Sunday, June 1, 2025

ठाणे

'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या'

'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या'

ठाणे : लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तातडीने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन नाव जाहिर करावे. अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल, असा इशारा कृती समितीच्यावतीने अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.


लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणे तसेच इतर प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दशरथ पाटील बोलत होते. बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि पदाधिकारी उपस्थित होते. लोकनेते दि. वा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी आजवर अनेक आंदोलने केली. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठविला आहे. परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे. विमानतळाचे काम आता पूर्णत्वास आले आहे. कदाचित नोव्हेंबर पासून उड्डाणाला सुरुवात होईल.


अशावेळी दि. बां.चे नाव या विमानतळाला देणे गरजेचे आहे, असे दशरथ पाटील म्हणाले. केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन कृती समितीच्या वतीने या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे. तरीही आजपर्यंत हा प्रश्न केंद्रात प्रलंबित असल्याने पकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. या असंतोषाचा स्फोट होऊ न देता केंदाने हा प्रश्न त्वरित सोडवावा असे दशरथ पाटील म्हणाले.

Comments
Add Comment