मी बनून. चंडमुंड विनाशिनी बनून तर कधी महिषासुरमर्दिनी बनून. स्वतःला सिद्ध करून तू कर्तृत्व शालिनी हो. तू यशाची शिखरे पार कर. तू यशस्विनी हो. तुझ्या अस्तित्वाची लढाई तू लढ. रणरागिनी हो. तुझ्या स्वयंसिद्ध संग्रामात तू विजयश्री हो. सौदामिनी आहेस, लखलखती विजेसारखी सळसळून पार कर अमानुषतेच्या बेड्या. तोड पाशवी अन्यायाचे. उत्तुंग घे भरारी गगनामध्ये गरुडासारखी. स्वच्छंदी विरहीत जा. कधी चेतव स्पुलिंग तुझ्या कर्तबगारीचं. तुडवत समस्यांचं रान, गाठ तो रस्ता. बनव पायवाट! काटे आले आडवे, तुडव सपाट! कधीच मानू नकोस तू हार! झेल शेकडो प्रहार! स्वतःला कमी लेखनं सोडून दे. पायातल्या बेड्या तोडू न दे. लक्ष्मण रेषा पार कर. चार भिंतीबाहेरचं जग बघ, अनुभव, आत्मविश्वासाने, आनंदाने चालत राहा. तू निर्माण केलेली वाट. तुझ्याच वाटेवरून, तुझ्या निर्णयाने, तुझ्या आनंदाने आणि आत्मविश्वासाने आजपर्यंत होरपळलीस ना. आता हिरवळीत राहा.
आजवर टक्केटोणपे सहन केले. आता तू तुझी गाणी गा. सहन केलेल्या आता टर्न बदलली. सहन करायला लाव. दुसऱ्या त्या प्रसंगाला दुःखाच्या नको कवटाळू. आनंदाला नको टाळू. परतफेड कर. कर्ज उधारी दुःखाची. तुझा स्नेह, परोपकार, कर्म आहेत साथीला. परवा कशाची? मग बाई गं तू बाई आहेस बाई म्हणूनच राहा. बाई माणूसमधून बाईपण काढलं की तू माणूसच आहे हे मात्र लक्षात आणून दे. तुझ्या बाईपणातील देवपण, माणूस, महात्म्य मगच उमगतील. तिचंही मन आहे. अन् भावना, वेदना, प्रेरणा, करुणा, शक्ती, भक्ती, प्रीती तरीही नको आता त्या यातना. सती म्हणून लोटली सरणावर! चढवली फासावर! जिवंत जाळली राख रांगोळी केली तिच्या स्वप्नांची आणि देहाची! एक चटका भाकरीचा, जीव तळमळतो विचार करा. जाळताना जीव कितीदा जातो. मुलीच झाल्या म्हणून होतात नकुशा.वंशाच्या दिव्याकडून पूर्ण होतात का हो आशा अपेक्षा!
८ मार्चला फक्त देताना वही बाई तुझ्याशिवाय जगच नाही. ९ मार्चला सारं विसरून पुन्हा तेच करतात कसाई. कधी कधी वाटतं आयुष्य हे समजून घेऊ पण आपल्याला समजणाऱ्यालाच घेऊ, नाहीतर मात्र खैर नाही. भूत, भविष्य, वर्तमान जगताना तिला अंधारात ठेवलं जातं, तिच्या पाठीमागे वाटेल तसं वागलं जातं, रोजच्या धावपळीच्या जीवनात जगलीस का कधी स्वतःसाठी? आयुष्य हे कुंपण होतं, सांग सखी कधी कळणार तुला. जीवन असंच संपून जातं. जीवन असंच संपून जातं. जगून घे जगून घे. तुझ्यातील तिला मारू नकोस. समाजाला घाबरू नकोस, विचारांनी थकून जाऊ नकोस... बस इतकं कर.