Monday, June 2, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

'नेहरूंनी नव्हे तर वाडियारांनी जपला वारसा'

'नेहरूंनी नव्हे तर वाडियारांनी जपला वारसा'
म्हैसूर : म्हैसूरच्या वाडियार राजघराण्यानं भारताच्या इतिहासात एक स्वर्णीम अध्याय लिहिलाय.कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना पंडित नेहरू यांनी केल्याचा दावा केला. मात्र म्हैसूरचे भाजपाचे खासदार आणि वाडियार घराण्याचे वंशज यदुवीर वाडियार यांनी शिवकुमार यांचा दावा खोडलाय. त्यामुळं राजकीय वादाला तोंड फुटलंय. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वाडियारांनी कसं घडवलं भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग याची माहिती...



कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या दाव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना पंडित नेहरूंनी केल्याचा दावा त्यांनी २७ मे २०२५ रोजी केला. मात्र हा दावा भाजपाचे खासदार यदुवीर वाडियार यांनी खोडला. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना १९४० मध्ये, म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी, वालचंद हिराचंद आणि म्हैसूरच्या वाडियार राजांनी केली, नेहरूंनी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. वालचंद यांची भेट अमेरिकन उद्योजक विल्यम पॉली यांच्याशी झाली. या भेटीतून भारतात विमान निर्मितीचा विचार पुढे आला. त्यावेळी अनेक राजांनी ही कल्पना नाकारली, मात्र वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी जयचामराज वाडियार यांनी ही संधी ओळखली. म्हैसूर सरकारने सातशे  एकर जमीन, २५ लाख रुपये आणि अन्य सुविधा अवघ्या ७२ तासांमध्ये उपलब्ध करून दिल्या, असंही त्यांनी म्हटलंय.

२३ डिसेंबर १९४० रोजी हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनीची स्थापना झाली. अवघ्या तीन आठवड्यांत पहिलं हॅन्गर आणि रनवे तयार झाला. तर १९४१ मध्ये पहिलं हार्लो ट्रेनर विमान सरकारला सुपूर्द करण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धात हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावली. म्हैसूरच्या योगदानामुळे बंगळुरू आज भारताचं एरोस्पेस हब म्हणून ओळखलं जातं.

वाडियारांचा हा वारसा फक्त हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनीपुरता मर्यादित नाही. १९०२ मध्ये नलवडी कृष्णराज वाडियार यांच्या नेतृत्वाखाली शिवनासमुद्र येथे आशियातील पहिलं जलविद्युत केंद्र उभारलं गेलं. यामुळे कोलार गोल्ड फिल्ड्सला १९०२ मध्ये आणि म्हैसूरला १९०८ मध्ये वीज मिळाली. १८९९ मध्ये जमशेटजी टाटा यांनी भारतीय विज्ञान संस्था स्थापनेचं स्वप्न पाहिलं. यासाठी म्हैसूरच्या राणी केम्पनंजम्मनी वाणी विलास यांनी ३७१ एकर जमीन, पाच लाख रुपये आणि मासिक अनुदान देऊन जमशेटजी टाटा यांचं स्वप्न साकार केलं. २७ मे १९०९ रोजी IISCची स्थापना झाली, जी आज भारतातील विज्ञान संशोधनाचं केंद्र आहे. याशिवाय, म्हैसूर विद्यापीठ, व्हिक्टोरिया हॉस्पिटल आणि कृष्णराजसागर धरण यांसारख्या प्रकल्प हे वाडियारांचा दूरदृष्टीचा साक्षात्कार घडवतात. १९४० ते ४७ च्या काळात भारताला अन्नटंचाईचा सामना करावा लागला. वाडियारांनी अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली. चेलुवंबा मॅन्शन यासाठी समर्पित करण्यात आलं, जे आज अन्नतंत्रज्ञान क्षेत्रात अग्रणी आहे.

डी. के. शिवकुमार यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना नेहरूंनी केल्याचा दावा केला, मात्र यदुवीर वाडियार यांनी पुराव्यांसह हा दावा खोडून काढलाय. त्यांनी एक्स पोस्टवर अठरा भागांचा थ्रेड शेअर करत हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा खरा इतिहास मांडलाय. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची हा कन्नडिगांचा अभिमान आहे आणि त्याची स्थापना वालचंद हिराचंद आणि म्हैसूरच्या राजांनी केलीय, असं यदुवीर यांनी म्हटलंय. त्याचबरोबर शिवकुमार यांना सत्य काय आहे हे लक्षात घेऊन हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा वारसा जपण्याचं आवाहनही केलंय.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला बंगळुरूमधून हलवण्याचा प्रस्ताव नाकारला, मात्र कर्नाटकात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल चर्चा सुरूच आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हा कर्नाटकचा गौरव आहे आणि तो येथेच राहिला पाहिजे असंही यदुवीर यांनी म्हटलंय. हा वाद राजकीय असला तरी त्यातून वाडियारांचा विज्ञान-तंत्रज्ञानातील योगदान पुन्हा एकदा प्रकाशात आलंय. वाडियारांनी फक्त म्हैसूरच नव्हे, तर संपूर्ण भारताला एक प्रगतिशील दिशा दिलीय. HAL, IISC, शिवनासमुद्र जलविद्युत प्रकल्प आणि CFTRI यांसारख्या संस्थांनी भारताला जागतिक स्तरावर नाव मिळवून दिलंय. यदुवीर वाडियार यांनी या वारशाला पुन्हा एकदा उजाळा देत सत्य मांडलं. मात्र प्रश्न असा आहे की आपण हा वारसा किती जपणार? आणि राजकीय वादात सत्याचा आदर किती करणार?
Comments
Add Comment