
आनंदी पालकत्व : डॉ.स्वाती गानू
पालकांनो तुमच्या मुलांना परफेक्ट बनवण्याचा आग्रह करण्यापेक्षा त्यांना फक्त मी यापेक्षा आणखी थोडे चांगले करू शकतो हे माहीत करून द्या. यासाठीचे जे प्रयत्न मुलं करतील हे जास्त मोलाचे ठरतील. त्यातून काय साध्य होईल तर प्रयत्न करण्याचे, अपयश येत असतानाही पुन्हा उठून उभे राहण्याचे धैर्य निर्माण होईल. काम करताना, अभ्यास करताना, खेळताना, कलेचा रियाझ करताना, कामात प्रयत्न करताना आपले नेमके कुठे चुकतंय हे शोधून काढण्यासाठी मुलं आपल्या मेंदूच्या मदतीने विचार करायला लागतील. त्यांचे मन त्यांना धीर देईल, हृदय त्यांच्याशी हितगुज करेल की, तुला थांबायचे नाहीय. प्रयत्न सोडायचे नाहीत. काम करतच राहायचे आहे. माघार घ्यायची नाहीय.
मुलं यशस्वी होईपर्यंत, आपल्या ध्येयाजवळ जाऊन पोहोचेपर्यंत तुमचा विश्वास त्यांना ‘उसना’ द्या. हा तुमचा विश्वास मुलं डोळ्यांत जेव्हा पाहतात ना की ‘मी हे करू शकतेय’ असा विश्वास जर माझ्या आई-वडिलांना वाटतोय, तर ते नक्कीच खरं आहे. एकदा का ही खात्री मुलांना पटली की, मग तुमच्या मुलांना कोणी थांबवू शकत नाही. त्यांच्या प्रगतीचा रथ विजयपथावरून वेगाने दौडू लागतो. त्यांच्यातील खेळाडूला स्फुरण येते. त्यांच्यामधल्या कलावंताच्या प्रतिमेला धुमारे फुटू लागतात. आपल्याला काय करायचे आहे, तर मुलांना’ स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवायचे आहे.’
एक विद्यार्थी होता माझ्या शाळेत. तो वर्गात उठून दिसावा, लक्षात यावा असा खूप काही चुणचुणीत नव्हता कधीच. लक्षातही नाही येणार त्याचं अस्तित्व असा सरळसाधा. फार चपळही नव्हता. शांत, धीरोदात्त भाव असायचा त्याच्या चेहऱ्यावर. त्याची चणही ठीकठाकच होती. आवश्यक तेवढी उंची, फार दणकट, मजबूत नव्हताच मुळी. मला नेहमी वाटायचे की हे सगळे असले तरी हा hidden gem, हा झाकलं माणिक आहे. इस हिरो को तराशना जरुरी है! काही प्रयत्न करून या हिऱ्याला योग्य आकार दिला, तर हा नक्कीच चमचम करेल, झळाळी येईल त्याला.
तो प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेची सूचना आली की, आनंदून जायचा ती एक्साईटमेंट त्याच्या चेहऱ्यावर दिसायची. तो स्पर्धेसाठी नावही द्यायचा. स्पर्धेत सहभागी व्हायचा मात्र माईकसमोर उभा राहिला की सात-आठ वाक्यं बोलल्यावर ब्लँक व्हायचा. पुढचे काही आठवायचंच नाही त्याला. हसू व्हायचं. तो खिन्न व्हायचा. आपण कधीच पूर्ण भाषण करू शकणार नाही असं त्याला वाटायचं. मागच्या आठवड्यात मनातले हे सारं त्याने मला बोलून दाखवले अर्थातच मीच त्याला विचारले होतं की काय होतंय नेमकं माईकसमोर गेल्यावर तुला?
तो म्हणाला मॅडम, मी खूप प्रयत्न करतो पण मी अपयशीच ठरतोय. मी दरवेळेला अर्धवटच भाषण करतो. असं वाटतं हे मला जमणार नाहीय कधीच. मी त्याला म्हटलं तू हे कधीच सोडणार नाहीयंस. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, त्याच्या नजरेला नजर देऊन म्हटलं की तुला यशस्वी होण्यासाठी फक्त तीन गोष्टींची गरज आहे. प्रयत्न करण्यासाठी तुझं मनोधैर्य, तुझ्या मेंदूचे अचूक विचार जे तुला शोधायला मदत करतील की नेमकं काय, कुठे चुकतंय? आणि तुझं हृदय जे तुला सांगेल की कधीच माघार घ्यायची नाही आणि सुकृत गमतीची गोष्ट ही आहे की या तीनही गोष्टी तुझ्याकडे आधीपासूनच आहेत. ही तीन वाक्यं सुकृतच्या मनावर जणू कोरली गेली असं वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर निश्चय होता.
