
खासदार नारायण राणे यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ठेकेदार गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर त्या ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यांनी आता याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे. येत्या ७ जून पर्यंत सर्व्हिस रोडसह उर्वरित कामे पूर्ण झालीच पाहिजेत. चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही अशा कडक शब्दात माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
खा. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खातेनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी खा. नारायण राणे यांचे स्वागत केले.

सोशल मीडिया प्रेम प्रकरणात धक्कादायक माहिती उघड नागपूर : नागपूरच्या सुनीता जामगडे या ४३ वर्षीय महिलेने सोशल मीडियावर ओळख झालेल्या झुल्फिकार ...
पहिल्या पावसातच लांजा येथे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा बोजवारा उडाला होता. नागरिक आणि वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी बैठकीत खा. राणे यांनी महामार्ग आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त करताना ठेकेदार वेळेत आणि योग्य काम करत नसेल तर त्याचा ठेका रद्द करा, काम योग्य होण्यासाठी अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन ठेकेदार काय काम करतोय, किती माणसं आहेत, योग्य पद्धतीने काम होते की नाही याची खात्री करा आणि त्याचा अहवाल द्यावा. पावसाळा येत्या ७ जूनपासून सुरु होत आहे, तोपर्यंत सर्व्हिस रोडसह उर्वरित कामे पूर्ण झाली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपत्ती काळातील उपाययोजनांची जाणून घेतली माहिती
या बैठकीत सर्व विभागांचा विस्तृत आढावा घेत खा. राणे यांनी संबंधित सर्व विभागांच्या प्रमुखांना नैसर्गिक आपत्ती काळात आपापल्या विभागांबाबत सतर्क राहून आपत्ती ओढवणार नाही आणि ओढावलीच तर त्यातून तत्काळ उपाययोजना कशी करता येईल याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या. खा. राणे यांनी कोकण रेल्वेने केलेल्या आपत्ती काळातील उपाययोजनांची माहिती घेताना त्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे नवीन थांबे, नवे स्थानक याबाबत काय प्रस्ताव आहेत ते आपल्याला सादर करावेत अशा सूचना यावेळी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात किती नुकसान झाले, जीवितहानी किती झाली, शासकीय मदत किती जणांपर्यंत पोहोचली, ज्यांच्यापर्यंत पोहोचली नाही त्यांना ती लवकरात लवकर पोहोचवा असे निर्देश दिले.