रविवार मंथन

दिल दोस्ती दुनियादारी...

  24

माेरपीस : सपूजा काळे


दोस्तों के नाम का एक खत जेब में रख कर क्या चला, करीब से गुजरने वाले पूछते है, इस इत्र का नाम क्या है...!!
गुलजार यांच्या या हिंदी शेरामध्ये मैत्रीबद्दलची कमाल व्याख्या स्पष्ट होते. मैत्रीला उंचावर नेऊन ठेवण्याचं कसब कवींमध्ये असलं तरी, मैत्रीला स्वत:चं असं एक स्थान आहे, जे अव्वल दर्जाचं मानलं जातं. मैत्री कधीही आणि कोणाशीही होऊ शकते. ती ज्याची-त्याची वा साध्या प्रसंगी वा विशेष कारणामुळे होत असल्याने मैत्रीबद्दल शंकेचं कारणचं उरत नाही. जीवाला जीव देणाऱ्या मैत्रीची खासियत वेगळीचं असते. नात्यापलीकडील भावनेच्या अंतर्गत जीवाभावाच्या निश्चयाची खूणगाठ बांधणारे मित्र आसपास असल्याने विवेक बुद्धीने जो संवाद साधतो, ज्याच्याकडे जराही आकस नसतो, हेवा नसतो, लोभ-द्वेष नसतो, त्याचं मैत्रेय लवकर जुळतं. अशा मैत्रीला परिमाण नसलं तरी, विचार मात्र जुळावे लागतात.


किंबहुना “जाणारा” तोल आपल्या कौशल्याने सांभाळणारा एक तरी मित्र तिथं असल्याने तो खऱ्या मैत्रीला न्याय देतो आणि उत्तम मित्रत्वाच्या पंगतीत जाऊन बसतो; म्हणूनचं खरेपणा शाबूत ठेऊन खोटेपणाची झळ बसू न देणारी मैत्री चिरकाल टिकते असं म्हणतात. सुस्थितीला मैत्रीचं माप वगैरे म्हणता येत नाही. कारण मैत्रीचं खरं मूल्यमापन आपत्ती काळातचं होतं. एका भावाची, मताची माणसं एकत्र आल्यावर हृदयात अपार सेवा भरली जाते आणि सर्वचं आपले मित्र होऊन जातात. तरीही कौशल्य गुणाच्या वापराने भासणं आणि असणं यातली तफावत ओळखता यायला पाहिजे. नाहीतर करून गेलो राव, ओळखता आला नाही मैत्रीचा डाव अशी दयनीय अवस्था व्हायची.


एक अभ्यास म्हणून आपल्या जीवनात असंख्य माणसं जोडली जात असली तरी, मैत्रीचे बंध अभावानेचं जुळल्याची उदाहरणं दिसून येतात. हृदयाची भाषा हृदयाला कळू लागली की, स्नेह वाढू लागतो जो नात्यात लवचिकता भरतो. सुमधुर प्रशंसा, धीरगंभीर शब्द, प्रेमळ उत्तेजन, सहानुभूतीमय सांत्वन, चुकांसाठीची उपदेशवाणी ज्याच्याकडून लाभते किंवा मिळते तो सहज मित्रत्वाच्या वर्तुळात सामावला जातो.


सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत खऱ्या मैत्रीबद्दल आपल्या कवितेत म्हणतात, “दु:ख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा.” अशा या मैत्रीबद्दलचा आशय जरी सोपा असला तरी त्याची घनता मोजता येत नाही. सख्ख्या आणि सच्च्या मित्रांशिवाय आयुष्य म्हणजे, सूर्याशिवाय आकाश. मग विचार करा या तेजस्वी सूर्याचं दर्शन दुर्लभ झालं तर, अंधकार माजेल. विचारांचा गोंधळ उडेल, व्यक्त करण्यातली अडचण घेऊन माणसं बिनमैत्रीची वावरू लागली तर तारतम्य सुटेल, ती वेडी होतील. तेव्हा आयुष्यात मित्र वा मैत्रीण हवीचं. ज्यांना यातलं कोणी नसतं ते एकटे पडतात. दुसरं म्हणजे मैत्री ही केवळ मनोरंजनासाठी नसून आपल्याकडील सुखदु:ख शेअर करण्याचा एकमेव सोपा मार्ग आहे. लखलखीत, स्वच्छ मार्गातल्या पारदर्शी नात्यात विद्या, शूरता, बळ, दक्षता, धीरोदत्त उदारमतवादी गुण आले की, मैत्रीला उणे पडत नाही. जसं की, ज्ञानोपासनेला सुधारणेची जोड मिळत ग्रंथ-पुस्तक आपल्यावर संस्कार करतात काहीसे तसेच; परंतु विशिष्ट हेतूकरिता केलेली मैत्री अखेरपर्यंत टिकत नाही. तोंडावर गोड बोलून मागून पलटवार करणारे मित्रमैत्रिणी घातकी असतात हेही खरंय. वैर करणाऱ्या, वैर धरणाऱ्या मित्रावर जास्त विश्वासार्हता बाळगूच नये.


मित्र-मैत्रिणींच्या दुनियेतलं मोठं वरदान विवेकी मित्र मिळण्यात आहे असं मला नेहमी वाटतं. तुम्ही स्वतः चांगले मित्र किंवा मैत्रीण बनण्याच्या प्रयत्नात असाल तर समोरून मित्रत्वाची चांगलीच साद येईल. उत्तम मित्रांच्या संगतीत आपली प्रगती होते हे खरं असलं तरी, शत्रू आणि मित्र आपल्या कृतीमुळेच निर्माण होतात.


कधी शत्रू मित्र होतो तर कधी मित्र शत्रू म्हणून वावरतो. थोडक्यात दिलोंकी यारी म्हणजे चहासोबत खारी आणि तुझ्या दोस्ती पुढे मित्रा फिकी पडते दुनियादारी. चांगली आणि सुदृढ मैत्री रत्नजडीत मुकुटासारखी असते. तुमचा मित्र परिवार कितीही मोठा असला तरी, प्रत्येकाची तुमच्याशी असलेली बांधिलकी तुम्ही कसे वागता यावर अवलंबून असल्याने, थोडक्यात सांगायचं तर निष्ठावान मित्र आपल्या आयुष्यात टॉनिकसारखे असतात; हा माझा अनुभव आहे. मित्र असावा तर तो हक्काचा, संकटात मदतीचा, काळीज तुकड्याचा, घोर विश्वासाचा, दु:खात भरवशाचा, नैराश्येत आशेचा, अंधारात तेजाचा.


मंडळी वर्षातून साजरा होणारा मैत्री दिन एका दिवसाची गोष्ट ठरत नाही. मूठभर विश्वास चांगल्या मैत्रीची पाळमुळं रुजवत मैत्रीचा पाया भक्कम करतो. दुनियादारीशी इमान राखत, अशा या मैत्रीला कुणाची दृष्ट न लागो...

Comments
Add Comment

काैतुकाने : बोलू मराठी!

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या बाई डॉ. विजया वाड यांनी एका उपक्रमात सहभागी करून

दिल दोस्ती दुनियादारी...

माेरपीस : सपूजा काळे दोस्तों के नाम का एक खत जेब में रख कर क्या चला, करीब से गुजरने वाले पूछते है, इस इत्र का नाम क्या

दूरदर्शी, पर्यावरणवादी कार्यकर्त्या...

दी लेडी बॉस:अर्चना सोंडे तीएका दलित कुटुंबातील निरक्षर घरकामगार, भाळी अकाली आलेलं वैधव्य. पण तिने आपलं गाव, डोंगर,