Monday, June 2, 2025

किलबिल

हरवले ते गवसले का?

हरवले ते गवसले का?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


साधारण ऐंशी वर्षांपूर्वी म्हणजेच त्या दोघांच्या वयाच्या अठराव्या वर्षी, शाळेतल्या एका मुलाने आणि मुलीने एकत्र वाजवलेले पियानो आणि व्हायोलिनवरचे गीत, जसेच्या तसे एका कार्यक्रमात ऐकवले आणि त्यांनी त्या मागची कथाही ऐकवली की त्यांची प्रॅक्टिस चालू असताना अचानक हिरोशिमावर बॉम्ब कोसळला, त्या दिवशीच त्यांना ते शाळेमध्ये सादर करायचे होते.


त्यानंतर त्या दोघांनाही आपण जिवंत आहोत की नाही हे देखील कळले नाही. अशा तऱ्हेने त्यांची वाद्ये तर मोडून गेलीच; परंतु दोघांनाही शारीरिक हानीचा सामना करायला लागला. दोघे एकमेकांपासून वेगळे झाले ते जवळजवळ ऐंशी वर्षे. दोघांच्याही मनात भीती होती... त्याला वाटले ती गेली असेल आणि तिला वाटले की तो गेला असेल!
सात वर्षांपूर्वी त्या दोघांची भेट झाली. त्यांनी अजूनही लग्न केले नव्हते आणि एका या कार्यक्रमात दोघांच्याही वयाच्या अठ्ठाणव्या वर्षी, त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी जे गीत संगीतबद्ध केले होते ते या कार्यक्रमात वाजवून दाखवत आहेत. त्यांची ही कथा ऐकून त्या कार्यक्रमाला आलेले सगळे रडत होते.


अशा जेव्हा खऱ्या घडलेल्या घटना आपण ऐकतो, वाचतो, पाहतो तेव्हा अचंबित व्हायला होते. त्यांची स्मृती अवाक करणारी आहे. हिरोशिमावरच्या बॉम्ब हल्ल्यानंतर परिस्थिती किती दीर्घकाळ तणावग्रस्त होती हे आपण सगळेच जाणतोच! तरीसुद्धा नुसतेच नावानिशी त्यांनी एकमेकांना ओळखले नाही तर त्या काळात त्यांनी संगीतबद्ध केलेले गीतसुद्धा त्यांना जसेच्या तसे आठवले. या स्मरणशक्तीला काय म्हणावे?हे वाचल्यावर आपण आपल्या स्मरणशक्तीवर जोर देऊन आपल्या स्वतःला विचारूया की आपल्याला नेमके किती आधीचे आठवत आहे? स्मरणशक्तीची व्याख्या तपासून पाहिली. ‘स्मरणशक्ती म्हणजे माहिती, घटना आणि अनुभव लक्षात ठेवण्याची आणि मुख्य म्हणजे ती आठवण्याची क्षमता!’ ही क्षमता प्रत्येकाच्या मेंदूमध्ये असते आणि ती आपल्याला भूतकाळातील गोष्टी आठवण्यास, वर्तमान परिस्थितीत निर्णय घेण्यास आणि भविष्यकाळच्या योजना आखण्यास मदत करते.


मग स्मरणशक्ती कशामुळे कमी होते, याचा विचार केला तेव्हा लक्षात येते की, ती मुख्यत्वे तणावामुळे कमी होते. तणाव कमी केल्याने मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि स्मरणशक्ती वाढते. म्हणजे सर्वात मोठी गोम इथेच आहे, नाही का? जन्मलेल्या मुलापासून वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला तणाव असतोच!


पण प्रत्येक माणूस असाही विचार करत असेल की आपल्याला खूप गोष्टी आठवत नाहीत, हे कदाचित बरेच आहे! कारण बहुतेक माणसांचा जीवनाचा प्रवास हा खडतरच असतो. अनेक खाचखळगे, धक्काबुक्की, अपमान, असहाय्यता, वेदना सहन करून त्यांच्या जीवनात जरा चांगले दिवस आलेले असतात ते सुखासुखी अनुभवायचे की परतून ते सर्व दुःख आठवायचे?


‘मेरा कुछ सामान आपके पास पडा है...!’ गुलजार साहेबांचे हे गाणे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे करणारे आहे!
जीवनप्रवासात अकस्मित हात सोडून गेलेली माणसे, दुरावलेले नातेवाईक, बदललेली घरे, गाव सोडून शहरात वास्तव्य केलेले अनेक चाकरमानी, अगदी ट्रेन-बसच्या प्रवासात काही काळासाठी भेटलेली; परंतु स्टेशनवर उतरताना साश्रुनयनाने हात हलवणारी माणसे डोळ्यांसमोर सरकत राहतात; परंतु या पलीकडे जाऊन अलीकडेच वाचलेली एक घटना फार आवडून गेली की एका बाईची बागकाम करताना हरवलेली हिरे जडवलेली सोन्याची अंगठी तिच्या सुनेला बागकाम करताना सापडली. गंमत म्हणजे बागेतले एक गाजर उपसल्यावर गाजराच्या मधोमध ती अडकलेली होती. हा गाजराचा अंगठीसहितचा फोटो खूपच व्हायरल झाला. आपले काय हरवले आहे याची आठवण विरळ होताना अचानक ती वस्तू सापडून जावी...! आनंद काय वर्णावा? हे सांगण्याचा मथितार्थ म्हणजे कधी कधी महत्त्वाचे असे काही हरवलेले अशा तऱ्हेने सापडते त्याचाही खूप वेगळा खूप मोठा आनंद असतो जो आपल्या सगळ्यांना कधीतरी नक्कीच मिळो, अशी अपेक्षा व्यक्त करते!
pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment