Monday, June 2, 2025

कोलाज

आपलं पर्यावरण

आपलं पर्यावरण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त...


नेहमीचे आयुष्य जगता जगता, आपले जीवनमान सुधारण्यासाठी आपल्याला पर्यावरणाचे संरक्षण करणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळे हवा, पाणी, अन्न आणि इतर गरजांसाठी आपण पर्यावरणावर आणि पर्यायाने स्वतःचे आरोग्यही त्यावर अवलंबून असते. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.


विशेष : मृणालिनी कुलकर्णी


काही दिल्याशिवाय, काही घेऊ नये” या निसर्गनियमानुसार आपण पर्यावरणाला काय देतो? पर्यावरण : आपल्या सभोवतालचे वातावरण, जे जैविक आणि अजैविक घटकांनी भरलेले आहे. अठराव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर, विकासात्मक प्रकल्पामुळे आणि फक्त स्वतःपुरते पाहणे या माणसाच्या वृत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास झाला. या माणसाच्या कृतीमुळे पर्यावरणात होत गेलेले बदल, त्यातून निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे (ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल) साऱ्या जगाचे लक्ष वेधले गेले.


१९७२ मध्ये स्टॉकहोम (स्वीडन) येथे मानवी पर्यावरणीय प्रश्नासंबंधी परिषद भरली. अंदाजे १५० देशांचा सहभाग होता. तेथे पर्यावरणीय समस्यांवर विचार करून संयुक्त राष्ट्राच्या महासभेने ‘५ जून हा दिवस जागतिक पर्यावरणीय दिन’ साजरा करण्याचे ठरविले. त्या मागचा उद्देश, जागतिक व्यासपीठाद्वारे पर्यावरणीय समस्या जाणून सर्व स्तरावर जनजागृती करणे, यातून पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन होऊन सुधारणा होईल.


इतर सर्व दिनापेक्षा ५ जून हा पर्यावरण दिवस महत्त्वाचा. कारण या पर्यावरणात आपण राहतो. हवा, पाणी, अन्न आणि इतर गरजांसाठी आपण पर्यावरणावर, पर्यायाने स्वतःचे आरोग्यही त्यावर अवलंबून आहे. हाच पर्यावरण आणि माणसाच्या अस्तित्वाचा परस्पर संबंध! म्हणून ते आपलं पर्यावरण!


२०२५ च्या पर्यावरणाची थीम “प्लास्टिक प्रदूषण समाप्त करा ”! जुलै २००५ साली जलमय झालेल्या परिस्थितीस प्लास्टिकचा कचरा हेच कारण होते. अनुभवाने काही न शिकता आज २० वर्षांनेही त्याचे प्रमाण कमी न होता, आजच्या पावसातही सर्वत्र तेच पाहतोय. पर्यावरणाचा समतोल ढासळण्यासाठी, कार्बन घटकाबरोबरच विखुरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्याही आहेत. सहज गंमत म्हणून रोजच्या पाच मिनिटांच्या वाटेत, रस्त्यांत, समुद्र किनारी दिसणारे प्लास्टिक मोजा. हे पूर्णतः मानवनिर्मित प्रदूषण आहे. या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी हवी. घरातही खाण्यासाठी सुद्धा प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर किती केला जातो. प्लास्टिक पृथ्वीचा भक्षक आहे. त्याचा वापर टाळा.


बाली येथे दहा आणि बारा वर्षांच्या बहिणीने प्लास्टिकच्या विरोधात जनजागृतीसाठी कार्यशाळा घेतल्या, उपोषण केले, ‘बाय बाय प्लास्टिक बॅग्स’ या संस्थेची स्थापना केली. शेवटी प्लास्टिक कचऱ्याच्या विरोधात कायदा झाला आणि आज बाली देश मोकळा श्वास घेत आहे.


