
कथा:प्रा. देवबा पाटील
दुसऱ्या दिवशी आदित्य रोजच्याप्रमाणे शाळेत गेला. तो आणि त्याच्या मित्रांचा गट रोजच्यासारखा शाळेत दुपारच्या मधल्या सुट्टीत पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळील त्याच निंबाच्या झाडाच्या गार सावलीत आपले डबे खाण्यास बसले. त्याचवेळी तो मुलगा एका प्लास्टिकच्या पारदर्शक पिशवीत मक्याच्या लाह्या घेऊन तेथे आला.
मुला-मुलींच्या प्रत्येक टोळीजवळ जाऊनसुद्धा कोणीही त्याच्याजवळून लाह्या विकत घेतल्या नाहीत. त्यामुळे तो पुन्हा परत त्या दगडावर येऊन बसला. त्याने आपल्या पिशवीतून एका फडक्यात बांधलेली आपली न्याहारी काढली. न्याहारी सोडली. एका फडक्यामध्ये कागदाच्या जाड घडीमध्ये ठेवलेली ती चतकोर कोरडी भाकर होती व त्यावर कोरडीच बिनतेलाची थोडीशी लाल मिरच्यांची जाडीभरडी चटणीच होती. तो ती चटणीभाकर खाऊ लागला.
त्याला बघून आदित्यच्या मित्रांना त्याची थोडी फिरकी घेण्याची लहर आली.
“कारे गड्या तुला सूर्याविषयी काही माहिती आहे का?” बंटूने त्या मुलाकडे बघत विचारले.
“आहे. थोडीफार.” तो मुलगा नम्रतेने उत्तरला.
“मग सूर्य म्हणजे काय हे सांग बरे.” चिंटूने प्रश्न केला. “सूर्य हा एक तारा आहे.” त्या मुलाने उत्तर दिले.
“अरे ते तर आम्हालाही माहीत आहे. पण सूर्य हा वास्तविक खरा काय आहे?” मोंटूने विचारले.
“सूर्य म्हणजे एक अत्यंत तप्त वायूंचा प्रचंड मोठा गोळा आहे.” त्या मुलाने उत्तर दिले.
“बरे, सूर्याजवळ एवढा प्रकाश कोठून आला?” मोंटूने विचारले.
“आणि तो प्रकाश सूर्याजवळ कसा काय निर्माण झाला?” पिंटूने विचारले.
तो मुलगा सांगू लागला. “आजच्या आपल्या सूर्याचे वय अंदाजे पाच अब्ज वर्षांचे आहे, तर त्याहीपेक्षा आधी अशा खूप अब्जावधी वर्षांपूर्वी आपला सूर्य हा आकाराने प्रचंड मोठा म्हणजे महाकाय आणि अत्यंत तप्त वायूंचा अतिशय तापलेला असा एक खूपच उष्ण तारा होता. त्याचा भयंकर मोठा स्फोट झाला.”
“पण, सूर्याचा एकाएकीच कसा काय स्फोट झाला?” मोंटूने मध्येच प्रश्न केला.
“कोणत्याही वस्तूची अतिशय अस्थिर स्थिती झाली म्हणजे ती त्या वस्तूत अत्यंत अल्पावधीत धाडकन संपूर्ण बदल घडवून आणते, त्या स्थितीला स्फोट म्हणतात. या स्फोटमय स्थितीतील पदार्थ इतके अस्थिर असतात की, त्यांना किंचितसाही धक्का लागला तरी ते ताबडतोब एकमेकांपासून खूप जोराने व अतिशय वेगाने दूरवर फेकले जातात. हा अस्थिरपणा स्फोटमय स्थितीचे मुख्य कारण आहे. जेवढा अस्थिरपणा जास्त तेवढी स्फोट होण्याची शक्यता जास्त असते. सूर्यातील घटकपदार्थ अस्थिर झाल्यामुळे त्याचा स्फोट झाला.” त्या मुलाने खुलासा केला.
तो मुलगा पुढे सांगू लागला, “त्या स्फोटाने त्या सूर्याचे काही तुकडे झालेत व ते आकाशात अतिशय जोराने व अत्यंत वेगाने खूप दूरदूर फेकले गेलेत. त्याच तुकड्यांपैकी सर्वांत मोठा व मूळ तुकडा हा आजचा सूर्य बनला आणि तो तसाच भयंकर तप्त असाच राहिला.”
“बाकी तुकड्यांचे ग्रह, उपग्रह बनलेत. बरोबर आहे?” आदित्य त्याला म्हणाला. “बरोबर दादा” तो मुलगा आता मोकळेपणाने बोलू लागला, “बाकीच्या दूरवर फेकल्या गेलेल्या तुकड्यांपैकी काही तुकड्यांचे ग्रह, उपग्रह व लघुग्रह बनलेत. ते सगळे तुकडे अत्यंत जोराने व अतिशय वेगाने खूपच दूर फेकले गेल्याने त्यांना आपोआप गती प्राप्त झाली नि ते अगदी सहजगत्या स्वत:भोवती आणि त्याचवेळी त्यांच्या मूळ मोठ्या तुकड्याभोवती म्हणजेच आजच्या सूर्याभोवती फिरू लागलेत. खूपच मोठ्या कालावधीनंतर ते सर्व तुकडे हळूहळू थंड झालेत व हळूहळू गोठून गोठून घन बनलेत. त्यांचेच ग्रह, उपग्रह व लघुग्रह तयार झाले.”एवढ्यात शाळेची मधली सुट्टी संपल्याची घंटी झाली व ते आपापल्या वर्गात निघून गेले.