Monday, June 2, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवारी उद्घाटन

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवारी उद्घाटन

मुंबई : नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किमी. लांबीच्या अंतिम टप्प्याचे गुरुवार ५ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा उद्घाटन सोहळा इगतपुरी येथे होणार आहे. अंतिम टप्प्याच्या उद्घाटनाद्वारे संपूर्ण समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.


समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूर या दोन शहरांतील रस्ते मार्गाचे अंतर १६ तासांवरुन आठ तासांवर येईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यासाठीच नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी. रस्ता बांधला आहे. या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमी. टप्पा सध्या सेवेत आहे. आता गुरुवार ५ जून रोजी इगतपुरी ते आमणे या ७६ किमी. लांबीच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन होणार आहे.


काय आहे समृद्धी महामार्ग ?


नागपूर ते मुंबई हा ७०१ किमी. लांबीचा समृद्धी महामार्ग हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने ओळखला जातो. हा सहा मार्गिका असलेला १२० मीटर रुंदीचा महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराशी जोडतो. हा महामार्ग १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांना जोडतो. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला ठाणे जिल्हा मार्गे मुंबईशी जोडण्याचे काम समृद्धी महामार्ग करतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा महामार्ग बांधून काढला आहे. सपाट जमिनीवरुन जात असताना या महामार्गावर ताशी १५० किमी वेगाने आणि सह्याद्री घाटात ताशी १०० किमी. वेगाने कार पळवणे या महामार्गावर शक्य आहे. समृद्धी महामार्ग ठाणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर (जुने नाव - औरंगाबाद), जालना, बुलढाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्यांतून जातो.

Comments
Add Comment