
चित्रा वाघ :आमदार, भाजपा
अहिल्याबाई होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी ३०० वी जयंती आहे. याच निमित्ताने त्यांचे कार्य आणि विचारावर आधारित विशेष लेख!
१७२५ साली जन्मलेल्या अहिल्याईंच्या आयुष्यात किती चढउतार आले. पण मनाने निर्मळ, विचारांनी ठाम आणि प्रामाणिक असलेल्या अहिल्याईंनी सगळं नुसतं निभावून नेलं नाही, तर प्रत्येक क्षेत्रात आदर्श निर्माण केला. धर्माला, रूढी परंपरेच्या कचाट्यातून दूर करण्याचे धारिष्ट त्यांनी दाखवलं. या संस्कारांचं बीज त्यांचे वडील माणकोजी आणि आई सुशीलाबाई शिंदे यांनी रुजवलं होतं. त्या संस्कार रूपी रोपट्याचा विशाल वृक्ष अहिल्याईंचे सासरे बुवा म्हणजेच सुभेदार मल्हारराव होळकर आणि त्यांच्या सासूबाई गौतमाबाई यांनी केला. ज्या काळात महिला चूल मूल आणि समाजाने नेमलेल्या रूढी परंपरेच्या बेड्यांमध्ये जगत होत्या, त्या काळात मल्हारराव अहिल्याईंना “माझा कुळपुत्र अहिल्योबा” म्हणत. त्यांनी अहिल्याईंना तयारही तसंच केलं…. अवघ्या तेरा-चौदा वर्षांच्या अहिल्याईंवर सरकारी आणि खासगी दोन्ही हिशेबांची जबाबदारी दिली. ती अहिल्याईंनी निभावून देखील दाखवली होती.
याबाबत एक प्रसंग नमूद करावासा वाटतो. बाजीराव पेशवे आणि मल्हाररावांचे ऋणानुबंध होते. त्यांचं नातं घट्ट होतं. त्यामुळे जेव्हा बाजीराव निवर्तले तेव्हा मल्हाररावांना खूप दुःख झालं होतं. अहिल्याईंसह साऱ्या होळकर कुटुंबीयांनी बाजीराव पेशव्यांच्या स्मरणार्थ अनेक पूजा, अधिष्ठान आणि दानधर्म केले होते. त्याच दरम्यान अहिल्यादेवी दफ्तरी आल्या आणि त्यांनी हिशेब पाहिले, तेव्हा त्यांची तळपायाची आग मस्तकी गेली. कारण या सगळ्या पूजेचा, अधिष्ठान आणि दानधर्मांचा खर्च सरकारी चोपड्यांमध्ये नोंदवला होता. तेव्हा अहिल्याईंनी गंगोबा तात्यांना खडसावून सांगितलं की, सासरेबुवा आणि श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे नाते हे खासगी होते. जे दुःख झालं ते होळकर कुटुंबीयांना झालं. त्यामुळेच हे सगळे विधी होळकरांच्या खासगीत नोंदवा. इतक्या लहान वयातला हा प्रामाणिकपणा आणि समज पाहून सगळेच धन्य झाले होते. अहिल्याई शास्त्र आणि शस्त्र या दोघांचं शिक्षण घेत स्वतःला सिद्ध करत गेल्या. अर्थशास्त्र, न्यायदान आणि राज्यकारभार यातील त्यांची समज अद्वितिय होती.
पुढे कुंभेरीच्या लढाईत खंडेराव मृत्युमुखी पडले तेव्हा फक्त अहिल्याईंवर नाही तर संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अहिल्याई सती जाणार की काय या विचारांनी मल्हारराव व्याकुळ झाले होते. त्यांनी आणि गौतमाबाईंनी अहिल्याईंना सती जाण्यापासून परावृत्त केलं, ते मावळातल्या प्रजेसाठी मातोश्री हो म्हणून विनवणी केली. तेव्हा अहिल्याईंनी आपल्या गुरू आणि पित्यासमान मल्हाररावांचा शब्द मोडू दिला नाही. पुढे त्यांनी एका हाती शास्त्र आणि एका हाती शस्त्र घेऊन राज्य कारभार सांभाळला…. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळले होते. … स्वकीय असो वा परकीय आक्रमणं झाली पण त्या कधी डगमगल्या नाहीत.… अहिल्याईंनी संपूर्ण आयुष्य शिव आराधना, न्याय आणि प्रजेच्या हिताचं राजकारण यासाठी समर्पित केलं.…
त्यांच्यासमोर मुघल, इंग्रज, डच यांच्याशिवाय काही स्वकीय शत्रूंचे आव्हान होते. चहुबाजूंनी आक्रमणं होत होती. कित्येक गावं ओसाड पडत होती… पण अहिल्याईंनी ती गावं पुन्हा वसवली.… राज्यातल्या शेती आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं.… गरीब शेतकऱ्यांना कसायला जमिनी दिल्या. नौ-ग्यारा कानून केला. शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करायची…, त्यातील नऊ झाडं त्यांच्या चरितार्थासाठी ठेवायची आणि अकरा झाडांचं उत्पन्न सरकार दरबारी जमा करायचं, असा हा नौ-ग्यारा कानून होता. त्याचबरोबर त्यांनी जल-जंगल जमीन यासोबत पाळीव-वन्य प्राणी, जलचर, पक्षी या सर्वांना महत्त्व दिलं.
