
गुवाहाटी : पूर्वोत्तर भारतात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आणि त्यातून झालेल्या भूस्खलनामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे. मणिपुर, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये पावसाचा प्रकोप आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून १२,००० हून अधिक कुटुंबांना बाधा पोहोचली आहे. अनेक घरांची पडझड झाली असून, नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. हवामान विभागाने या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
मिझोराममध्ये भूस्खलनाचा जबरदस्त फटका बसला आहे. लॉन्गतलाई शहरात एका डोंगर उतारावरून मातीच्या प्रचंड ढिगाऱ्याने पाच घरे आणि एक हॉटेल जमीनदोस्त केली. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असून, बचावकार्य सुरू आहे. यंग लाई असोसिएशन, आपत्ती व्यवस्थापन दल आणि तिसऱ्या भारतीय राखीव बटालियनचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. या भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग-५४ बंद झाला असून, लॉन्गतलाई आणि सियाहा या दोन भागांमधील संपर्क पूर्णतः तुटला आहे.
आसाममध्ये कामरूप मेट्रो जिल्ह्यातील भूस्खलनात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. गुवाहाटी, सिलचरसह पाच जिल्ह्यांतील १२,००० लोकांना पुराचा फटका बसला आहे. लखीमपूरमध्ये रिंगबांध फुटल्यामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या २४ तासांत गुवाहाटीत ९० ते १३४ मिमी पाऊस पडला असून, पुढील काही दिवसातही पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

नवी दिल्ली : भारतात वेगाने विकास होत आहे. देशातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत आहे. सरकारने गुंतवणूकस्नेही धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. भारतातील ...
अरुणाचल प्रदेशात भूस्खलनाने सर्वाधिक ९ जणांचे प्राण घेतले. पूर्व कामेंग जिल्ह्यातील बाना-सेप्पा मार्गावर ७ जणांचा मृत्यू झाला, तर लोअर सुबनसिरी जिल्ह्यात २ मजुरांचा मृत्यू झाला. सिगिन नदी धोक्याच्या पातळीवर आहे. हवामान खात्याने १ ते ५ जूनदरम्यान जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
त्रिपुरात देखील पावसाचा जबरदस्त परिणाम दिसून आला. येथे पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. १०६ घरे उद्ध्वस्त झाली असून, २०० हून अधिक लोक बेघर झाले आहेत. हावड़ा नदीचा पाण्याचा स्तर १०.०१ मीटर वर गेला आहे.
मणिपुरमध्ये नम्बुल, इरिल आणि इम्फाल या प्रमुख नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. टेंग्नौपाल, उखरुल आणि सेनापती जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
या मुसळधार पावसाने आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्वोत्तर भारतात जनजीवन विस्कळीत झाले असून, सरकार आणि बचाव यंत्रणा रात्रंदिवस मदतकार्य करत आहेत. मात्र, हवामान खात्याचा पुढील काही दिवसांचा अंदाज पाहता संकट अद्याप टळलेले नाही.