निसर्गातील पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी ही बहुतांशी सामूहिक आहे. पर्यावरण दक्षता मंडळाने त्याच्या रौप्य महोत्सवी वर्षात २०२४ मध्ये ‘आपलं पर्यावरण’ ही दिनदर्शिका (कॅलेंडर) काढली. त्यात भारतातील प्रमुख पर्यावरणीय चळवळीचा आढावा घेण्यात आलेला आहे. त्या आधारे ही खालील माहिती. -


१. मारवाड प्रांतात १४८५ मध्ये भयंकर दुष्काळ पडल्याने जनता तो प्रांत सोडून जाऊ लागली. त्यावेळी संत जाम्भोजी गुरूने नैर्सर्गिक संसाधनांचा योग्य वापर करण्याचे मार्गदर्शन केले. सर्वांना एकत्र आणून ‘बिष्णोई’ पंथाची स्थापना केली. यातून भारतातील पर्यावरणीय चळवळीला सुरुवात झाली.  ११ सप्टेंबर १७३० मध्ये राजस्थानमधील खेजर्ली गावात बिष्णोई पंथातील लोकांनी बहुउपयोगी झाडांची जोपासना केली होती. घरातील कर्त्या पुरुषांना कामासाठी बाहेर काढून झाडे तोडायला कंत्राटदार आले. त्यावेळी अमृतादेवी ही बिष्णोई झाडाला बिलगली. “माझं डोकं उडविल्याने एक जरी झाड वाचलं तर माझं जीवन कृतार्थ ठरेल.” सैनिकांनी तिचा शिरच्छेद करताच तिच्या तीन मुलींनंतर इतर महिला अशा एकूण ३६३ बिष्णोईंनी झाड वाचविण्यासाठी आपले बलिदान दिले. हा पर्यावरणीय चळवळीचा दीपस्तंभ होय.


२. वरीलप्रमाणेच १९७३ साली अलकनंदा खोऱ्यातील मंडळ गावातील जंगलाचे लाकूड क्रीडा साहित्यासाठी आणि शेतीची अवजारे करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली म्हणून ते जंगल खासगी कंपनीला देऊ केले. वरीलप्रमाणे पुरुष वर्गाला कामानिमित्ताने बाहेर काढले. येथेही गावातील महिलांनी झाडाला मिठी मारली. हेच “चिपको आंदोलन”! यावेळी झाड तोडायला आलेले कंत्राटी
निघून गेले.


३. केरळ राज्यातील निरव शांतता असलेली जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेले जंगल ‘सायलेंट व्हॅली’. १९७०-७३ साली जनतेकडून आणि सलीम अली अशा दिग्गजांमुळे तेथे प्रकल्प न होता राष्ट्रीय उद्यान केले गेले.


४. झारखंड या शब्दाचा अर्थच जंगलाची जागा! या जंगलात अनेक आदिवासी कुटुंबे राहतात. त्याच्या प्रयत्नाने झारखंड हे नवीन राज्य निर्माण केले गेले. त्याआधी ८० व्या दशकांत हे नैसर्गिक ‘साल’चे जंगल तोडून सागवानाची लागवड करण्याच्या निर्णयाला स्थानिक लोकांच्या विरोधामुळे (चळवळीमुळे) झारखंडचे नैसर्गिक जंगल वाचले.


५. जैवविविधतेसाठीच प्रसिद्ध असलेला महाराष्ट्र पश्चिम घाट हे सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यकर्त्यांच्या आंदोलकांनी वाचविले.


६. नागालँड येथील ‘अमूर फाल्कन’ हा अतिशय वेगाने प्रवास करणारा सुंदर पक्षी. या पक्ष्याची मांसासाठी होणारी कत्तल, वन्यजीव संरक्षण कायद्याखाली आणि एनजीओच्या माध्यमातून थांबली. नंतर तेथील भक्षकच रक्षक झाले.


७. दिल्लीतील वाढते वायू प्रदूषण - नागरिकांची निदर्शने, मेणबत्ती रॅली, लोकांना मास्क वाटले... आजही तो लढा चालू आहे.