अहिल्याईंनी त्याकाळी ज्या पद्धतीने पाणी व्यवस्थापन केलं त्याबाबत त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही.… वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून कित्येक ठिकाणी बंधारे, नद्यांवर घाट, विहिरी, बावड्या, तलाव बांधले.… यामध्ये संपूर्ण निसर्गाचा विचार त्यांनी केला. त्यामुळेच ज्यावेळी संपूर्ण हिंदुस्थानात दुष्काळ पडला होता…, त्यावेळी मावळ पाचूसारखा चमकत होता असे म्हणायचे.
जनजाती संरक्षण ही संकल्पना त्याकाळी अहिल्याईंनी राबवली होती. जेव्हा विंध्य सातपुड्यातील निमाड गाव अहिल्याईंच्या अधिपत्याखाली आलं होतं तेव्हा या भागात भिल्लांचा प्रचंड उपद्रव होता. व्यापारी असो किंवा सामान्य प्रवासी या भागातून प्रवास करायला घाबरायचे. …कारण भिल्लांचा व्यवसाय म्हणजेच लुटमार होती. पण अहिल्याईंनी त्यांची मानसिकता ओळखली,… तिथल्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि मग भिल्लांना कसायला जमिनी दिल्या.… शेतीचं प्रशिक्षण दिलं. त्यांना समाजाचा घटक बनवलं.… भिल्लांनाच प्रवाशांच्या सुरक्षतेची जबाबदारी दिली…. इथला उपद्रव समूळ नष्ट व्हावा म्हणून त्यांनी दरबारी विडाच ठेवला होता की, जो कोणी हा उपद्रव समूळ नष्ट करेल त्याच्या हाती माझ्या लेकीचा म्हणजे मुक्तेचा हात देईल… किती मोठा धाडसी निर्णय होता हा… पण अहिल्याईंनी प्रजेसाठी तो घेतला.
खरंतर त्यांचं कार्य असं कमी शब्दांत मांडता येण्यासारखं नाहीच.… पण मला अहिल्याईंची सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे त्या प्रचंड ताकदवान होत्या. …याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर तर, एकदा होळकरांची फौज पेशव्यांसोबत निजामाशी लढत होती … त्यातल्या एका तुकडीने अहिल्याईंना संदेश पाठवला की, हैद्राबादेपासून आत साधारण १२० किलोमीटर अंतरावर एक प्राचीन शिवमंदिर आहे. त्या मंदिराची पडझड झाली आहे. अहिल्याईंनी लागलीच निजामाला खलीता धाडला. त्यांनी त्यात लिहिलं की, राजमुंदरामधील शिवमंदिर प्राचीन आहे. …तिथल्या शिवशंभूंची सेवा करणे, तसेच रयतेसाठी येण्या-जाण्याची व्यवस्था करणे हा आमचा धर्म आहे. त्यामुळे आम्ही इथून तिथल्या मंदिराच्या व्यवस्थेसाठी पैसे आणि कामगार, माणसे पाठवते. तुम्ही फक्त आम्हाला कामाची परवानगी द्या. या पत्रावर निजामानं काय उत्तर पाठवलं माहितेय? त्याने लिहलं की, आप हमारी बड़ी आपा हो…. म्हणजे तुम्ही मला मोठ्या बहिणीसारख्या आहात.… तुम्ही इथली काळजी करू नका…. मी स्वखर्चाने मंदिराचा जीर्णोद्धार करतो.… त्याला तुमचं नाव देतो.… रयतेची देखील व्यवस्था पाहतो.… तुम्ही कुठलीच तसदी घेऊ नका….
यावरून आपल्या लक्षात येईल की अहिल्याईंचे शासन सर्वत्र नसलं तरी संपूर्ण हिंदुस्तानात त्यांना मान्यता होती.… त्यांच्याबद्दल रयतेच्या मनात जिव्हाळा आणि यवनी शासकांच्या मनात भीती होती. शासकांवर अहिल्याईंचा वचक होता.…
त्या एक मुसद्दी राजकारणी होत्या, रणांगणात रणरागिणी होत्या. न्याय आणि शिस्तप्रिय होत्या. धर्मरक्षक होत्या. विशेष म्हणजे त्या एक स्त्री होत्या… आणि प्रजेच्या मनात मातेचं स्वरुप होत्या…. हे सगळं होणं खरंच सोप्प नाही…. म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक ही उपाधी देण्यात आली. ही उपाधी कोणा राजा महाराजा किंवा पेशव्यांनी नाही दिली… प्रजेने सुद्धा दिली नाही. ही उपाधी त्यांना त्या काळच्या संत महात्मा आणि ऋषी होते. त्यांनी दिली.… अजून महत्त्वाची गोष्ट अशी ही उपाधी जगामध्ये फक्त चार जणांना मिळाली आहे. एक म्हणजे पांडवांमधला राजा युधिष्ठिर, त्यानंतर राजा नल आणि खुद्द भगवान विष्णू यांना… त्यानंतर आपल्या अहिल्याईंना... …म्हणूनच त्यांना अहिल्यादेवी म्हणायचे…. आहिल्याईंच्या आठवणींचा नेहमीच जागर व्हायला हवा...…