Monday, June 2, 2025

देशविदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

भारताची लढाऊ विमाने पाडली? पाकिस्तानचा दावा खोटा; सीडीएस अनिल चौहान यांनी फाडला पाकिस्तानचा बुरखा

भारताची लढाऊ विमाने पाडली? पाकिस्तानचा दावा खोटा; सीडीएस अनिल चौहान यांनी फाडला पाकिस्तानचा बुरखा

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा दावा करत पाकिस्तानने खळबळ उडवून दिली होती. खुद्द पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीच हा दावा केला होता. पण आता भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तानचा हा खोटारडा दावा फेटाळून लावला आहे.


सीडीएस अनिल चौहान सध्या सिंगापूरमध्ये शांग्री-ला संवाद परिषदेसाठी उपस्थित आहेत. तेथे ब्लूमबर्ग या अमेरिकन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानचा दावा बिनबुडाचा आणि फसवा आहे. भारतीय वायूदलावर हल्ला झाला, काही नुकसानही झाले; पण सहा विमाने पाडली गेली, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.



'विमानांचे किती नुकसान झाले हे महत्वाचे नाही पण विमानांते नुकसान का झाले हे शोधणे अधिक महत्वाचे आहे. यामधून आपण शिकतो, चुका सुधारतो आणि पुढे रणनीती अधिक सक्षम करतो,' असे मत त्यांनी मांडले.


पुढे ते म्हणाले की, “चुका समजल्या, सुधारल्या आणि अवघ्या दोन दिवसांत त्यावर कृती करून भारताने दूरवरच्या दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केली.”





फेक न्यूजचा पर्दाफाश


सीडीएस चौहान यांनी फेक न्यूजच्या धोक्याबाबतही सडेतोड मत मांडलं. “सशस्त्र दलांचा तब्बल १५ टक्के वेळ ही खोटी माहिती दुरुस्त करण्यात जातो. मात्र भारत नेहमी आपले नॅरेटिव्ह तथ्यांवर आणि विश्वासार्हतेवर उभे करतो,” असं त्यांनी स्पष्ट केलं.



'ऑपरेशन सिंदूर' कशासाठी?


२६ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या भीषण घटनेनंतर भारताने ६ मे च्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर टार्गेटेड एअर स्ट्राईक केला.


या कारवाईनंतर पाकिस्तानकडून खोटे दावे करण्यात आले, पण आता भारताच्या सर्वोच्च लष्करी अधिकार्‍याने त्यावर शिक्कामोर्तब करत पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे.


भारताने दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं असून खोट्या प्रचारालाही प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानकडून केले जाणारे अपप्रचार, बनावट दावे आणि खोट्या गोष्टींचा आता उघडपणे पर्दाफाश होतो आहे. भारत आता फक्त संरक्षणावर नाही, तर माहिती युद्धातही आघाडीवर असल्याचं या मुलाखतीतून स्पष्ट झालं आहे.

Comments
Add Comment