पुढच्या स्पर्धेसाठी त्याचा सराव सुरू झाला. त्याला पहिली टीप दिली होती. बोलताना ‘आय लेव्हलला’ बघ. समोर बसलेल्यांकडे बघितलं की, तू विसरतो आहेस. आत्मविश्वास पूर्णपणे आला की, मग श्रोत्यांच्या नजरेला नजर भिडवून बोलायचं. पाठांतर नाही तर विषय सहज बोलायचा जणू मित्रांशी बोलतो आहेस. त्याचा आवाज, भाषा, चढउतार, विषयाची मांडणी छानच आहे याची जाणीवही करून दिली. हळूहळू त्याला ते जमू लागले. वक्तृत्व स्पर्धा संपली. तो ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
अखेरीस सुकृत जिंकला. त्याने आपल्या भीतीवर मात केली होती. त्याची इच्छा, मनोधैर्य, नेमका अडथळा शोधून काढणं आणि कधीही हार मानायची नाही ही हृदयाची हाक या तीन गोष्टींनी त्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. मॅडम, मी जिंकलो असं म्हणत जेव्हा अकरा वर्षांच्या सुकृतने पायावर डोकं ठेवून नमस्कार केला तेव्हा मी फक्त एवढंच म्हटलं’ सुकृत तुझा स्वतःवरचा विश्वास जिंकला’ पालकांनो,
१. तुमच्या मुलांकरिता हे लक्षात ठेवा की मुलं स्मार्ट, चपळ नसली किंवा काही नैसर्गिक बुद्धी, कला, खेळ यांचं देणं त्यांना नसलं तरी हरकत नाही. गरज खरंच कशाची आहे तर यशस्वी होण्यासाठी मुलं जे प्रयत्न करताहेत त्याकडे तुमचं किंवा कोणाचं लक्ष आहे की नाही?
२. तुम्ही त्यांच्यात असलेल्या मूलभूत क्षमतांवर विश्वास ठेवताय का? की ते जरी त्या गोष्टीसाठी संघर्ष करत असले, त्यांना खूप प्रयत्न करावे लागत असले तरी त्यांच्यात पोटेन्शिअल आहे.
३. तुम्ही पालक या नात्याने त्यांना असं म्हणता का तू ‘परफेक्ट’ असला पाहिजे असा माझा आग्रह नाही, पण तू प्रयत्न करणं सुरू ठेव. मी तुझ्याबरोबर आहे.
४. बरीचशी मुलं ही आळशी आहेत म्हणून प्रयत्न करणे सोडून देतात असं आपल्याला वाटतं पण तसं नाही. खरं काय आहे तर त्यांना हा विश्वास वाटत नाही की, आपण प्रयत्न केल्याने नक्कीच फरक पडेल. खरं सांगू का पालकांनो,
१) तुम्ही जे बोलता ना त्यांच्याबाबत तो कदाचित त्यांच्याही मनातून येणारा आवाज असेल.
२) तुम्ही जर प्रोत्साहन दिलंत तर त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता विकसित करता येईल.
३) जेव्हा तुम्ही म्हणाल की तुझ्यात प्रयत्न करण्याची मनापासून इच्छा आहे, ती हिंमत आहे.
४) आपण एकत्र काम करून शोधून काढू या की काय चुकतंय?
तू किती मेहनत करतो आहेस ते मी पाहतो आहे. मला खरंच तुझा अभिमान वाटतो.
तुम्ही फक्त होमवर्क, खेळ यातच मुलांना मदत करायची नसते तर तुम्हाला मुलांच्या मेंदूवर हे वाक्य कोरायला हवं की ‘मी नक्कीच प्रगती करू शकतो. मी प्रॉब्लेम सोडवू शकतो. मी कठीण आव्हानं स्वीकारू शकतो.
तुम्ही मुलांवर दाखवलेला हा विश्वास मुलांना प्रगतीच्या मार्गावर खूप लांबवर घेऊन जाईल. नुसतं टॅलेंट मुलांना प्रगतीसाठी उपयोगी नाही, तर त्यापेक्षाही जास्त त्यांना स्वतःविषयी वाटणारा विश्वास मुलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मुलाने अजूनही सर्वोत्कृष्ट प्रगती केलेली नाही, तर एक दीर्घ श्वास घ्या. कारण मुलांना फक्त या तीन गोष्टी करायला हव्यात त्या म्हणजे,
१) सराव
२) दृष्टिकोन
३) संयम
शांत राहून त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते विसरले तरी त्यांना आठवण करून देत राहा. आपल्याला मुलांना फक्त मोठं करायचं नाहीय, तर आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना तयार करायचंय.