
नवी दिल्ली : पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी प्रकरणाचा तपास अधिक तीव्र होत असून नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने आज सकाळपासूनच दिल्ली, महाराष्ट्र (मुंबई), हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये एकाचवेळी पंधरा ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापेमारी केली आहे.
या छाप्यांचे लक्ष्य PIO (Person of Indian Origin) शी संबंधित संशयित लोक आणि त्यांच्या मालमत्ता होत्या. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यांमध्ये मोबाईल, लॅपटॉप, हार्ड ड्राइव्ह, संवेदनशील आर्थिक व्यवहारांची कागदपत्रं आणि आक्षेपार्ह डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा दावा करत पाकिस्तानने खळबळ उडवून दिली होती. खुद्द पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ ...
हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश
एनआयएच्या मते, हे संशयित पाकिस्तानस्थित व्यक्तींशी संपर्कात होते आणि भारतात हेरगिरी कारवायांसाठी आर्थिक मदतीचे माध्यम म्हणून काम करत होते. या संशयितांनी २०२३ पासून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली असल्याचा संशय आहे. या प्रकरणात आधीच एक आरोपी अटकेत आहे, आणि त्याच्यापासून मिळालेल्या माहितीनंतर २० मे रोजी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ६१(२), १४७, १४८, अधिकृत गुप्तता कायदा १९२३ च्या कलम ३ आणि ५ आणि UAPA कायदा १९६७ च्या कलम १८ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
CRPF जवान आणि युट्यूबर अटकेत
या तपासाच्या दरम्यान दिल्लीतून CRPF चा जवान मोतीराम जाट याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानला सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पाठवण्याचा आरोप आहे. या बदल्यात त्याला आर्थिक मोबदला मिळत होता, अशी माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, हरियाणामधील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला देखील अटक करण्यात आली आहे. तिच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीवरून ती पाकिस्तानच्या युट्यूबर झिशान हुसेनसोबत सतत संपर्कात होती, आणि भारतविरोधी छुपं प्रचार सुरू होता. ती धार्मिक व्हिसावर पाकिस्तानमध्ये गेली होती आणि तिने झिशानला मेसेजही केला होता, हे पुरावे आता एनआयएकडे आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानविरुद्धची कारवाई जोरात सुरू आहे. आता केवळ सीमेवर नाही, तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेलाही धोका निर्माण करणाऱ्या हेरगिरीच्या रॅकेटवर NIA ने मोठा हातोडा मारला आहे. एकाचवेळी अनेक राज्यांमध्ये छापे टाकून संशयितांना अटक केल्याने हे प्रकरण अजूनच गंभीर बनले आहे. पुढील तपासात अजून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.