
महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
सूर्यवंशातील इक्ष्वांकूच्या कुळात त्रिबंधन नावाचा राजा होऊन गेला. त्याला सत्यव्रत नावाचा मुलगा होता. सत्यव्रताचा मुलगा हरीश्चंद्र (हरीश्चंद्र तारामती.) होता. हा सत्यव्रत सुंदर; परंतु अत्यंत कामुक होता. त्याचे आपल्या देहावर अत्यंत प्रेम होते. तसेच सदेह स्वर्गाला जाण्याची त्याची इच्छा होती. एकदा त्याने एका नववधूला लग्नातून पळवून आणले. त्यामुळे क्रोधीत झालेल्या पित्याने त्याला तू चांडाळ होशील असे म्हणून राजमहालातून हाकलून दिले. हा सत्यव्रत वनात राहून चांडाळाप्रमाणे स्वत:ची उपजीविका करू लागला.
एकदा भयंकर दुष्काळ पडला असताना काहीही खाण्यास मिळाले नसल्याने त्याने वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात असलेली गाय मारून खाल्ली. वशिष्ठ ऋषींना हे कळताच त्यांनी त्याला पित्याला त्रास देणे, नववधूला पळविणे व गुरुची गाय मारून खाणे या तीन पाप (शंकू)साठी त्रिशंकू म्हणून ओळखला जाशील असा शाप दिला.
चांडाळ योनीत गेला तरीही सत्यव्रताला सदेह स्वर्गात जाण्याची इच्छा होती. त्यासाठी तो प्रथम वशिष्ठाकडे गेला, मात्र पंचमहाभुतांनी बनलेले हे शरीर घेऊन कोणीही स्वर्ग लोकात जाऊ शकत नाही, त्याबद्दल काही असे सांगून त्यांनी नकार दिला. त्रिशंकू त्यांच्या मुलाकडे गेला; परंतु मुलांनीही पित्याने ज्या गोष्टीला नकार दिला त्या गोष्टी आमच्याकडून होणार नाहीत, असे सांगितले.
तेव्हा तो विश्वामित्रांकडे गेला. ऋषी विश्वामित्र व वशिष्ठ ऋषी यांच्या मध्ये नेहमीच वर्चस्वाची स्पर्धा असे. विश्वमित्रांनी त्रिशंकूला ओळखून त्याच्या सद्यस्थितीबद्दल विचारणा केली. तेव्हा सत्यव्रताने आपली इच्छा व घडलेली सर्व घटना सांगितली असता, विश्वामित्रांनी त्याला सदेह स्वर्गात पाठवण्याचे आश्वासन दिले. काही आख्यायिकेनुसार त्रिशंकूला त्याच अवस्थेत स्वर्गात पाठविण्याचे ठरविले, तर स्कंद पुराणातील कथेनुसार विश्वामित्रांनी प्रथम त्याला शापमुक्त करण्याचे ठरविले. त्यासाठी ते त्रिशंकूसह मार्कंडेय ऋषीकडे गेले. मार्कंडेय ऋषींनी त्याला हाटकेश्वर येथील पाताळगंगेत स्नान करण्यास सांगितले. त्याप्रमाणे स्नान केले असता त्रिशंकू शापमुक्त झाला.
विश्वामित्रांनी आपल्या शिष्यांना यज्ञांची तयारी करण्यास सांगितले व या यज्ञासाठी अन्य ऋषींना आमंत्रित करण्यास पाठविले. मात्र यज्ञात सहभागी होण्यास नकार देऊन वशिष्ठ व वशिष्ठांच्या मुलांनी येण्याचे नाकारले. वशिष्ठ व त्यांची मुले वगळता सर्व ऋषी सहभागी झाले.
यज्ञ समाप्तीनंतर विश्वामित्रांनी देवतांना आपापला यज्ञभाग घेण्यास आमंत्रित केले, मात्र कोणीही देवता प्रकट झाली नाहीत. तेव्हा विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाच्या साहाय्याने त्रिशंकूला स्वर्गरोहणासाठी पाठविले. त्रिशंकू सदेह स्वर्गात येत असलेलं पाहून इंद्राने त्याला अटकाव केला व ढकलून दिले.
तेव्हा खाली डोके वर पाय अशा स्थितीत तो पृथ्वीकडे पडू लागला. त्याने जोरजोराने विश्वामित्रांना आवाज दिला. विश्वामित्रांनी त्याला खाली येऊ नको तिथेच थांब असे म्हणून आपल्या सामर्थ्याने त्याला तेथेच स्थिर केले. एवढेच नव्हे तर देवांंनी त्रिशंकूला स्वर्गात येऊ दिले नाही तरी आपले वचन पूर्ण करण्यासाठी विश्वमित्रांनी त्याच्यासाठी त्याच ठिकाणी स्वर्ग निर्माण केला. तसेच ते एका नव्या इंद्र व देवतांसह नव्या सूर्यासह ब्रह्मांडाच्या सृष्टीच्या निर्मितीचा विचार करू लागले. हे पाहून इंद्र व अन्य देवता भयभीत झाले. ते सर्व विश्वामित्राकडे आले व निसर्गनियमाविरुद्ध निर्मिती न करण्याची विनंती केली व कोणीही सदेह स्वर्गात प्रवेश करू शकत नाही म्हणून आपण सत्यव्रताला स्वर्गात प्रवेश करू दिला नाही, तेव्हा आपण नवीन ब्रह्मांड निर्मितीच्या विचाराचा त्याग करावा, अशी विनंती केली. ती मान्य करून विश्वामित्रांनी आता त्रिशंकू या नव्या स्वर्गातच वास्तव्यास असेल असे जाहीर केले. इंद्रानेही ते मान्य करून केवळ त्यास अशा उलट अवस्थेतच ठेवावे ही विनंती केली. तर काही आख्याखिकेनुसार इंद्राने नवीन स्वर्ग निर्मिती न करण्याची विनंती करून त्रिशंकूला स्वर्गात नेण्याचे मान्य केले व त्रिशंकूला स्वर्गात स्थान दिल्याचीही आख्याखिका आहे.
त्रिशंकूच्या कथेवरून निसर्ग नियमाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा मध्येच कुठेतरी अडकून ‘न घरका ना घाट का,’ अशी परिस्थिती उद्भवू शकते असा बोध मिळतो. तेव्हापासून कोणत्याही एखाद्या गोष्टीच्या पूर्णत्वामध्ये कमतरता असेल तर तिची अवस्था त्रिशंकू झाली, असे म्हणण्याचा प्रघात पडला. उदाहरणार्थ जर सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाकडे पूर्ण बहुमत नसेल तर त्रिशंकू अवस्था झाली असे म्हणतात.