८. जल साक्षरता अंतर्गत स्थानिक जलस्रोत, नैसर्गिक स्थितीला तलाव, खाडी, स्वच्छ ठेवण्याचे अभियान चालू असते. ठाणे येथे फ्लेमिंगोसाठी जागा राखीव ठेवली आहे.
पर्यावणाचे असंतुलन मानवाकडून झाले. तसेच पर्यावरणाचे रक्षणही मानवाच्या सहभागातून होत आहे. त्याची ही वरील उदाहरणे. रोजच्या जीवनात पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी प्रथमतः स्वतःचा परिसर समजून घ्या. आपल्या परिसरातील तलाव, जंगल, बाग, खारफुटी, समुद्र किनारा, पक्ष्यांचे स्थलांतर, (शिवडी) यांना भेट द्या.


गेल्या वर्षी ५ जूनला एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जलीय परिस्थितीची, पाण्यातील प्रदूषित घटकांची माहिती होण्यासाठी मुंबईतील पवई तलावाला नेले होते. तलावाच्या सभोवताली एका बाजूला उच्चभ्रू हिरानंदानी वसाहत, दुसरीकडे उद्योग, व्यवसाय करणाऱ्या इमारती, एका बाजूला झोपडपट्टी, एका कोपऱ्यांत नागरिकांनी टाकलेला कचरा, स्वच्छतेसाठी प्रयत्न आवश्यक आहेत हे प्रत्यक्ष बोटीतून फेरी मारल्याने कळले. पाण्याचा रंग, पाण्याची खोली, या सर्वांचा मासे, मगरींवर होत असलेला परिणाम हे सारे अनुभवले.


स्थानिक झाडे लावा. एक झाड अनेक सजीवांचा अधिवास असतो. पर्यावरण पूरक, नैसर्गिक वस्तूंचा वापर करा. ऋतुमानानुसार भाज्या, फळे खावीत. आमच्या भक्तीपार्कमधील रवींद्र संपत हे बागेत झाडाच्या पडलेल्या बिया गोळा करून नियमितपणे झाडे लावतात. अलीकडेच त्यांनी ५० झाडे लावलेली मी स्वतः पाहिली. थोडक्यात सतत जे जे शक्य असेल, ते ते करा नि, पर्यावरणाचे रक्षण करा. प्लास्टिकच्या पिशव्यांचा, पाण्याचा, विजेचा होणारा अमर्याद वापर आपण कमी करू शकतो.


आपलं पर्यावरण वाचविण्यासाठी अनेकजण कार्यरत आहेत. नाशिकमधील शेखर गायकवाड यांनी कुटुंबीयांसह फाशीच्या डोंगरावरील देवराईत अकरा लाख झाडे लावली. याउलट निसर्गाच्या सान्निध्यात मौजमजा करताना दारूच्या बाटल्या, सिगारेट्सची पाकिटे पाहतो, तेव्हा वाईट वाटते. याचा वन्य अधिवासावर परिणाम होत असतो.


आपण परदेशात चेरी ब्लॉसम बघायला कौतुकाने जातो. झाडे तोडल्यामुळे आपल्याकडील वसंत ऋतूची फक्त चाहूल आपण पाहतो. पूर्वी देवराई सुरक्षित ठेवली जायची. जपानमध्ये मियावाकी संकल्पना आहे. पर्यावरण संवर्धनातून व्यवसाय निर्मितीही करू शकतो. या गोष्टीचे महत्त्व पीतांबरीने ओळखून २०१३ साली राजापूर, दापोली येथे सर्व प्रकारची फळ-फुलझाडे, जंगली रोपांच्या नर्सरीची निर्मिती केली.


त्याही पुढे मानव निर्मित जंगलेही उभारली. असो. नेहमीचे आयुष्य जगता जगता, आपलं जीवनमान सुधारण्यासाठी आपल्या पर्यावरणाचे संरक्षण आपल्याच हाती असते. यावेळी मी फक्त एवढेच म्हणेन “हिरवे व्हा, स्वच्छ श्वास घ्या.”


[email protected]

Comments
Add Comment