
पुणे: पुण्यातील सदाशिव पेठेत एका भरधाव कारने १२ जणांना उडवल्याची भीषण घटना घडली आहे. जखमींमध्ये बहुतेक MPSC चे विद्यार्थी असून त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आलं आहे. तर, कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. क्राईम सीन सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, वाहन चालकाने तसेच कारमध्ये असलेल्या इतर सहप्रवाशांनी मद्यप्राशन केले होते का? याची पुष्टी करण्यासाठी संबंधितांचा वैद्यकीय तपास केला जात आहे.
घटनास्थळी नेमकं काय घडलं?
सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास, भवानी पेठेतील श्री नाथसाई अमृततुल्य या चहाच्या टपरीवर MPSC चे अनेक विद्यार्थी चहा घेत उभे होते. त्याचवेळी, भरधाव वेगाने एक खाजगी कार त्या मार्गाने आली, या दरम्यान वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, आणि त्याने थेट विद्यार्थ्यांवर तसेच परिसरातील काही पार्क केलेल्या दुचाकींना धडक दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघात करणाऱ्या कारचा चालक जयराम मुले (वय २७, रा. बिबवेवाडी) हा कदाचित मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्यासोबत गाडीत असलेला सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) आणि गाडीचा मालक दिगंबर यादव शिंदे (वय २७) यांच्याविरोधातही तपास सुरू आहे. तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अपघातात 12 जण जखमी
या अपघातात 12 जण जखमी झाले असून, त्यातील काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. जखमींना तातडीने संचेती रुग्णालय आणि मोडक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने, अद्याप कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही.
विद्यार्थ्यांच्या गर्दीच्या ठिकाणी झालेला हा भीषण अपघात, वाहतूक सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करतो आहे. अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेने पुणेकरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.