
नवी दिल्ली: बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने यापूर्वी आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्याद्वारे भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांचा सन्मान करण्याचा आणि पहलगाम हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार ३ जून रोजी होणाऱ्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात या निर्णयानुसार कार्यप्रणाली आखण्यात आली असतानाच, नवी बातमी सुत्रांद्वारे समोर येत आहे. ती माहिती म्हणजे, आयपीएलच्या अंतिम सामन्याला भारताच्या तिन्ही सशस्त्र दलाचे प्रमुख हजर राहू शकणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २६ निरपराध लोकांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला होता, या सर्व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' या लष्करी कारवाईद्वारे, दहशतवाद्यांना आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामुळे भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला केवळ समजलेच नाही, तर दहशतवादीयुक्त शत्रू देशाला देखील कळून चुकले! भारतीय लष्कराच्या या शौर्याचा सन्मान करण्यासाठी आणि पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयपीएल २०२५ चा अंतिम सामना एक चांगला व्यासपीठ ठरू शकतो, या हेतूने आयपीएल २०२५ गव्हर्निंग कौन्सिल आणि बीसीसीआयने भारतीय सशस्त्र दलांच्या तिन्ही सेवा प्रमुखांना ३ जून रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताचे हे तिन्ही सेवा प्रमुख सामन्यासाठी उपस्थित राहणार नाहीत. बीसीसीआय बोर्डाने तीन दिवसांपूर्वी तिन्ही प्रमुखांना आमंत्रित केले होते परंतु ते सामन्याला उपस्थित राहू शकणार नाहीत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या सुरुवातीला आयपीएल २०२५ चा हंगाम तात्पुरता एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. नियंत्रण रेषेपलीकडे आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी कारवाईमुळ आयपीएलचा सध्याचा हंगाम काही काळासाठी थांबवण्यात आला होता.
दोन्ही देशांनी युद्धबंदीचा करार जाहीर केल्यानंतर, ही स्पर्धा सुधारित वेळापत्रकासह पुन्हा सुरू झाली. परिणामी, सुरुवातीला २६ मे रोजी नियोजित अंतिम सामना ३ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला आणि उर्वरित सामने आता सहा नियुक्त ठिकाणी खेळवले जात आहेत.
हंगामाच्या पुन्हा सुरू झालेल्या टप्प्यात, बीसीसीआयने सशस्त्र दलांसोबत एकता दाखवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आयपीएल पुन्हा सुरू झाल्यापासून प्रत्येक सामन्यात, पहिल्या चेंडूपूर्वी राष्ट्रगीत वाजवले जात असून, स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर 'धन्यवाद, सशस्त्र दलांचे' असे संदेश ठळकपणे प्रदर्शित केले जाताना पाहायला मिळतात. या हंगामाचा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत आधीच प्रवेश केला आहे, तर पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे उर्वरित तीन संघ आहेत जे अंतिम फेरीत उर्वरित स्थानासाठी शर्यतीत आहेत.