
जळगाव: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला (11 th Online Admission) सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी चक्क लाच (Bribe) मागितल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या दोन शिक्षकांनी अकरावी प्रवेशासाठी २० हजार रुपयांची मागणी केली होती. ज्यांना धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) सापळा रचून रंगेहात पकडले.
अकरावी प्रवेशासाठी 20 हजार लागतील, असे सांगत १० हजारांची रक्कम स्वीकारतांना संबंधित शिक्षकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. जळगाव येथे घडलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
गुलाब विरभान साळुंखे व उल्हास भास्करराव बागूल अशी लाचखोर शिक्षकांची नावे आहेत. तक्रारदार हे मेहुणबारे येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या मेहुणबारे माध्यमिक विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला आहे. त्यास याच संस्थेच्या मेहुणबारे उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी सायन्स या वर्गात प्रवेश घ्यावयाचा होता. याबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या मुलाने २७ मे रोजी या शाळेत जाऊन तेथे उपशिक्षक गुलाब साळुंखे आणि लिपिक पंजाबराव देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी तक्रारदारांना त्यांच्या मुलाच्या प्रवेशाकरीता २० हजार रुपये द्यावे लागतील. त्यातील १० हजार रुपये ऑनलाईल अर्ज केल्यावर आणि उर्वरित १० हजार रुपये शाळेत प्रवेश घेतांना द्यावे लागतील. त्याशिवाय शाळेत प्रवेश होणार नाही, असे सांगितले होते.