
जपान : भारताला जपानकडून शिंकानसेन मालिकेतील E५ आणि E३ मॉडेलच्या दोन बुलेट ट्रेन भेट म्हणून मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (MAHSR) प्रकल्पांतर्गत जपानमध्ये प्रथमच शिंकानसेन बुलेट ट्रेनची चाचणी सुरु झाली आहे. भारतीय गरजा लक्षात घेऊन ही चाचणी केली जात आहे. जेव्हा या गाड्या भारतात येतील तेव्हा त्या स्थानिक वातावरणातही चांगली कामगिरी करू शकतील. हा प्रकल्प २०२६ पर्यंत भारतात राबवला जाणार आहे आणि पहिल्या २ गाड्या जपानकडून भारताला भेट म्हणून दिल्या जातील अशी माहिती समोर आली आहे.
जपानकडून भारताला भेट
या प्रकल्पांतर्गत, भारताला शिंकानसेन मालिकेतील E५ आणि E३ मॉडेलच्या दोन ट्रेन मिळतील. या गाड्या ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावू शकतात. सध्या, जपानमध्ये या गाड्यांची चाचणी सुरू आहे. ट्रेनची क्षमता, सुरक्षितता, तापमान आणि धूळ प्रतिरोधकता यासारख्या ट्रेनच्या अनेक वैशिष्ट्यांची चाचणी केली जात आहे. २०२६या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा या गाड्या भारतात येतील तेव्हा येथील जमीन आणि हवामानानुसार त्यांची चाचणी देखील केली जाईल.

गुमी : आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करून दाखवलीये. दक्षिण कोरियामधील गुमी येथे सुरु असलेल्या स्पर्धेत ...
'मेक इन इंडिया' ला मिळणार चालना
जपान टाइम्सच्या रिपोरेटनुसार, या बुलेट ट्रेनच्या ट्रायलमधून जो डेटा मिळेल, त्याचा उपयोग भारतातच नव्या पिढीच्या E१० सीरिजमधील बुलेट ट्रेन बनवण्यासाठी केला जाईल. यामुळे “मेक इन इंडिया” ( Make in India) उपक्रमांतर्गत टेक्निकल ट्रान्सफर आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळेल.
२ तास ७ मिनिटांत पार पडणार प्रवास
या ५०८ किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरमध्ये, मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास फक्त २ तास ०७ मिनिटांत पूर्ण होईल. या मार्गावर १२ स्थानके असतील, ज्यामध्ये ठाणे, विरार, वापी, सुरत आणि वडोदरा या शहरांचा समावेश आहे. २०१६ मध्ये भारत आणि जपान यांच्यात झालेल्या कराराचा हा प्रकल्प एक भाग आहे, ज्यामध्ये जपान स्वस्त येन कर्जाच्या स्वरूपात ८० टक्के खर्च देत आहे.
रेल्वेचे भविष्य बदलणार
या प्रकल्पामुळे केवळ जलद प्रवासाचेच साधन मिळणार नाही तर रोजगार, पर्यटन, तांत्रिक विकास आणि व्यापारालाही मोठी चालना मिळणार आहे. एकदा बुलेट ट्रेन सुरू झाली की, भारतातील रेल्वेचे भविष्य पूर्णपणे बदलून जाईल, असं म्हंटल जातंय.